Tuesday 8 May 2012

चहाच्या पेल्यातलं वादळ...


स्वर्ग आणि पृथ्वी एकमेकांपासून अलग केल्यावर जगाची निर्मिती झाली. स्वर्गातील एकूण बारा सम्राटांनी प्रत्येकी १८ हजार वर्षं या जगावर राज्य केलं. त्यानंतर पृथ्वीवरील अकरा राजांनी या जगाचा कारभार सांभाळला. प्रत्येक राजाची राजवट स्वर्गातील सम्राटाएवढीच होती. त्यानंतर मानवजातीच्या नऊ प्रमुखांनी एकूण ४५ हजार वर्षं राज्यकारभार केला. सोळा सार्वभौम अधिकार्‍यांवर जगाची जबाबदारी सोपवण्यात आली. शेवटी फु सी, शेन नुंग आणि हुआंग टी या त्रयींनी पृथ्वीवर प्रगती घडवून आणली. फु सी आणि हुआंग टी पीतनदीच्या दक्षिणेकडील होनन या प्रदेशात राह्यचे. पृथ्वीवरील सर्व हस्तकौशल्य आणि कला या दोघांनी शोधली. तिसरा सार्वभौम अधिकारी शेन नुंग. पृथ्वीवरील जमीन सर्वप्रथम नांगरण्याचा मान शेन नुंगचाच. त्यानेच चहा या पेयाची मौल्यवान देणगी अखिल मानवजातीला दिली.

या चिनी दंतकथेचा काळ इसवीसनपूर्व २७३७. शेन नुंगने वैद्यकीय ग्रंथात लिहिल्याप्रमाणे चहामुळे तहान भागते. झोप कमी येते, मन आणि शरीर प्रफुल्लित होते. चहाच्या शोधासंबंधात चीनमध्ये अनेक दंतकथा आहेत. भारतातून चीनमध्ये गेलेल्या बौद्ध भिक्षूंनी चहाचा स्वीकार केला. चहाला धार्मिक पेयाचाही मान त्यामुळे मिळाला. चीनमधील अनेक धर्मपंथांनी चहाला गौरवाचं स्थान दिलं. मंदिराभोवती चहाचे मळे लावण्याची प्रथाच तिथे होती. लू यू या विद्वानाने चा चिंगसर्वश्रेष्ठ चहा असा ग्रंथच लिहिला. चहाच्या संदर्भातील बौद्ध, टाओ आणि कन्फ्युशिअन तिन्ही पंथींयांच्या तत्वांचा आढावा लू यूने घेतला आहे. सौंदर्य आणि साधेपणा ही दोन तत्वं लू यूला चहा या पेयात आणि चहापानाच्या कार्यक्रमात दिसली. लू यू त्याच्या बोहेमियन जीवनशैलीमुळे प्रसिद्ध होता. त्यात या ग्रंथाची भर पडल्याने त्याची लोकप्रियता वाढली. चीनच्या सम्राटाने त्याच्याशी मैत्री केली. चहा कसा करावा याचं रसभरीत वर्णन लू यूने केलं आहे. लू यूने सांगितलेल्या चहाच्या कृतीत दूध नाही. चहात चवीसाठी कणभर मीठ घालत किंवा खजूर, कधी स्वादासाठी पेपरमिंट असंही लू यूने नोंदवलं आहे. सुंदर निळसर झाक असलेले चिनी मातीचे कप चहा या पेयासाठी अत्त्युत्तम असतात. लालसर चॉकलेटी चहा या कपात ओतला की चहाला एक आगळावेगळा पांचूसारखा हिरवट रंग येतो आणि त्यामुळे पेयाची लज्जत वाढते असं लू यूने म्हटलं आहे. इसवीसन ८०४ साली लू यूने जगाचा निरोप घेतला. पण तोपावेतो चहा चिनी जनमानसात आणि संस्कृतीत पुरतेपणी मुरला होता. लू यूने चहाची रोपं, पानं, जाती, चहा करण्याची भांडी, चहाचे कप, चहापानाचा कार्यक्रम इत्यादीबाबत आपल्या त्रिखंडात्मक ग्रंथात जी माहिती दिली होती ती आजही आदर्श मानली जाते. जपानी चहापानाचा गूढ कार्यक्रम लू यूच्या ग्रंथाच्या आधारेच आकाराला आला. चीन, जपान आणि अतिपूर्वेकडील देशांमध्ये चहा चीनमधूनच पोचला. चहापानाला शाही स्वरूप आलं होतं. चिनीमातीची नक्षीदार भांडी, चहाच्या किटल्या अशा सरंजामामुळे चहा हे पेय तालेवारांच्या शाही बैठकांमध्ये रुळलं. अरबांमुळे युरोपियनांना चहा या पेयाची आणि चहापानाच्या कार्यक्रमाची ओळख झाली. छानछोकीच्या वस्तू आणि षौक ह्यांचा युरोपमध्ये दुष्काळच होता. युरोपिय देशातील उमराव, बडे व्यापारी चहा आणि त्याचा शाही सरंजाम यांच्याकडे म्हणूनच आकर्षिले गेले.  आफ्रिकेतून कॉफी येण्याआधी युरोपकडे वाईन हेच शाही पेय होतं. पहिल्यांदा कॉफीने आणि त्यानंतर चहाने विविधता आणली. चहाच्या पानांवर करायची प्रक्रिया युरोपला माहिती नव्हती. जपानने पाश्चांत्यांना आपली बंदरं बंद करून टाकली होती आणि पाश्चात्य लोक लबाड आहेत अशीच चिनी राज्यकर्ते व व्यापारी ह्यांची धारणा होती. त्यामुळे चीनने केवळ एकच बंदर युरोपशी व्यापार करण्यासाठी खुलं केलं होतं. प्रथम पोर्तुगीजांनी चहाची आणि चहापानाची चव जपान आणि चीनमध्ये चाखली. त्यानंतर डचांनी. त्यांनी चहापानाच्या समारंभाची रसभरीत वर्णनं करून ठेवली. त्यामुळे डच व्यापार्‍यांनी डच ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना करून व्यापारात आघाडी घेतली. १६१० साली चिनी आणि जपानी चहा घेऊन बोटी युरोपला रवाना झाल्या. तरिही १७०० सालापर्यंत चहा हे पेय युरोपात दुर्मिळच होतं. इंग्लड आणि अन्य युरोपिय देशांमध्ये उमराव, दरबारी, श्रीमंतांच्या घरीच हे पेय घेतलं जाई. कॉफी हाऊसमध्ये अतिशय महागडं पेय म्हणून चहाची विक्री व्हायची. चहाबरोबर चहा बनवायची नक्षीदार पोर्सेलिनची भांडीसुद्धा आयात केली जायची. त्यावेळी युरोपात चहापानाच्या पार्ट्या आयोजित केल्या जात. एक पौंड चहा त्यावेळी १०० डॉलरला मिळायचा. असा चहा पोर्सेलिनच्या नक्षीदार भांड्यातून दिला जायचा. त्यावेळी युरोपियन लोक चहा बशीत ओतून फुर्रर्र असा आवाज करत प्यायचे. पुढे कधीतरी म्हणजे औद्योगिक क्रांतीनंतर चहा कपातूनच आवाज न करता प्यायचा असं रुढं झालं. चहापानानंतर केक, थोडीशी ब्रँडी, तोंडात टाकायला मनुका, बेदाणे, असा या पार्ट्यांचा थाट असायचा. ह्यालाच म्हणायचे हाय टी. पुढे चहा इंग्लडात भलताच लोकप्रिय झाला. म्हणजे क्रिकेट हा खेळ भारताचा वाटतो तसं चहाबाबत ब्रिटीशांचं झालं. गोची अशी होती की चहा काय किंवा पूर्वेकडून येणार्‍या मसाल्याच्या पदार्थांचा व्यापार डचांच्या हाती होता. डच व्यापारी अनेकदा दर वाढवत असत. त्यामुळे ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनी स्थापन करण्यात आली. (युरोपियन लोकांना जे जे एक्झॉटिक वाटायचं त्याला ते इंडिया म्हणायचे. त्यामुळे चीनशी व्यापार करणार्‍या कंपन्यांची नावं ईस्ट इंडिया तर अमेरिकेला गेलेला कोलंबस तिथल्या सर्व मूळच्या रहिवाशांना इंडियन म्हणून मोकळा झाला. अज्ञात अशा पूर्वेलाच नाही तर अज्ञात  अमेरिकेतही एका बेटांच्या समूहाला वेस्ट इंडीज असं नाव युरोपियनांनी देऊन टाकलं.) ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनी केवळ व्यापारासाठीच स्थापन झाली पण तिला अनेक अधिकार देण्यात आले, उदा. ब्रिटीश साम्राज्याच्या सीमा वाढवणे, सैन्य जमवणे, युद्ध करणे, खटले भरणे, गुन्हेगारांना शिक्षा देणे असे. त्यामुळे ही कंपनी ब्रिटीश साम्राज्याची वाहक बनली. चहाच्या व्यापाराचा एकाधिकारच या कंपनीकडे आला. दरम्यानच्या काळात जर्मनी आणि फ्रान्समध्येही चहा पोचला. पण जर्मन लोकांना बीयरपुढे सर्वकाही फिकं वाटायचं. फ्रान्समध्येही वाईनची जागा चहाला मिळाली नाही. चहाऐवजी आफ्रिकेतून आलेली कॉफी फ्रेंचांना अधिक पसंद होती. रशियात चहा पोचला मंगोलियामार्गे. रशिया मुलुखाचा गरीब देश. बहुसंख्य लोक दिवसातून एक दिवसच पोटभर जेवत. त्यामुळे भूक मारायला चहा हे पेय त्यांना वरदानासारखंच वाटलं. चहा, पाणी आणि लिंबू असं एकत्र उकळून दिवसभर घुटके घेत बसायचं, अशी रशियन पद्धत. चहा ते पाण्यासारखाच प्यायचे. म्हणून पाणी गरम करण्याचा हीटर आणि चहाची किटली अशा संयुक्त उपकरणाची निर्मिती या रशियन लोकांनी केली. त्यालाच म्हणतात सॅमोव्हार. ह्या भांड्यात एकावेळी चाळीस कप चहा करता यायचा. रशियन लोक तोंडात साखरेचा खडा ठेवून गरमागरम चहा घोट-घोट पित असत. ग्लासभर चहा आणि तोंडात साखरेचा खडा ठेवून घुटके घेण्याचा आनंद स्वर्गीय आहे, असं अलेक्झांडर पुष्कीन (१७९९-१८२३) या रशियन कवीने लिहूनच ठेवलंय.  रशियन लोकांनी चहाभोवतीचं सौंदर्यांचं, खानदानीपणाचं वलय नष्ट करून टाकलं. ह्याबाबतीत त्यांचं आणि आपलं जुळत असावं. अमेरिकेत चहा बहुधा सतराव्या शतकातच पोचला. १६७४ साली न्यूयॉर्कच्या अवतीभवती चहाच्या बागा तयार करण्यात आल्या. चहा घरी बनवण्याची पद्धत होती. शहराच्या आसपासच्या झर्‍यातलं पाणी घेऊन फेरीवाले दारोदार हिंडत आणि चहाचं पाणी अशी आरोळी देत. बायका ते पाणी चहा करण्यासाठी विकत घेत. ब्रिटनमधून अमेरिकेत स्थलांतरीत झालेल्यांसाठी चहा अत्यावश्यक बाब झाली होती. चहाचा कारभार तर ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीच्या हातात होता. अमेरिकेतील वसाहतींमध्ये चहा, रेशीम, मसाल्याचे पदार्थ ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीमार्फतच पाठवले जायचे. या वस्तूंवर ब्रिटीश सरकारने कर बसवले. त्याला वसाहतवाद्यांनी विरोध केला. ब्रिटीश सरकारने त्यांच्या विरोधापुढे मान तुकवली आणि बहुतेक वस्तूंवरचे कर हटवले. पण चहावरचा कर मात्र ठेवला. त्यामुळे वसाहतवाले संतापले. १६ डिसेंबर १७७३ रोजी कंपनीची तीन जहाजं चहा घेऊन बोस्टन बंदरात दाखल झाली. तिथे संतप्त जमावापुढे भाषण करताना जॉन रोवे हा म्होरक्या म्हणाला, खारट पाण्यात चहा कसा मिसळेल? त्याच्या ह्या वक्तव्याने ठिणगी पडली. आणि जमावाने हजारो टन चहा समुद्रात बुडवला. हीच ती बोस्टनची टी पार्टी.

    केवळ अमेरिकन वसाहतींमध्येच नाही तर ब्रिटनमध्येही चहावर कर लावण्यात आला. त्यामुळे ब्रिटनमध्ये चहाची तस्करी सुरु झाली. चहाचा काळाबाजारही तेजीत सुरु झाला. लाचखोरी, भ्रष्टाचार यामध्ये वाढ झाली. उच्च प्रतीचा चहा सामान्य लोकांना वाजवी किंमतीत मिळाला पाहीजे ह्यासाठी लंडनमध्ये आंदोलन झालं. परिणामी ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीचा चहावरील एकाधिकार संपुष्टात आला. ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीचा कारभार डांबीसपणाचाच होता. चीनमध्ये अफूच्या आयातीवर बंदी घालण्यात आली. तरिही कंपनी तिथे अफूची विक्री करायची. (भारतातली अफू चीनमध्ये निर्यात केली जायची. मुंबई शहरातून या अफूचा व्यापार चालायचा. मुंबई शहराची पायाभरणी कापसाच्या नव्हे तर अफूच्या व्यापाराने केली. अमिताव घोष यांच्या सी ऑफ पॉपीज् या कादंबरीमध्ये त्याची दखल घेण्यात आलीय.) त्यामुळे चिनी राज्यकर्त्यांना ब्रिटीशांबाबत अधिक संशय वाटू लागला. यातूनच १८३९ ते ४२ या काळात चीन-ब्रिटन यांच्यात युद्ध पेटलं त्याला म्हणतात अफूचं युद्ध. त्यात चीनचा पाडाव झाला आणि ब्रिटीशांना बरेच अधिकार मिळाले. पुढे १८५७ सालच्या बंडानंतर ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीचा अस्त झाला. दरम्यानच्या काळात भारतात ब्रिटीशांनी चहा लोकप्रिय करायला सुरुवात केली होती. टीपॉय म्हणजे चहाचे कप ठेवण्याचं खुर्चीसमोरचं छोटं टेबल. हाय टी म्हणजे दुपारी चहासोबत केक, बिस्कीटं मांडायचं मोठं टेबल. चहाच्या मार्केटिंगमधून जन्माला आलेले हे फर्निचरचे आणि शिष्टाचाराचे प्रकार बाबू लोकांमध्ये रुळू लागले होते. तरिही १९ व्या शतकात चहा भारतीयांच्या जिभेवर रुळला नव्हता. चहाची सवय वा व्यसन विसाव्या शतकातच देशात पसरू लागलं.  

तो चहा गुलाबी, चर्चा खळखळणारी...अशा शब्दांत इंदिरा संत यांनी मराठी चहाच्या रंगरुपाची नोंद करून ठेवली आहे. माधव साठे ह्या समाजवादी साथीला कुलाब्यापासून दादरपर्यंतच्या प्रत्येक इराणी हॉटेलातल्या चहाची चव पक्की ठाऊक होती. इराण्यांच्या हॉटेलात पानी कम चहा मिळतो. म्हणजे चहाचं पाणी कमी. दूधाचं प्रमाण तेच. लंबा पानी चहाही मिळायचा. इराण्यांची हॉटेलं हे तरुणांचे अड्डे होते. अरुण कोलटकरच्या इराणी या कवितेत ह्या माहौलाचं सुंदर साक्षेपी चित्रण आहे. त्यात दुधाचं प्रमाण कमी असायचं. मुसलमानांच्या चहाला इलायचीचा स्वाद असायचा. शेट्टी वा उडप्यांच्या हॉटेलातला चहा भरपूर दूध घातलेला. सत्तरच्या दशकात मुंबईत म्हणजे दक्षिण मुंबईत, शंकरविलास हिंदू हॉटेलांची साखळी होती. ह्या हॉटेलांमध्ये फक्त चहा, नेस्कॅफे आणि उकाळा मिळायचा. साधा, स्पेशल, तीन नंबर आणि गुलाबी असे चार प्रकारचे चहा तिथे मिळायचे. अंधेरी स्टेशनात अमेरिकन चहा मिळायचा म्हणजे चहात दुधावरची साय टाकून द्यायचा तो स्टॉलवाला. दादर स्टेशनाच्या बाहेर बबनचा चहाचा स्टॉल हा पत्रकारांचा अड्डा बनला होता. तो चहात कोकोचा वगैरेही स्वाद टाकायचा. अंबरिश मिश्र रात्री उशिरापर्यंत तिथे आपली मैफील जमवायचा. अर्धा कप चहासाठी कटिंग हा शब्द बहुधा मुंबई शहरात जन्म पावला असावा. पण कट म्हणजे कापणे म्हणून कटिंग हा शब्द वापरून हाफ कप चहा अशा तीन शब्दांना सुटसुटीत पर्याय मुंबईतल्या चहा टपरीवाल्यांनी काढला असावा. पंजाब आणि उत्तर प्रदेशात दुधातच चहा पत्ती टाकून उकळतात. हैदराबादेत साखर एवढी घालायचे की चहाच्या ग्लासात चमचा उभा राह्यला पाह्यजे. त्याला खडा चम्मच चहा म्हणायचे. गुजराती, मारवाडी यांना मसाला घातल्याशिवाय दूध चालत नाही त्यामुळे चहाचाही मसाला त्यांनी तयार केला. मुंबईतील प्रकाश, पणशीकर ह्या अस्सल मराठी हॉटेलांमध्ये आजही मसाला दूध मिळतं. सत्तर वा ऐंशीच्या दशकात तिथे चहा-कॉफी मिळू लागली. उत्तर भारतीयांच्या कचोरी, समोसा, दही आणि दूध एवढेच पदार्थ मिळतात. दुधाला स्वाद देणारं पेय म्हणूनच भारतीय लोकांनी चहाला जवळ केलं.

१९८४ साली मी पहिल्यांदा ईशान्य भारतात गेलो होतो त्यावेळी आसामात चहाला सा म्हणायचे (आसामी भाषेत च नव्हता.) आता मात्र तिथेही चाय हा शब्द रुळला आहे. नागालँडमध्ये फिका चा प्यायचे. म्हणजे उकळत्या पाण्यात फक्त चहाची पत्ती टाकून पाणी गाळून घ्यायचं. दूध किंवा साखर टाकली की चहाची चव राहात नाही, असं ते म्हणायचे. आता नागालँडमध्ये सर्वत्र आपल्यासारखा दुधाचा चहा मिळतो. दूधाऐवजी ते व्हाईटनर अर्थात दूध पावडर वापरतात एवढाच फरक. भंडारा जिल्ह्यात नवेगाव बांधाच्या जवळ तिबेटी निर्वासितांचं गाव आहे. तिबेटी जिन्नसांची खरेदी करायला गावकर्‍यांचा एक गट दरसाल सिलीगुडीला जातो. बेगमीच्या जिन्नसांच्या यादीत चहाही असतो. तिबेट वा चीनमधली खास चहा पत्ती त्यांना हवी असते. चहात याकचं लोणी घुसळून केलेलं पेय त्यांच्या आवडीचं. चहा गरम तर हवा पण घुसळताही यायला हवा म्हणून एक खास थर्मासही तिबेटी लोकांसाठी बनवण्यात आलाय. हा तिबेटी चहा मला त्या नवेगाव बांधाजवळच्या तिबेटी गावातच चाखायला मिळाला. लोणी गायीच्या दुधाचं होतं. म्हणजे सिलीगुडीहून याकचं दूध वा लोणी आणत नाहीत एवढं कळलं. नमकीन चहा काश्मीरला पितात. दिल्लीतल्या दरयागंज भागात आप की पसंद या नावाचं एक चहाच दुकान होतं. तिथे वेगवेगळ्या प्रकारचे चहा मिळायचे. म्हणजे तुम्ही दार्जिलिंग आणि आसाम अशा दोन चहांची ऑर्डर दिली तर वासावरून समजायचं की दोन वेगळे चहा बनत आहेत. ग्रीन टी किंवा दूध वा साखरेशिवाय चहाच्या स्वादाची भारतीयांना ओळख होण्यासाठी एकविसावं शतक उजाडावं लागलं.  
भारतात चहा लागवडीचं श्रेय मणिराम दिवाण यांना जातं. त्यांचं मूळ नाव मणिराम दत्त बारुआ. अहोम राजदरबारात ते दिवाण होते. त्यांनीच रॉबर्ट ब्रूस आणि अलेक्झांडर ब्रूस या ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीच्या अधिकार्‍यांना आसामातील जंगली चहाची झुडपं दाखवली (१८२३). सिंगफो या आदिवासी जमातीच्या प्रमुखांची भेट घडवून ब्रूस बंधूंना आसामातील चहाच्या झुडपांची माहिती दिली. या झुडुपांची नीट देखभाल करून अलेक्झांडर ब्रूस यांनी चहा लागवडीचं तंत्र विकसीत केलं. त्यापूर्वी चीनमधून चहाच्या बिया आणून त्यांची लागवड करण्याचा प्रयत्न अयशस्वी झाला होता. मणिराम दिवाण हरहुन्नरी आणि कर्तबगार उद्योजक होते आणि उत्तम प्रशासकही होते. चहाच्या मळ्यांची लागवड करणारे ते पहिले आसामी उद्योजक. १८५७ च्या उठावात सहभागी झाल्याबद्दल त्यांना फाशी देण्यात आलं. मणिराम दिवाण ह्यांचं चरित्र, चारित्र्य आणि कार्य यामधून त्यांच्या देशभक्तीचा, दूरदृष्टीचा आणि आसाम वा ईशान्य भारतातील राजकीय-सामाजिक प्रश्नांबद्दल असलेल्या त्यांच्या मर्मदृष्टीचा परिचय होतो.

ब्रह्मदेशातून होणार्‍या हल्ल्यांमुळे बंगालात स्थलांतरित झालेले मणिराम दिवाण, शांतता प्रस्थापित झाल्यावर आसामात परतले. बावीस वर्षांचे मणिराम दिवाण रंगपूरचे तहसीलदार आणि शिरस्तेदार म्हणून काम पाहू लागले. मणिराम दिवाणांचं कुटुंब मूळचं कनौजचं. सोळाव्या शतकात हे कायस्थ कुटुंब आसामात स्थलांतरित झालं. तेव्हापासून मणिराम यांच्या पूर्वजांना अहोम दरबारात स्थान होतं. आसामात परतल्यावर काही काळातच अहोम राजा पुरंदर सिंघाने त्यांना दरबारी सेवेत दाखल करून घेतलं. कंपनीने पुरंदरसिंघाला पदच्युत केल्यानंतर मणिराम कंपनीच्या सेवेतून बाहेर पडले.
भारतात चहाची लागवड करण्याचा निर्णय कंपनीने १८३३ साली घेतला. लॉर्ड बेंटिगने या संबंधात एक समिती स्थापन केली. या समितीने आसामला भेट दिली त्यावेळी अहोम राजा, पुरंदरसिंघाचा प्रतिनिधी म्हणून मणिराम दिवाण ह्यांनी चहा लागवडीसाठी आसामात भरपूर वाव असल्याचं समितीच्या निदर्शनास आणून दिलं. १८३९ साली स्थापन झालेल्या आसाम टी कंपनीचे दिवाण म्हणून मणिराम यांची नियुक्ती झाली. दरमहा २०० रुपये पगाराच्या नोकरीला मणिराम यांनी वर्षभरातच रामराम ठोकला आणि जोरहाट जिल्ह्यात चहाची लागवड सुरु केली. त्याशिवाय शिबसागर जिल्ह्यातही त्यांनी चहामळे उभारले. हातमाग, वीटभट्टी, कापड रंगवणे, हस्तीदंतावरील कारागीरी, हत्तींचा व्यापार, लष्कराच्या बराकी बांधण्याचं कंत्राट, दगडी कोळशाचा व्यापार असे अनेक उद्योग मणिराम ह्यांनी सुरु केले. आसाम टी कंपनीच्या मागोमाग अनेक कंपन्यांनी चहामळे फुलवायला सुरुवात केली. ह्या सर्व कंपन्या गोर्‍यांच्या होत्या. त्यांनी मणिरामना सतावायला सुरुवात केली. कंपनीच्या एका अधिकार्‍याने मणिरामच्या चहामळ्यावर जप्तीच आणली. मणिरामनी सदर कोर्टात याचिका दाखल केली. कंपनीची धोरणं आणि कारभारामुळे आसामी जनतेची स्थिती हलाखीची झाली आहे, आसामी लोकांची प्रतिष्ठा, मानसन्मान, पत, नोकरी, जात, धंदा यावरच या कारभाराने हल्ला केला केला. आसामचं शोषण करण्याच्या कंपनीच्या नीतीमुळे ही परिस्थिती ओढवली आहे, असा आरोप मणिरामनी या याचिकेत केला. आदिवासी, विशेषतः डोंगरातील आदिवासी (आसामात मैदानात वा खोर्‍यात राहणार्‍या आदिवासी जमातीही आहेत.) समूहांना वाईट वागणूक कंपनी सरकार देत आहे, याकडे मणिरामनी याचिकेत लक्ष वेधलं. कंपनी सरकारची कर-सारा पद्धती, अफूच्या लागवडीला उत्तेजन देण्याचं धोरण, मारवाडी आणि बंगाली लोकांचा कारभारातील आणि अर्थव्यवस्थेतील वाढता वरचष्मा, कामाख्या मंदिरातील सरकारी पूजा बंद करण्याचा निर्णय, अहोम राजांच्या प्रासादांची लूट, स्मारकांची हेळसांड असे मुद्देही मणिरामनी आपल्या याचिकेत मांडले आहेत. अहोम राज्यसंस्था आणि राज्यकारभाराची पुनःस्थापना करण्यात यावी, अशी मागणी मणिराम यांनी या याचिकेत केली. ही याचिका अर्थातच फेटाळण्यात आली.
मणिराम यांची ही याचिका म्हणजे आसामी राष्ट्रवादाचा ओनामा म्हणता येईल. अहोम, आसामी, हिंदू, मुस्लिम, शाक्त आणि वैष्णव पंथीय, आसामातील आदिवासी समूह यांच्या भाषा आणि संस्कृती ही आसामी राष्ट्रवादाची बैठक असावी असं या याचिकेद्वारे मणिराम यांनी स्पष्टपणे सुचवलं आहे.

अहोम राज्यसंस्था अर्थातच राजेशाहीची पुर्नस्थापना करण्यासाठी जमवाजमव करायला मणिराम कोलकात्याला गेले. अहोम राजाचा वंशज कंदरपेश्वर सिंघा याच्या वतीने त्यांनी त्यांनी तिथल्या न्यायालयात ६ मे १८५७ रोजी याचिका दाखल केली. २९ मार्च १८५७ रोजी मंगल पांडेने ब्रिटीश सेनाधिकार्‍याला ठार मारून क्रांतीचं रणशिंग फुंकलं. त्यावेळी मंगल पांडेला आवरणार्‍या सैनिकावर बराकीतल्या अन्य सैनिकांनी दगडफेक केली होती. मंगल पांडेला निघून जाऊ दे अन्यथा आम्ही तुझ्यावर गोळ्या चालवू अशी धमकीही दिली. मात्र प्रत्यक्षात बंडाला सुरुवात झाली १० मे १८५७ रोजी. या बंडात आसामनेही उडी घ्यावी आणि ब्रिटीशांच्या विरोधात बंड करून अहोम राजवटीची स्थापना करावी, यासाठी मणिराम दिवाण यांनी हालचाली सुरु केल्या. कोलकता, दिब्रुगढ, गोलाघाट, सिबसागर, जोरहाट अशा विविध ठिकाणच्या विश्वासू साथीदारांना त्याने एकत्र आणण्यात त्यांना यश मिळालं. कंदरपेश्वर सिंघा या अहोम राजाचे विश्वासू साथीदार होते सुभेदार शेख भिकून आणि नूर मोहम्मद. त्याशिवाय अन्य दरबारीही सामील झाले. कोच राजबंशी, आसामी हिंदू, आसामी मुसलमान, अहोम असे विविध धार्मिक, भाषिक, वांशिक लोक या कटात सहभागी झाले होते. प्रथम जोरहाट ताब्यात घ्यायचं त्यानंतर दिब्रुगढ, सिबसागर हे जिल्हे मुक्त करायचे अशी रणनीती आखण्यात आली. ब्रिटीशांनी ब्रह्मी सैन्याच्या तावडीतून आसामची मुक्तता केल्याबद्दल मणिराम दिवाण यांनी बुरांजीमध्ये (आसामी तवारिख) असं लिहून ठेवलंय की अमरावतीच्या पुरंदराप्रमाणे ब्रिटीशांची संपत्ती आणि साम्राज्य वाढो. परंतु त्यानंतर मणिराम ही राजवट उलथून टाकण्यासाठी कटिबद्ध झाले. कोलकत्याहून मणिराम ह्या रणनीतीचं सूत्रसंचालन करत होते. परंतु ब्रिटीश पोलीसांना या कटाचा सुगावा लागला आणि अटकसत्र सुरु झालं. मणिराम दिवाण यांना कोलकत्यात अटक करण्यात आली. २६ फेब्रुवारी १८५८ रोजी त्यांना जाहीरपणे फाशी देण्यात आलं. त्याचे पडसाद आसामात उमटले. चहामळ्यातल्या शेकडो कामगारांनी बंद पाळला. लोकांचा असंतोष उफाळून आला. या आंदोलनाला ना नेता नव्हता की संघटना वा कार्यक्रम. त्यामुळे हा असंतोष सहजपणे चिरडण्यात आला.

ब्रिटीशांच्या आगमनापूर्वी आसामात बेबंदशाही माजली होती. शैव वा शाक्त आणि वैष्णव या दोन पंथांमधील संघर्षाने राज्य यंत्रणा खिळखिळी झाली होती. त्यातच ब्रह्मदेशातून होणार्‍या आक्रमणांमुळे अराजकसदृश्य स्थिती होती. कचार संस्थानचं वार्षिक उत्पन्न एक लाख रुपये होतं ते  १८२६-२७ या काळात २० हजार रुपयांवर आलं. राजाची ही स्थिती असेल तर सामान्य जनांचे काय हाल असतील ह्याची कल्पना करता येते. ब्रह्मदेशातून होणार्‍या या हल्ल्यांपासून बचाव करण्यासाठीच अहोम राजाला ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीला पाचारण करावं लागलं. कंपनीच्या सैन्याने ब्रह्मदेशातून होणार्‍या आक्रमणांचा पुरता बंदोबस्त केल्यानंतरच आसामात शांतता प्रस्थापित झाली. आणि पुढे लवकरच कंपनीने अहोम राजांना बरखास्त करून आसामवर आपला अंमल प्रस्थापित केला. अहोम राजांनी ६०० वर्षे आसामवर राज्य केलं होतं. ब्रह्मदेशातून होणार्‍या आक्रमणांचा बीमोड करण्याची आर्थिक आणि लष्करी बळ त्यांच्याकडे नव्हतं. ह्या काळात आसामातील गावं स्वयंपूर्ण नसली तरी आत्मनिर्भर होती. पोटापुरतं उत्पन्न शेतीतून मिळत होतं. मात्र वरकड उत्पादन वा उत्पन्न नव्हतं. अहोम राजवटीत शेतसारा नव्हता. शेतकर्‍यांनी वर्षातले काही महिने राजदरबारासाठी कष्ट विकायचे अशी प्रथा होती. ही प्रथा गुलामगिरी सदृश्यच होती. शेतसारा नसल्याने साम्राज्याच्या रक्षणासाठी कायमस्वरुपी फौज उभारण्यासाठी सरकारी खजिन्यात पैसाच नव्हता. त्यामुळे कंपनीला सहजपणे आसामात प्रवेश मिळाला.
 कंपनीचं राज्यात शेतसारा आणि कर लावण्यात आले. कारण या प्रचंड भूप्रदेशातून मिळणार्‍या उत्पन्नामध्ये ब्रिटीशांना रस होता. त्यावेळी आसाममध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर जमीन उपलब्ध होती. ही जमीन एक तर पाणथळ होती किंवा मोठ्या प्रमाणावर अरण्यांनी व्यापलेली होती. फॉरेस्ट कायदा वा वनविधेयक आणून ब्रिटीशांनी वनसंपत्तीची लूट वा शोषण सुरु केलं. (महात्मा फुलेंनी शेतकर्‍य़ाचा असूड या ग्रंथात त्यावर कोरडे ओढले आहेत.) आसामात जंगल जमीन वहिताखाली आणण्याचं धोरण ब्रिटीशांनी अवलंबिलं. आसाम त्या काळात बंगालला जोडण्यात आला होता. मेमनसिंग, ढाका इत्यादी जिल्ह्यांमध्ये परिपत्रक काढून ब्रिटीशांनी शेतकर्‍यांना आसामात जमीन कसण्यासाठी येण्याचं आमंत्रण दिलं. जंगल जमीन वहिताखाली आणली तर एक वर्षासाठी शेतसारा माफ करण्यात आला. परिणामी आसामात परप्रांतीयांचा ओघ सुरु झाला. नेपाळी, बंगाली, संथाळ मोठ्या प्रमाणावर आसामात स्थलांतरित झाले. त्यांनी स्वतंत्र गावं वसवली. जंगल जमिनीवर चहामळ्यांनाही उत्तेजन देण्यात आलं. चहामळ्यांसाठी तर करमाफीची योजना होती. चहामळ्यांवर काम करायला मोठ्या प्रमाणावर मजूरांची गरज होती. त्यासाठी बिहार, ओडीशा, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बंगाल, मद्रास या प्रांतातील दुष्काळप्रवण भागातून प्रचंड प्रमाणावर मजूरांची आयात करण्यात आली. १९३१ सालापर्यंत आसामातील परप्रांतीयांची संख्या १३ लाख झाली. त्यावेळच्या आसामच्या लोकसंख्येमध्ये हे प्रमाण १/६ होतं. जवळपास १५ लाख एकर जंगल जमीन लागवडीखाली आणण्यात आली. परप्रांतीय आसामातील वनसंपत्तीचं बेसुमार शोषण करत आहेत या विषयावर आसामच्या विधिमंडळात १९३७ सालीच घमासांग चर्चा झाली. लोकसंख्या वाढली, शेती वाढली त्यामागोमाग व्यापारही वाढला. चहा कारखान्यांची सर्व यंत्रसामुग्री इंग्लडातून आयात करण्यात आली होती. चहामळ्यातील कामगारांचा शिधा आणि अन्य साहित्याचा पुरवढाही कोलकत्यातून व्हायचा. हा व्यापार, त्यासाठी लागणारा पतपुरवठा यासाठी कोलकत्यातून मोठ्या प्रमाणावर मारवाडी समाज आसामात आला. चहामळ्यांवरील कार्यालयात काम करण्यासाठी इंग्रजी शिक्षित बंगाली आले. वसाहतवाद म्हणजे काय तर एका प्रदेशातील लोकांनी दुसर्‍या प्रदेशात जाऊन तिथली जमीन आणि अन्य नैसर्गिक संसाधनांवर मालकीहक्क स्थापित करणं आणि तेथील राज्ययंत्रणा ताब्यात घेणं. आसाममध्ये राज्ययंत्रणा ब्रिटीशांच्या ताब्यात होती पण वसाहती झाल्या त्या परप्रांतीयांच्या अर्थातच भारतीयांच्या, जमीनीवर मालकी प्रस्थापित झाली परप्रांतीयांची. जंगलावर मालकीहक्क मिळाला ब्रिटीशांना वा परप्रांतीय भारतीयांना. सरकारात अर्थात नोकरशाहीत वरचष्मा राहिला परप्रांतीयांचा. आसामातील उच्चवर्णीय हिंदू (ब्राह्मण, कायस्थ), अहोम यांचे हितसंबंध त्यामुळे दुखावले गेले. अहोम तर सत्तेबाहेरच फेकले गेले होते. त्यांच्याकडे जमीन वगळता अन्य संसाधनंही नव्हती. त्या जमीनीचीही लूट ब्रिटीशांनी केली. वसाहतवादाची सुरुवात जरी ब्रिटीशांनी केलेली असली तरी त्याचा चेहरा भारतीयच राहिला. मार्क्सवादी दृष्टीने आसामी समाजातील वर्ग विग्रहाचं विश्लेषण करून अहोम आणि उच्च जातीय हिंदू यांनी आपल्या हितसंबंधांसाठी आसाम आंदोलन सुरु केलं असा निष्कर्ष अनेक अभ्यासकांनी काढला आहे. पण आपणच आपल्या भूमीवर अल्पसंख्य होत आहोत ह्याचा आसामी जनतेला धक्का बसला होता हे नाकारण्यात अर्थ नाही. स्वातंत्र्योत्तर काळात विशेषतः १९७१ च्या भारत-पाक युद्धानंतर लाखोंच्या संख्येने बांग्ला देशातून आसामात निर्वासित आले. फक्रुद्दीन अली अहमद ह्यांनीही या स्थलांतराला उत्तेजन दिलं होतं. त्यामुळेच आसाम आंदोलनाची रुजवात झाली. ऑल आसाम स्टुडंन्टस् युनियनच्या पोटात युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ आसामने जन्म घेतला. इंदिरा गोस्वामी यांच्यासारख्या ज्ञानपीठ विजेत्या लेखिकेलाही उल्फा या संघटनेबद्दल सहानुभूती होती, हे इथे ध्यानात घेतलं पाहीजे. आसाम आंदोलनात चहामळ्याचे कामगार सहभागी नाहीत असं मराठीमध्ये (दिनांक साप्ताहिक) सर्वप्रथम लिहिलं कुमार केतकरांनी. त्यांच्या लेखाचं शीर्षक होतं आसाम लढ्याचे पांगळे पाय. इंदिरा गांधी यांना सत्ताच्युत करण्याच्या अमेरिकेच्या जागतिक कारस्थानाचा एक भाग म्हणूनच कुमार केतकर आसाम आंदोलन वा देशातील कोणत्याही असंतोषाकडे पाहात होते. मणिराम दिवाण ह्यांच्या बलिदानानंतर म्हणजे १८५८ नंतर चहामळ्यातील कामगार स्वातंत्र्य आंदोलनातही सहभागी झाले नव्हते, होऊ शकले नव्हते ही बाब केतकरांनी मांडली नाही. कारण मग त्यांना आसाम प्रश्नाचं विश्लेषण आंतरराष्ट्रीय कटकारस्थानाच्या चौकटीत करता आलं नसतं. असो.
आसामात पोटापुरती शेती केली जायची. चहामळ्यांमुळे शेती पुरवठाप्रधान होऊ लागली. औद्योगिकरण झालेलं नव्हतं पण लोकांच्या आशा-आकांक्षामध्ये वाढ झाली होती. नैसर्गिक साधनसंपत्तीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आसामातील विविध वांशिक गटांमध्ये रस्सीखेच सुरु झाली. आसामी-बांग्ला देशी, आसामी-बंगाली, आसामी-बोडो, आसामी-कोच राजबंशी असे संघर्ष निर्माण झाले. चहामळ्यातील कामगार प्रामुख्याने आदिवासी जमातींमधले आहेत. आपला समावेश अनुसूचित जाती-जमातींमध्ये करण्यात यावा यासाठी त्यांनी आंदोलन सुरु केलं. अर्थव्यवस्था जशी बदलू लागते तसे राजकीय-सामाजिक संघर्ष तीव्र होऊ लागतात. आता आसामातील शेती पुरवठा प्रधानतेकडून मागणीप्रधानतेकडे वाटचाल करू लागली आहे. २०११ साली तांदळाचं सर्वाधिक उत्पादन आसामात झालं. प्रणव मुखर्जींनी हरित क्रांती पूर्वेकडे नेण्याची घोषणा करून जी आर्थिक तरतूद २०११ सालच्या केंद्रीय अर्थसंकल्पात केली त्याचा हा परिणाम होता. ह्या वरकड उत्पादनामुळे शेती मागणीप्रधानतेकडे वेगाने वाटचाल करू लागेल. त्यातून अर्थातच नवे प्रश्न निर्माण होतीलच.
आसामातली जातिव्यवस्था बंगाल वा गंगा-यमुनेच्या खोर्‍यात असते तेवढी बंदीस्त नव्हती. अस्पृश्यता तर नव्हतीच. पण उर्वरित भारतातून लोकसंख्येचं मोठ्या प्रमाणावर स्थलांतर झाल्यानं जातिव्यवस्थाही आली. चहामळ्यांमध्ये तर अठरापगड जाती-जमातींचे लोक आले. त्यांचा पहिला संघर्ष आदिवासींशी झाला. बराक नदीच्या दक्षिणेकडील टेकड्या केवळ जंगलांनी व्यापलेल्या होत्या. लुशाई अर्थात मिझो जमाती तिथे शिकारीला यायच्या. पारंपारिक अर्थाने या टेकड्यांवरील जंगल त्यांच्यासाठी राखीव होतं. चहामळ्यांसाठी जंगल साफ करायला सुरुवात झाल्याने मिझो संतापले. त्यांनी वसाहतवाद्यांवर म्हणजे अर्थातच चहामळ्यांच्या कामगारांवर हल्ले सुरु केले. पुढे पोलिसांची राखीव कुमक मागवून त्यांचा बंदोबस्त करण्यात आला. इनर लाइन परमिट अर्थात टेकड्यांवरील जंगलात जायचं तर परवाना पद्धत सक्तीची करून ब्रिटीशांनी आदिवासींना मुख्य प्रवाहापासून तोडूनच टाकलं.         
चहामळ्यामध्ये जातिव्यवस्था पाळली जाते. उच्चवर्णीय कामगारब्राह्मण, भूमिहार, राजपूत आपली आडनावंतिवारी, चौबे, राय, सिंग, अभिमानाने मिरवतात. अनेक ठिकाणी ब्राह्मण घरी आला तर त्याचे पाय तीन वेळा धुण्याची प्रथा आहे. ते पवित्र पाणी आपल्या अंगावर शिंपडून स्वतःलाही शुद्ध करण्याचा विधी पाळला जातो. दुशाद, बावरी, कालिंदी, रविदास या जातींच्या व्यक्तिंचा स्पर्श झालेलं पाणी अन्य जातींनाग्वाला (गवळी), कोयरी, कुरमी, राजपूत यांना चालत नाही. एक गाव, एक पाणवठा चहामळ्यांमध्ये नाही. चहामळ्यांमध्ये असलेला पाणक्या पूर्वास्पृश्य जातींचा चालत नाही. गवळी, कोयरी, कुर्मी, बरोई यांच्या हातचं पाणी सर्वांना चालतं त्यामुळे पाणक्या अर्थात मजूरांना पाणी देणारा या जातींचा असतो. धोब्याकडे शिजवलेलं अन्न रविदास खात नाहीत. धोबीही रविदासांच्या घरी जेवत नाहीत. मुंडाच्या घरात संथाळ जेवत नाहीत. प्रत्येक जातीची पंचायत आहे. आंतरजातीय विवाह केल्यास जात पंचायती दंड ठोठावतात. शिक्षणाचं प्रमाण कमी त्यातही गळतीचं प्रमाण अधिक आहे. भुवन व्हॅली टी इस्टेटमध्ये २०११ सालात दारिद्र्याने १५ कामगार मृत्युमुखी पडले. कुपोषण आणि वैद्यकीय मदतीचा अभाव ही त्याची कारण आहेत असं आसाम टाईम्स या वर्तमानपत्राने म्हटलं आहे. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी चौकशी समिती नेमलीय. स्वातंत्र्यपूर्व काळात युरोपियनांच्या मालकीचे चहामळे असताना या कामगारांची स्थिती अतिशय शोचनीय होती. त्यांना कोंडवाड्यात बंदच करून ठेवलं होतं. अजूनही त्यांच्यातील शिक्षणाचं प्रमाण वाढलेलं नाही. चहामळ्यातील कामगारांच्या वस्त्यांना भेट दिल्यावर व्ही. एस. नॉयपॉल अतिशय व्यथित झाले. त्यांचे पूर्वज वेस्ट इंडीजमधल्या मळ्यांवर काम करण्यासाठी भारतातून स्थलांतरित झालेले असल्याने नॉयपॉल ह्यांना या कामगारांबद्दल विशेष ममत्व होतं. चहामळ्यांवर आता जरी भारतींयाची मालकी असली तरिही कामगारांच्या जीवनात फारसा बदल झालेला नाही. भारतातल्या जातिव्यवस्थेने कामगार आणि मालक यांना आपल्यात सामावून घेतलं आहे. कामगार आणि चहामळ्यांचे मालक-संचालक अशा दोन जातीच आहेत. कामगार कुटुंब वा जातिमध्ये बंदिस्त तर मालक-संचालक आपल्या क्लबांमध्ये दंग. मालक-संचालकांनी आपल्या पूर्वसुरींचं अर्थात ब्रिटीशांचं अनुकरण केलं आहे. केवळ शर्ट, शॉर्ट एवढ्यापुरतंच नाहीतर त्यांचे आत्मेही ब्रिटीशांचेच असावेत. बहुसंख्य कामगार निरक्षर, दारूच्या आहारी गेलेले, परंपरा हरवलेले, अनेक समूह तर स्वतःची भाषाही गमावून बसले आहेत. हे सर्व वेस्ट इंडीजमध्येही पाह्यला मिळतं. ह्यांची स्वतंत्र गावं नाहीत तर इस्टेटीच्या वळचणीला उभ्या राह्यलेल्या वस्त्या आहेत, असं व्ही. एस. नॉयपॉल ह्यांनी नोंदवलं आहे.

चहा कामगार आपल्या सांस्कतिक परंपरा गमावून बसले आहेत हे नॉयपॉल ह्यांचं म्हणणं कामगारच स्वीकारणार नाहीत. चहामळ्यांतील कामगारांमध्ये केवट, मल्लाह हे गंगापूजन करणारे, नागपूजा बंगालातून आली. ओरॉन चंद्रपूजक, मल्लाह नौकापूजनही करतात. रामनवमी, फागुआ, अक्षय तृतिया, दसरा, कालीपूजा, दुर्गापूजा, दिवाळी, होळी, जन्माष्टमी इत्यादी अनेक गंगाखोर्‍यातले सण आसामात साजरे होऊ लागले. बिहू हा आसामचा राष्ट्रीय सण. देशातच नव्हे तर जगभरात जिथे असतील तिथे आसामी लोक बिहू साजरा करतात. चहामळ्यातल्या कामगारांमध्ये आदिवासींची संख्या मोठी असल्याने चहामळ्याच्या कामगार वस्ती वा गावांमध्ये एक नाचघर असतंच. नृत्य आणि गाणं ह्याशिवाय कोणताही सण साजरा होत नाही. चहामळ्यातील कामगारांच्या गाण्यांनी हिंदी चित्रपट संगीतालाही योगदान दिलं आहे. सलील चौधरींचा पिंड चहामळ्यातील कामगारांच्या संगीतावरच पोसला गेला होता. भूपेन हजारिका यांनी तर बंगाली, आसामी, चहामळ्यातील कामगार, ईशान्य भारतातील आदिवासी ह्यांच्या लोकसंगीतातून अनेक धुन आणि ताल उचलले आणि भारतीय संगीत समृद्ध केलं.
एक कली दो पत्तीयाँ
नाजूक नाजूक उँगलियाँ
तोड रही रतनपूर बागिचे में.....
या गुलजार यांच्या गीताला भूपेन हजारिका ह्यांनी दिलेलं संगीत त्याची उत्तम साक्ष आहे.
दोन पान आणि एक पानकळी नाजूकपणेच खुडावी लागते. त्याचा संबंध चहाच्या चवीशी असतो. अशी खुडलेली पानं लगोलग फॅक्टरीमध्ये प्रक्रियेसाठी रवाना केली जातात. सच्छिद्र सिलींडरमध्ये ही पानं गरम हवेच्या झोतात सुकवली जातात. त्यानंतर फिरत्या पृष्ठभागावर वाटली जातात. त्यानंतर दळली जातात. सुकवून पुन्हा दळून गाळली जातात. अखेरीला त्यांच्यावर स्वाद प्रक्रिया करण्यात येते. चहाचे दोन प्रमुख प्रकार आहेत. ग्रीन टी आणि ब्लॅक टी. ग्रीन टी बनवण्याच्या प्रक्रियेत पानांचं फर्मेंटेशन करत नाहीत. ब्लॅक टी मध्ये दोन उपप्रकार आहेत. ऑर्थोडॉक्स टी. ह्यामध्ये चहाची पानं असतात. तर सीटीसी (क्रशिंग, टिअरिंग, कर्लिंग) म्हणजे चिरडून, फाडून, वळवलेली पानं. प्रतिकारशक्ती वाढवणं, रक्तदाब संतुलित ठेवणं, हृदयविकारांवर आणि वजन कमी करण्यासाठी चहा गुणकारी आहे.  प्रत्येक प्रकारच्या चहाचे गुणधर्म, चव आणि स्वाद यामध्ये फरक असतो. देशाच्या राष्ट्रीय पेयाचा मान चहाला देण्यात यावा अशी मागणी अलीकडे जोर करू लागली आहे. चीन आणि इंग्लड या दोन देशांनी चहाला राष्ट्रीय पेयाचा दर्जा दिला आहे. पाकिस्तानचं राष्ट्रीय पेय उसाचा रस आहे तर स्कॉटलंडने व्हिस्कीला हा दर्जा दिला आहे. जागतिक उत्पादनात आसामातील चहाचा वाटा १३ टक्के आहे तर भारतातील ५१ टक्के उत्पादन आसामात होतं. आसामच्या चहा उद्योगाची वार्षिक उलाढाल ५००० कोटींची आहे. पाच लाख कामगारांना कायमस्वरुपी तर पाच लाखांना हंगामी रोजगार आसामचा चहा उद्योगामुळे मिळतो. अखिल भारतीय पातळीवर हा आकडा अर्थातच दहा लाखांच्या घरात आहे. चहा हा केवळ एक जिन्नस वा उत्पादन नाही. चहा ही एक संस्कृती आहे. म्हणून चहाला राष्ट्रीय पेयाचा दर्जा द्यावा अशी मागणी आसामातील चहामळ्यांच्या संघटनांनी केली आहे. योजना आयोगाचे उपाध्यक्ष, माँटेकसिंग अहलुवालिया यांनी मागच्या महिन्यातच या मागणीला पाठिंबा दिला आहे. चहाला राष्ट्रीय पेयाचा दर्जा मिळाला तर त्याचा संबंध भारताच्या पहिल्या स्वातंत्र्य लढ्याशी, त्यामध्ये फासावर गेलेल्या देशभक्ताशी आणि भारतीय चहाचा शोध लावणार्‍या मणिराम दिवाण यांच्याशी आहे. 

5 comments:

  1. Sunil as usal lot of info with gr8 style. Maniram DIWAN WAS A UNKNOWN TO ME TILL NOW. THANKS FOR ELLING HIS CONTRIBUTION.

    ReplyDelete
  2. व्वा मित्रा, तुझे हे आभारभन्नाट "कषायपेय आख्यान" ते प्राशन करीत असतानाच वाचले. स्वाद वाढला. अर्थात वाचनाचा आणि पेयाचाही..... अभी इस बातपे और एक कटिंग हो जाय...

    ReplyDelete
  3. अप्रतिम व्यासंग ! छान माहिती मिळाली .

    ReplyDelete
  4. लेख छानच आहे. तेवढं ते अमृत तुल्य चहाच्या दुकानाबद्दल काही माहिती हवी होती. तसंच बोस्टन टी पार्टी अमेरिकन क्रांति चा उल्लेख पाहीजे होता.

    ReplyDelete
  5. वाहव्वा! फार छान लेख.

    ReplyDelete