Blog Archive

Thursday 31 December 2009

सुरमा नदीच्या अलिकडले आणि पलिकडे........

ब्रह्मपुत्रा नदी हिमालयाच्या निर्मितीच्याही आधीपासूनची आहे, असं विकिपिडीयात म्हटलंय. हिमालयाची निर्मिती व्हायला सुरुवात झाली वायव्य दिशेकडून म्हणूनच तिथे त्याची उंची सर्वाधिक आहे. ईशान्येकडचा हिमालय हा तुलनेने नवा समजला जातो. त्यामुळेच ईशान्येकडच्या राज्यांमधल्या टेकड्या ठिसूळ आहेत, असं बेदब्रत लोहकर या आसाम ट्रिब्यूनच्या सहसंपादकाने सांगितलं. अरुणाचल प्रदेशातल्या नद्यांवर धरणं बांधून वीज निर्मिती करण्यातला धोका नेमका तोच आहे. आधीच ईशान्य भारत हे भूकंप प्रवण क्षेत्र आहे त्यात ठिसूळ टेकड्या, तिथे धरण फुटलं तर आसामला पुराचा धोका आहे, असं त्याचं म्हणणं होतं.
ब्रह्मपुत्रा नदी आसामात पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते. पूर्वेकडचा प्रदेश अधिक उंचीवर आहे. त्यालाच म्हणतात वरचा आसाम (अप्पर आसाम) तर पश्चिमेकडच्या प्रदेशाला म्हणतात खालचा आसाम (लोअर आसाम). दिब्रुगढ, तिनसुखिया, सिबसागर, जोरहाट, गोलघाट, नागाव, लखीमपुर हे आणि इतर जिल्हे वरच्या आसामात येतात तर कोक्राझार, बोंगाईगाव, गोलपारा, दरांग, कामरुप, नलबारी, बारपेटा हे जिल्हे खालच्या आसामात येतात.

कोळसा, खनिज तेल, नैसर्गिक वायू, चहामळे वरच्या आसामात आहेत. अर्थातच वरचा आसाम अधिक विकसीत आहे. आसामवर ६०० वर्षं राज्य करणार्‍या अहोम घराण्याची राजधानी सिबसागरला वरच्या आसामात होती. गोहाटी कामरूप जिल्ह्यात आहे. म्हणजे लोअर आसाममध्ये.

आसामी कोण हा प्रश्न आसामात अजूनही समाधानकारकरित्या सुटलेला नाही. आसामच्या पश्चिमेला म्हणजे मानस नदीच्या किनार्‍याला बोडो ही जमात बहुसंख्येने आहे. स्वतंत्र बोडोलँडची मागणी याच प्रदेशातून झाली होती. त्याशिवाय आसामात मैदानी प्रदेशातील आदिवासी जमातीही आहेत, उदा. तिवा, लालुंग, मिशी वगैरे. जवळपास प्रत्येक आदिवासी जमातीची स्वतंत्र बोली वा भाषा आहे. आदिवासी आणि नागर वा ग्रामीण अशी ढोबळ विभागणी केली तर अहोम, आसामी, बंगाली हे दुसर्‍या कोटीत—नागर वा ग्रामीण, येतात.

आम्ही शिलाँगला गेलो होतो माझ्या मित्राच्या—अभिजीत देब, लग्नाला. तो बंगाली. म्हणजे त्याचे वडील पूर्व बंगालातून येऊन शिलाँगमध्ये स्थायिक झाले. शिलाँगला लबान या भागात बंगाल्यांचीच वस्ती आहे. लग्नासाठी त्याचे अनेक नातेवाईक सिल्चरहून आले होते. सिल्चर म्हणजे बराक खोर्‍याची राजधानी. मणिपूर आणि सध्याचा बांगला देश यांच्यामध्ये एक चिचोंळी पट्टी आहे. हेच बराक खोरं. बराक नदी आसाम-मणिपूरच्या सीमेवर उगम पावते आणि मिझोराममधून आसामच्या मैदानात येते. सिल्चरला तिला दोन फाटे फुटतात--सुरमा आणि कुसिवारा, दोन्ही प्रवाह पुढे बांगला देशात गेल्यावर ब्रह्मपुत्रेला जाऊन मिळतात. बराक खोर्‍याच्या उत्तरेला असणार्‍या टेकड्यांवर कचार या आदिवासी जमातीचं राज्य होतं. म्हणजे अहोम राजांनी आसामवर ६०० वर्षं राज्य केलेलं असलं तरीही बराक खोर्‍यावर बंगाल्यांचंच वर्चस्व होतं. आसामची राजभाषा आसामी आहे पण बराक खोर्‍यातल्या जिल्ह्यांचा कारभार बंगाली भाषेत चालतो. आसाममध्ये होणारी बांग्लादेशीयांची घुसखोरी याच बराक खोर्‍यातून होते. नदी पार केली दुरर्‍या देशात सहजपणे पोचता येतं.

आसामात चहामळ्यांची लागवड सुरु झाली ती वरच्या आसामात. चहामळ्यांमध्ये गुंतवणूक केली ब्रिटीशांनी. त्यासाठी ईस्ट इंडिया कंपनीने जमीन संपादन, जमीन मालकीचे कायदे केले आणि चहामळ्यांना प्रोत्साहन दिलं. चहाच्या उत्पादनातली चीनची मक्तेदारी मोडून काढण्यासाठी आसामात चहाची लागवड करण्याचा निर्णय ईस्ट इंडिया कंपनीने घेतला. चहामळ्यांची जमीन तयार करणं आणि इतर कामांसाठी झारखंड, छत्तीसगड, उडीसा या प्रांतांतून त्यावेळी आदिवासींना अक्षरशः वेठबिगार म्हणून पकडून आणण्यात आलं आणि गुलामासारखं राबवण्यात आलं. चहामळ्यात काम करण्यासाठी लाखोंच्या संख्येने मजूर आयात करण्यात आले त्यांच्या अन्नाची व्यवस्था करण्याकरता बंगाली शेतकर्‍यांना आसामातील जमीन लागवडीखाली आणण्यासाठी प्रोत्साहन देण्यात आलं. पूर्व बंगालातील बहुसंख्य मुस्लिम आसामात शेती करू लागले. त्यांची स्वतंत्र गावंच वसवण्यात आली. नेल्ली आणि त्या परिसरातील गावं अशीच वसली. बांगला देशी निर्वासितांच्या संख्येत सत्तरच्या दशकात कित्येक पटींनी वाढ झाली.
मेघालय, नागालँड, अरुणाचल प्रदेश ही राज्य १९५० सालापर्यंत आसामातच होती. त्यानंतर हळू हळू त्यांना आसामातून वेगळं काढण्यात आलं. राज्याचं संकुचन झालं, औद्योगिक विकासाची गती अतिशय मंद, विविध भाषिक आणि वांशिक गट, त्यात धर्मांच्या विविधतेची भर, शेतीवर अवलंबून असलेली म्हणजे जेमतेम पोटापुरतं पिकवणारी अर्थव्यवस्था. काँग्रेसने इंदिरा गांधींच्या काळात मध्यममार्गापासून फारकत घेत सत्तेवरील पकड घट्ट केल्यामुळे उजव्या आणि डाव्या अतिरेकी संघटना भारतात फोफावल्या. ऐंशीच्या दशकात आसाममधील विद्यार्थी आंदोलन म्हणूनच पेटलं. दडपशाही केल्यामुळे आंदोलन चिघळलं. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातून जसं शिवसेना नावाचं भूत मुंबईच्या (त्यानंतर महाराष्ट्राच्या) मानगुटीला बसलं तसंच आसाम आंदोलनातच उल्फा (युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ आसाम) ची मूळं रोवली गेली.

आसामातील आदिवासींच्या वाट्याला आता स्वायत्त मंडळं आली आहेत. आदिवासींना त्यांच्या प्रदेशातील नैसर्गिक संसाधनांवर काहीप्रमाणात अधिकार मिळाला आहे. त्यामुळे स्वतंत्र बोडोलँडच्या मागणीला शांत करता आलं. परंतु आता कोच राजबंशी आणि कचारी हे समूह स्वतंत्र राज्याची मागणी करू लागले आहेत. जग जवळ येतंय, जगाची बाजारपेठ एक होतेय पण आपण मात्र राजकीयदृष्ट्या विखंडीत होऊ लागलो आहोत.

Tuesday 29 December 2009

नेल्ली

शिलाँगहून काझीरंगाला मोटारीने जात होतो. गुगुल मॅपवर नेल्ली हे गाव उमटलं.
१९८३ सालच्या फेब्रुवारी महिन्यात नेल्लीचं हत्त्याकांड घडलं. या हत्त्याकांडाचा निषेध करण्यासाठी मुंबईत गिरगाव चौपाटीला अनेक राजकीय पक्ष आणि संघटना यांनी एक दिवसाचं उपोषण केलं. माधव साठे या कार्यक्रमाच्या आयोजकांमध्ये होता. त्या उपोषणात मी आणि विजय (माझा चुलतभाऊ) सहभागी झालो होतो. अनेक पक्षांनी आसाममधील परदेशी (म्हणजे बांगला देशी) स्थलांतरितांसंबंधात आपआपल्या भूमिका मांडल्या. त्यावेळी टेलिव्हिजन बातम्यांसाठी कुणी बघायचं नाही. वृत्तपत्रं, साप्ताहिकं राजकीय-आर्थिक-सामाजिक प्रश्नांवर भरपूर लिखाण प्रसिद्ध करत असत. रुपा चिनाय त्यावेळी संडे ऑब्झर्वरमध्ये आसाम आंदोलनावर वृत्तांत लिहित असे. अरुण शौरी बहुधा इंडिया टुडेमध्ये होता. आसाम आंदोलन विशेषतः नेल्ली हत्याकांडावर त्याने लिहिलेले वृत्तांत शोध पत्रकाकारिता म्हणून गणले गेले होते. वातावरण काँग्रेस म्हणजे इंदिरा गांधींच्या विरोधात तापत होतं. कुमार केतकरने ईशान्येचा भारताशी काडीमोड अशी लेखमाला दिनांक साप्ताहिकामध्ये प्रसिद्ध करायला सुरुवात केली होती. आसाम लढ्याचे पांगळे पाय या शीर्षकाचा लेख कुमारने लिहिला होता. ऑल आसाम स्टुडन्ट युनियन (आसू)च्या विरोधात कुमारने आपली लेखणी परजली होती. आसाम आंदोलनात चहामळ्यात काम करणारे कामगार सहभागी नाहीत, अशा आशयाची मांडणी त्याने या लेखात केली होती.
१९८३ च्या फेब्रुवारी महिन्यात आसामात विधानसभेच्या निवडणुका घेण्यात आल्या. आसूने या निवडणुकांना विरोध केला. बेकायदेशीररित्या आसामात स्थायिक झालेल्या बांगला देशी नागरिकांची नावं मतदारयादीतून काढल्याशिवाय निवडणुका घेऊ नयेत अशी आसू आणि आसाम आंदोलकांची मागणी होती. राष्ट्रपती राजवट वाढवायची झाल्यास घटनादुरुस्ती करावी लागेल आणि त्यामुळे निवडणुका कोणत्याही परिस्थितीत घेतल्या जातील, अशी निर्णय त्यावेळच्या पंतप्रधान, इंदिरा गांधी यांनी जाहीर केला होता. या निवडणुकांमुळे आसामात हिंसाचार उफाळून आला. निवडणुक काळात आसूचे ५०० च्या वर कार्यकर्ते ठार झाले. नागाव जिल्ह्यात १४ फेब्रुवारीला मतदान झालं. बांगला देशी नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर मतदान केलं अशी कुजबूज आणि त्यानंतर चर्चा आसामी लोकांमध्ये सुरु झाली. रातोरात वातावरण तापलं. ढोल बडवत हजारो लोक (पोलिसांच्या शब्दांत आसामी) नेल्ली गावावर चालून गेले. तिथल्या ठाणेदाराने नागाव पोलिसठाण्याला तार केली, तात्काळ मदत पाठवा. पण नागावहून पोलिसांची कुमक रवाना झाली नाही. १८ फेब्रुवारीला हजारो लोकांनी १४ गावांवर हल्ला चढवला. केवळ सहा तासात हजारो लोकांना ठार केलं. भाले, तलवारी, कोयते, काठ्या-लाठ्या या हत्यारांनी. घर पेटवली. मृतांचा आकडा नेमका किती हे अजूनही कळलेलं नाही. काहिंच्या मते २१९१ तर दिगंत शर्मा याने आपल्या पुस्तकात म्हटल्याप्रमाणे १८१९ आणि तहलकाच्या ताज्या अंकानुसार ३३००. अर्थात नेल्ली आणि परिसरातले लोक तर पाच हजार लोकांचं शिरकाण करण्यात आल्याचं सांगतात. मृतांमध्ये बहुसंख्येने लहान मुलं आणि बायकांचा समावेश होता. ही सर्व गावं मुसलमानांची आहेत. मृतांच्या नातेवाईकांना पाच हजार रुपये नुकसान भरपाई जाहीर करण्यात आली तर जखमींना दीड हजार रूपये.
या हत्याकांडाला जबाबदार कोण याचा उलगडा अजूनपर्यंत झालेला नाही. निवडणूक लादणारं केंद्रसरकार की आंदोलक, आंदोलनातील रा.स्व.संघाच्या जवळचे लोक, की आणखी कोण. असं म्हणतात की आसूच्या कार्यकर्त्यांनी तिवा जमातीच्या लोकांना मुसलमानांच्या विरोधात चिथावणी दिली. तिवा जमातीची अनेक गावं नागावमध्ये नेल्ली परिसरात आहेत. त्यांचा कारभार स्वायत्त जिल्हा मंडळांमार्फत चालवला जातो. आसाममध्ये विविध वंशांचे, धर्मांचे, प्रांतातले, जमातीचे, जातींचे, विविध भाषा बोलणारे लोक आहेत. बहुसंख्य गावांत एक जमात, एक धर्म, एक भाषा आहे. ७५ टक्के लोकसंख्या ग्रामीण आहे. नेल्ली आणि मुसलमानांच्या गावाचा विकास झालेला नाही, याला आम्ही जबाबदार नाही असं तिवा लोक सहजपणे सांगतात.
जागीनगरला चहासाठी थांबलो. नेल्ली हत्याकांडाबाबत तिथल्या पोलिसठाण्यात एकूण ६८८ गुन्हे नोंदवण्यात आले. मात्र त्यापैकी केवळ ३१० गुन्ह्यांबाबत आरोपपत्रं दाखल करण्यात आली. पुढे ते खटलेही मागे घेण्यात आले. या हत्याकांडाची चौकशी करण्यासाठी त्रिभुवनप्रसाद तिवारी आयोगाची नियुक्ती करण्यात आली. आयोगाने दिलेला अहवाल त्यावेळच्या काँग्रेस सरकारने वा त्यानंतरच्या आसाम गण परिषदेच्या सरकारने कधीही प्रसिद्ध केला नाही.
नेल्लीनंतर जवळपास एक वर्षांनी इंदिरा गांधींची हत्या झाल्यावर दिल्लीत शीखांचं हत्याकांड झालं. देशाच्या राजधानीतील शिखांची संख्या दोन हजारांनी कमी झाली. या हत्याकांडात ठार झालेल्यांच्या कुटुंबियांना सात लाख रुपये नुकसान भरपाई जाहीर करण्यात आली.
नेल्ली, दिल्ली त्यानंतर रामजन्मभूमी आंदोलनामुळे उसळलेल्या दंगली, काश्मीर, मणिपूर, गुजरात, मुंबई. दंगलखोरांवर कारवाई नसते, मृतांच्या आणि नुकसान भरपाईच्या रकमेत वाढ वा घट होते. नव्या पानांवर जुना इतिहास लिहीत आपली वाटचाल सुरु आहे.

Tuesday 22 December 2009

बाजार उठला.....

नीलांचल टेकडीवर कामाख्या मंदिर आहे। दोन वर्षांपूर्वीच मंदिराची डागडुजी झाली. रंगसफेती केली. २००५ साली मंदिराच्या घुमटाच्या बाजूला ड्रॅगन आणि अन्य वेगवेगळ्या प्रतिमा, चित्रं होती. अहोम राजांनी वेगवेगळ्या काळात ही सजावट केली, असं तेव्हा पराशर बारुआ म्हणाला होता. ( तो सिनेमॅटोग्राफर होता। त्याने तंत्रसाधनेवर एक डॉक्युमेंटरी केली होती. कामाख्या मंदिर आद्य तंत्रपीठ समजलं जातं. आम्ही एका तांत्रिकाला भेटलोही होतो.) कामाख्या मंदिरावरील चीनी, तिबेटी, म्यानमार येथील संस्कृतींचा प्रभाव या चित्रांतून आणि प्रतिमांमधून कळायचा. आता त्या चित्रांचा वा प्रतिमांचा मागमूस लागत नाही. तांत्रिक मात्र आसपास असतील. मंदिराच्या टेकडीवर अतिक्रमण भरपूर झालंय. पंड्यांची घरं वाढत चालली आहेत. त्याशिवाय इतर बांधकामंही होतायत, असं अनिरुद्ध म्हणाला. तो सहारा-समय या वृत्तवाहिनीचा पत्रकार आहे.
मंदिराच्या परिसरात कबुतरं खूप. डालग्यामध्ये कबुतरं विकायलाही ठेवली होती. भाविक मंदिरात येऊन कबुतरं सोडून देतात. त्याशिवाय बकरे होते. कामाख्या मंदिरात बकरे आणि रेडे बळी दिले जातात. आम्ही गेलो तेव्हाही बळी चढवण्याचा विधि सुरु होताच. प्राण्याचा बळी कसा देतात हे पाह्यची इच्छा होती पण हिंमत झाली नाही. मंदिराचे पंड्ये बकरे, रेडे यांचं मांस खात नाहीत. बळी दिलेल्या प्राण्यांचं मांस वेगळ्या जमातीचे लोक येऊन घेऊन जातात. कामाख्या मंदिरात लग्नंही होतात. कमी खर्चात लग्नं होतं म्हणे.
निलांचल टेकडीवरून गोहाटी शहराचा देखावा झकास दिसतो. ब्रह्मपुत्रेच्या दक्षिण किना-यावर म्हणजे तटावर वसलेलं हे शहर आता उत्तर किना-यावर—पटावर, वाढू लागलंय. सर्व सरकारी कार्यालयं म्हणे तिथेच हलवणार आहेत. आज ती ब्रह्मपुत्रेच्या दक्षिण किना-याला आहेत. दक्षिण किनारा मुंबईच्या मरिन ड्राइव्हसारखा सुशोभित करण्याची योजना आहे. नदी असो वा समुद्र, पाणी भूगोल बदलतं. मुंबईला दादरची चौपाटी समुद्राने गिळूनच टाकलीय. ब्रह्मपुत्रेच्या दक्षिण किना-याला चौपाटी तयार होतेय. म्हणजे नदीचा प्रवाह हळू हळू उत्तरेकडे सरकतोय. सराई घाटाच्यावर, सरकारी कार्यालयांच्या पुढे एक बाग होती. नदीच्या पात्रालगत रस्त्याला समांतर जाणारी. त्या बागेतून थेट नदीत उतरता येईल असे प्लॅटफॉर्म होते. तिथे वॉच टॉवर होते. तिथे उभं राह्यलं की गोड्या पाण्यातले डॉल्फिन निरखता यायचे. म्हणजे मासे दूर पाण्यात असायचे. ते पाण्याबाहेर तोंड काढायचे किंवा कधी कधी हवेत उड्या मारायचे. त्यांना गँजेटिक डॉल्फिन म्हणतात. २००५ साली ते मासे मी पाह्यले होते. त्या बागेच्या बाजूला एक बाजार भरायचा. किना-यावरच्या गावांतून शिडाच्या किंवा यांत्रिक होड्यांनी भाजीपाला, फळं, कोंबड्या, बदकं, कबुतरं, डुकरं, दूध, दही त्या बाजारात यायचं. निरश्या दूधाचं दही मी तिथे चाखलं होतं. नदी उत्तरेला सरकल्याने वॉच टॉवर्स आता वाळूच्या मैदानात उभे असलेले दिसतात. तिथला बाजारही उठला. होड्यांतून नेलेला माल छोटसं वाळवंट वा चौपाटी पार करून तिथवर नेणं खेडूतांना परवडत नाही. वाळूत बाजार मांडला तर तिथे गि-हाईकं येत नाहीत.

Monday 21 December 2009

सराई घाट

विमानतळाहून गोहाटी शहरात येताना वाटेतच निलांचल टेकड्या आहेत. एका टेकडीवर कामाख्या मंदिर आहे. ब्रह्मपुत्रेच्या काठाने अर्धचंद्राकृती वळण घेतल्यावर लागतो सराई घाट. नदी खाली आणि रस्ता वर. नदीत हाऊसबोटींवरची रेस्त्रां आहेत. नदी पात्रातल्या उमानंद मंदिराकडे जाण्यासाठी होड्या, मोटारबोटी तिथेच उभ्या असतात. ब्रिटीश व्हॉईसरॉय लॉर्ड नॉर्थब्रुक ढाक्याहून स्टीमरवरून इथेच उतरला होता. २७ ऑगस्ट १८७४ रोजी. तोपावेतो आसाम बंगालचाच भाग होता. लॉर्ड नॉर्थब्रुकने तो बंगालपासून वेगळा काढला. १९०५ साली लॉर्ड कर्झनने बंगालची फाळणी केली आणि पूर्व बंगालला आसाम जोडून टाकला. पुढे १९११ साली ही फाळणी रद्द झाली आणि आसामला पुन्हा स्वतंत्र प्रदेशाची मान्यता मिळाली. १९७२ पर्यंत आसामची राजधानी होती शिलाँग. मेघालय राज्य वेगळं काढल्यानंतर आसामची राजधानी गोहाटीला हलवण्यात आली. लॉर्ड नॉर्थब्रुकच्या स्वागतासाठी उभारलेल्या कमानीवरच ही माहिती देण्यात आलीय. या कमानीच्या भोवती छोटीशी बाग आहे. पाच रुपये प्रवेश फी आहे. या कमानीच्या आश्रयाने काही प्रेमी युगुलं गुजगोष्टी करण्यासाठी विसावलेली असतात.
१६३१ साली मुगलांनी आसामवर निर्वाणीची चढाई केली आणि त्यावेळी झालेल्या तहात अहोम राज जयध्वज सिंघाला अनेक अपमानास्पद अटी स्वीकाराव्या लागल्या. आपली मुलगी त्याला शाही जनानखान्यात पाठवावी लागली. २० हजार तोळे सोनं, त्याच्या सहापट चांदी आणि ४० हत्ती हा खंडणीचा पहिला हप्ता होता. तीन लाख तोळे चांदी आणि ९० हत्ती वर्षभरात देण्याची अट होती. या अटी पूर्ण होईपर्यंत काही दरबा-यांना मुगलांकडे ओलीस ठेवावं लागणार होतं. त्याशिवाय ब्रह्मपुत्रेच्या पश्चिम आणि उत्तरेकडील प्रदेशावर पाणी सोडावं लागणार होतं. असं म्हणतात की जयध्वज सिंघाचा मृत्यु या अपमानास्पद अटी स्वीकाराव्या लागल्यानेच झाला. मृत्युशय्येवर असताना जयध्वज सिंघाने राज्याची सूत्रं चक्रध्वज सिंघाच्या हाती सोपवली. मात्र त्यापूर्वी परभवाचा डाग धुवून काढण्याची आण घातली. चक्रध्वजसिंघाने जैंतिया, कचारी इत्यादी राज्यांसोबत असलेल्या संबंधांमध्ये बदल घडवून आणला. सैन्याच्या उभारणीची सूत्रं लाचित बोरफुकनकडे दिली. त्या सुमारास आग्रा दरबारातून आलेल्या ब्रेकिंग न्यूजने चक्रध्वज सिंघा आणि लाचित बोरफुकन यांना मुगलांच्या विरोधात बंड करण्याचा निर्धार पक्का केला. ही बातमी होती शिवाजी महाराजांच्या पलायनाची. चार-पाच जिल्ह्यांमध्ये राज्य असणारा शिवाजी जर मुगल सत्तेला आव्हान देऊ शकतो तर आसामने मुगलांचा निर्णायक पराभवच करायला हवा, असं त्या दोघांनीही मनावर घेतलं. १६६७ मध्ये लाछित बोरफुकनने गोहाटी मुगलांच्या ताब्यातून मुक्त केलं. लष्कर आणि आरमार दोन्ही सेनांनी या लढाईत भाग घेतला. परंतु ख-या युद्धाला तोंड फुटायला अवकाश होता. गोहाटीच्या पाडावाची बातमी दिल्लीला गेल्यावर औरंगजेबाने आसामवर स्वारी करण्यासाठी राम सिंगाची नियुक्ती केली. शिवाजी महाराजांच्या पलायनानंतर राम सिंगाला मिळालेली ही पनिशमेंट ट्रान्सफर होती असं काही आसामी इतिहासकार सांगतात. राम सिंगाला सर्वतोपरी मदत करण्याचे आदेश बंगालच्या सुभेदाराला म्हणजे शायस्ताखानाला मिळाले होते. त्याची बोटं तर दस्तुरखुद्द महाराजांनीच छाटली होती.
सुमारे ६० हजारांची फौज आणि ४० आरमारी नौका घेऊन राम सिंग आसामच्या मोहिमेवर आला. कोच बिहारची सेनाही मुगल फौजेला येऊन मिळाली. ही खबर मिळाल्यावर लाछित हबकला. एवढ्या प्रचंड फौजेला नमवणं सोप नव्हतं. अशक्य ते शक्य करून दाखवण्याची जबाबदारी आपल्यावर आलीय हे जाणून तो कामाला लागला.
ब्रह्मपुत्रेच्या दक्षिण किना-यावर वसलेलं गोहाटी शहर हे टेकड्यांच्या रांगांनी वेढलं आहे. तिथे गनिमी काव्याने मुगलांना रोखण्याची व्यूहरचना लाचितने केली. निर्णायक लढाई ब्रह्मपुत्रा नदीत होणार होती. ब्रह्मपुत्रेच्या पात्राची रुंदी सराईघाटाकडे सर्वात कमी म्हणजे १ किलोमीटर होती. त्यामुळे तिथे मुगल आरमाराला कोंडीत पकडण्याची व्यूहरचना लाछितने केली. त्याचा अंदाज अचूक ठरला. अहोम सैन्याने टेकड्यांच्या आश्रयाने मुगल सैन्याला रोखून धरल्याने राम सिंगाने आरमाराला आगेकूच करण्याचा आदेश दिला. निलांचल टेकड्या आणि सराईघाट यांच्या दरम्यानं असणा-या अर्धवर्तुळाकार किना-यावरील वाळूच्या ढिगा-यांवर मोर्चे बांधलेल्या अहोम सैन्याचा प्रतिकार मोडून काढून मोगल सैन्य किना-यावर उतरणार होतं. हे पाह्यल्यावर लाछित बोरफुकनच्या अंगात वीरश्री संचारली. तो आजारी होता परंतु नौकेवर स्वार होऊन तो मोगलांवर तुटून पडला. आणखी सात नौकांना त्याने आगेकूच करण्याचा आदेश दिला. त्याचं धैर्य पाह्यल्यावर माघारी वळणा-या नौकाही मोगल सैन्यावर तुटून पडल्या. अहोम सैन्याने पराक्रमाची शर्थ केली आणि मोगलांना मागे लोटले. अहोम राज्याच्या सीमेपर्यंत म्हणजे आजच्या मानस राष्ट्रीय उद्यानापर्यंत लाचितने त्यांचा पाठलाग केला. या लढाईत आसामला खाँसी, जैंतिया, नागा, कचारी यांचीही साथ मिळाली. भारतीय सैन्यामध्ये सराईघाटाच्या लढाईचा, व्यूहरचनेचा, युद्धकौशल्याचा आणि लाचितच्या नेतृत्वाचा अभ्यास केला जातो. पुण्याच्या राष्ट्रीय संरक्षण अकादमीत लाचित बोरफुकनचा पुतळा आहे.
सराईघाटची निर्णायक लढाई जिंकल्यानंतर वर्षभरातच लाचित बोरफुकन आजारपणाने मृत्यु पावला. त्याच्या वारसदारानेच पुढे फितुरी करून गोहाटी पुन्हा मोगलांच्या हाती सोपवलं. १६८० पर्यंत मोगलांचा गोहाटीवर ताबा होता.
सराईघाटावर लाछित बोरफुकनचा पुतळा वा स्मारक हवं होतं. पण तिथे आहे लॉर्ड नॉर्थब्रुकच्या स्वागतासाठी उभारलेली कमान. १८७४ साली वाळूच्या ढिगावर उभी करण्यात आलेली ही कमान आता कलते आहे. आसाम आंदोलन १९८० च्या सुमारास सुरु झालं. लाचित बोरफुकनचा आणि सराई घाटाच्या लढाईचा विस्मृतीत गेलेला इतिहास त्यानंतर जवळपास दहा वर्षांनी वर्तमानात आला. मोगल, ब्रिटीश, बंगाल, कोच बिहार, कचारी, नागा, खाँसी-जैंतिया आणि अर्थातच अहोम-आसामी हे प्रवाह आजही आसामचा इतिहास घडवत आहेत. मोगल-ब्रिटीश म्हणजे दिल्ली आणि आसाम म्हणजे अहोम, आसामी, बोडो, कोच राजबंशी, बंगाली, बांग्ला देशी, चहामळ्यांमध्ये काम करणारे मजूर (परराज्यातले आदिवासी), सुतिया, कचारी, असे अनेक वांशिक गट, हे समीकरण त्यासाठी लक्षात घेतलं पाहिजे.

गोहाटी गुगुलिंग

ती क्षितिजाची रेषा, तिथे समुद्र आणि आकाश एकमेकांना भेटतात, सविता खिडकीतून बघत म्हणाली. मी वाचत होतो म्हणून केवळ हुंकार दिला. मला वाटलं ती गंमत करतेय.
काही वेळाने ती म्हणाली ती बघ एक बोट दिसतेय. मी डुलक्या घेत होतो. मला वाटलं ती गंमत करतेय. किंवा ढगाच्या आकाराबद्दल बोलतेय.
नंतर मी विचारलं, आपण कुठे आहोत काही कळतंय का.
सह्याद्रीच्या रांगा दिसतायत ती म्हणाली.
मी चमकलो. विमान ईशान्येला चाललंय, सह्याद्री कसा दिसेल, सातमाळ्याच्या डोंगररांगा असतील आणि खिडकीतून खाली पाह्यलं. विमान जवळपास २८ हजार फुटांवर असावं. सूर्याचा पिवळा प्रकाश आसमंतात भरून होता. वर आभाळ स्वच्छ होतं. खाली मात्र धूसर दिसत होतं. अधून-मधून डोंगरांच्या रांगा दिसायच्या. सविता मला क्षितिजाची रेषा दाखवू लागली. ती ढगांची रेषा होती. स्वच्छ आभाळातली. सविताला वाटलं ती पृथ्वीची कडा आहे, खाली निळा समुद्र आहे, एक बारका ढगाचा ठिपका तिला आगबोट वाटला होता. मी म्हटलं जमीन खाली असेल तर समुद्र कसा वर दिसेल, तेव्हा तिला नजरबंदी झाल्याचं कळलं.
कलकत्त्याला विमान धावपट्टीवर झेपावलं. आमच्या सिटा सर्वात शेवटच्या रांगेत होत्या. विमानाची चाकं धावपट्टीवर टेकल्यावर जोरदार धक्का बसला. खूप प्रवासी नव्हे पाहुणे उतरले. नवे पाहुणे विमानात आले. आता ४५ मिनिटांत गोहाटी, मी म्हटलं. त्या पाठोपाठ अनाउन्समेंट झालीच—हम गोहाटी जाएंगे...
लोकप्रिय गोपिनाथ बोरदोलोई विमानतळावर ११.३० वाजता उतरलो. विमानतळाबाहेर येईपर्यंत दुपारचे बारा वाजले होते. संध्याकाळ झाल्यासारखा प्रकाश होता. विमानतळाहून शहराकडे जाणा-या रस्त्यावर कमालीचा ट्रॅफिक होता. रस्त्याचं काम सुरु होतं. आमची टॅक्सी हळू हळू सरकत होती. ताशी ५ किमी वेगाने. आमचं हॉटेल २४ किमी दूर होतं. १९८४ आणि त्यानंतर २००५ साली मी गोहाटीला याच रस्त्याने गेलो होतो. विमानतळापासून हॉटेलपर्यंतचा प्रवास तेव्हा झकास वाटला होता. गेल्या चार-पाच वर्षात गोहाटी पूर्ण बदलून गेलंय. शहर वेगाने वाढत चाललंय. वाहनांनी भरून गेलंय. दुचाकी, तीन चाकी, चार चाकी, आठ चाकी, सर्व प्रकारची वाहनं होती. बैलगाड्या नव्हत्या. आसाममधले गाई-बैल अगदीच खुजे असतात. शेळ्या-मेंढ्याही फूट-दीड फूट उंचीच्या. १०-१५ शेळ्या आणि तितक्याच मेंढ्यांचा कळप हाकत दोन जण चालले होते. प्रत्येक जनावराच्या गळ्यात दोरी होती. सर्व दो-या एका मुख्य दोरीला बांधलेल्या होत्या. मुख्य दोरी ज्याच्या हातात होती, तो खेचेल त्या दिशेने प्राणी फरफटत जात होते.
हॉटेल होतं पलटन बाजारमध्ये. वाहनांची, माणसांची गर्दी. फेरीवाले, भाजीवाले, चहावाले, सिग्रेट-पानवाले. संध्याकाळी सराई घाटावर गेलो. तिथे पोचेपर्यंत अंधार पडला. अंधारात नदीवरच्या हाऊसबोटी आणि त्यामधली रेस्त्रां सस्पेन्स चित्रपटातले शॉटस् वाटले. नदीकाठाला लगटून असलेल्या फूटपाथने चालत होतो तर मुताचा वास. अंधार, धुकं. रस्त्यावरचे दिवे कोमेजलेले दिसत होते. रस्ता ओलांडला आणि दुस-या अंगाने चालत पुन्हा वर सराई घाटावर आलो. वाहनांना, फेरीवाल्यांना चुकवत चालावं लागत होतं. त्यात अंधार.
संध्याकाळी सहा वाजता पॅरॅडाईज रेस्त्रांमध्ये जेवायला गेलो. आसामी जेवण. तृप्त झालो. हॉटेलवर जाण्यासाठी मोबाईल फोनवरचा गुगुल मॅप पाह्यला. पॅरॅडाईजपासून आमचं हॉटेल दोन किलोमीटरवर होतं. आम्ही चालतच निघालो. गुगुल मॅप हातातच होता. चुकीचं वळण घेतलं की चार-पाच पावलं गेल्यावर लगेच कळायचं. अंधार, खड्डे, वाहनं, सिग्नल सर्वांना पायात घेत हॉटेलपर्यंत पोचलो.
त्यानंतर आसामात, मेघालयात असताना, गुगुल मॅपकडे विचारपूस करतच प्रवास करत होतो. गावाचं नाव गुगुल सर्चमध्ये टाकलं की त्यांच्या इतिहास-भूगोलाची माहिती देणा-या वेबसाईटस् हातातल्या पडद्यावर झळकायच्या. त्यांच्यावर नजर टाकली की डोक्यातले अनुभवाचे, स्मृतींचे दिवे पेटायचे. भेटणारी माणस त्यावर आणखी प्रकाश टाकायची. चाचपडत का होईना पुढे सरकता यायचं.
डिसेंबर ९, २००९

Wednesday 25 November 2009

मराठी भाषा-संस्कृतीची लक्तरं टांगण्याची स्पर्धा

मराठी वृत्तपत्रांमध्ये बातमीपेक्षा मताला अधिक किंमत दिली जाते. त्यामुळे वादाचं रुपांतर शिवीगाळीत आणि त्यानंतर हिंसेमधे होणं ही मराठी पत्रकारितेची—अत्रे-ठाकरे-वागळे, परंपरा आहे. प्रभाकर पाध्ये, गोविंद तळवळकर हे या परंपरेला अपवाद ठरणारे संपादक. वादामध्ये वैचारिक उंची आणि आत्मप्रतिष्ठा यांची जाणीवपूर्वक जपणूक त्यांनी केली. पाध्येंपेक्षा तळवळकरांनी बातमीदारीला प्राधान्य दिलं. परंतु मराठी पत्रकारितेचा मूळ प्रवाह अग्रलेखांचाच राह्यला. अग्रलेख, लेख यांमध्ये मत, भूमिका, दृष्टीकोन यांना महत्व असतं. सामान्यजनांना वस्तुस्थिती समजावून सांगणं गरजेचं असतं, राज्यकर्ते वा निर्णयकर्ते यांनाही त्यामुळे मार्गदर्शन होतं या समजूतीमुळे अग्रलेख वा संपादकीय पानावरील लेख यांना महत्व मिळतं. सामान्य वाचकाला सारासार बुद्धि नसते, त्याला स्वतःची मतं नसतात, असलीच तर क्षीण असतात, म्हणूनच त्यांना मार्गदर्शन गरजेचं असतं, ही त्याच भूमिकेची दुसरी बाजू आहे. अग्रलेख, मतं आणि दृष्टिकोन यांचं खंडन अनेकदा हिसंक प्रतिक्रियेने होतं. अशी हिंसक प्रतिक्रिया लिखाणातून व्यक्त होते तेव्हा त्याला चिथावणी म्हणण्याचा प्रघात आहे. एखादी संघटना संपादकाच्या घरावर, प्रसारमाध्यमाच्या कार्यालयावर हल्ला करून हिंसा करते तेव्हा तेव्हा त्याचं वर्णन प्रसारमाध्यमांच्या स्वातंत्र्यावरील हल्ला अशा शब्दांत केलं जातं. कोणाला कोणाचं कोणतं विधान हिंसक वाटतं हा केवळ बौद्धिक समजूतीचा नव्हे तर राजकीय हेतू आणि हितसंबंधांचाही प्रश्न असतो. सामान्य माणसाचा कोणताही प्रश्न गुंतलेला नसेल तर अशी भांडणं वा संघर्ष सामान्यजनांसाठी करमणुकीचे ठरतात.
शिवसेनेने प्रसारमाध्यमांवर अनेकदा हल्ले केले. केवळ निखिल वागळेच नव्हेत तर मराठी वर्तमानपत्राच्या एका विद्वान संपादकालाही पोलिस संरक्षण देण्यात आलं होतं. कारण काय तर त्यांनी शिवसेनाप्रमुखांशी अग्रलेखाच्या माध्यमातून वाद घातला होता. काँग्रेस सरकारने शिवसेनेच्या गुंडगिरीला वेळोवेळी संरक्षण दिलंय. त्यामुळेच शिवसेनाप्रमुखांना घटनाबाह्य सत्ताकेंद्र असं स्थान राजकारणात मिळालं. मराठी वा हिंदुत्वाच्या मुद्द्यापेक्षा कायद्याच्या कक्षेबाहेरचं शिवसेनाप्रमुखांचं स्थान आणि त्यामुळे सामान्य शिवसैनिकांना मिळणारं संरक्षण हा शिवसेनेच्या वाढीतला महत्वाचा घटक होता. राज ठाकरे नेमकं हेच करू पाहात आहेत. महाराष्ट्राच्या विधानसभेत आमदारांनी मराठी भाषेत शपथ घ्यावी असा फतवाच राज ठाकरे यांनी काढला होता. मागणी करणं वेगळं, विनंती करणं वेगळं आणि धमकी देणं वेगळं. मागणी वा विनंती घटनात्मक असते. धमकी घटनाबाह्य आहे. राज ठाकरेंच्या हुकूमाचं पालन सर्वपक्षीय आमदारांनी केलं हे बिंबवण्यासाठीच धमकी देण्यात आली. त्यासाठी अबू आझमी यांना टार्गेट करण्यात आलं. आयबीएन-लोकमतने आजचा सवाल या कार्यक्रमात अबू आझमी महाराष्ट्रातलं वातावरण बिघडवत आहेत का, असा प्रश्न टाकला होता. बहुसंख्य मराठी प्रेक्षकांनी अर्थातच त्याला होकारार्थी उत्तर दिलं होतं. राज ठाकरे यांच्या हुकूमाची तामीली न करणा-या अबू आझमींवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आमदारांनी विधानसभेतच हल्ला केला.
आपला वारसा मनसे प्रभावीपणे चालवते आहे असं वाटल्यामुळे असेल कदाचित् पण सेनेच्या कार्यकर्त्यांनी आयबीएन-लोकमतच्या कार्यालयावर हल्ला केला. निमित्त होतं शिवसेनाप्रमुखांच्यावर निखिल वागळे यांनी टीका केल्याचं. अबू आझमी यांच्यावरचा हल्ला असो की आयबीएन लोकमतच्या कार्यालयावर करण्यात आलेला हल्ला असो. सामान्य माणसाचा कोणता प्रश्न त्यामध्ये गुंतलेला आहे, बातमी हल्ल्यांचीच आहे. बाकी कसलीही नाही. मराठी माणसाची म्हणजे मतांची एजन्सी कोणाला मिळणार, सेनेला की मनसेला, या स्पर्धेतून हे हल्ले झाले आहेत. त्यामध्ये मराठी भाषेचा, प्रसारमाध्यमांच्या स्वातंत्र्याचा असा कोणताही मुद्दा गुंतलेला नाही. अबू आझमींवर मराठी शिकण्याची वा बोलण्याची सक्ती करून, मुंबई वा महाराष्ट्रातल्या बिहारी, उत्तर प्रदेशी लोकांना त्यांच्या राज्यात परत पाठवून मराठी भाषेचं, संस्कृतीचं भलं कसं होणार यावर एकाही मराठी वृत्तपत्रात चर्चा नाही. मराठी प्रसारमाध्यमं मनसेची तळी उचलून धरणार तर अन्य भाषांमधील प्रसारमाध्यमं मनसेच्या विरोधातली लाईन लावून धरणार. एक मराठी संपादक दुस-या मराठी संपादकावरील हल्ल्याला चिथावणी देणार, हल्ल्याचं समर्थन करणार, सुनील गावस्कर अधिक मराठी की सचिन तेंडुलकर, अशी चर्चा मराठी प्रसारमाध्यमं करू लागणार. मराठी भाषा, संस्कृतीची लक्तरं टांगण्याचीच स्पर्धा मनसे-शिवसेना संघर्षातून गतिमान झाली आहे.

Thursday 5 November 2009

हेडसेट

दोन आठवड्यांपूर्वी बंगलोरला गेलो होतो. तेव्हा हेडसेट कसा वापरायचा (हेडसेटला मी इअर फोन म्हणायचो) ते नदीमने सांगितलं. काही गाणी—नवी आणि जुनी, मोबाईल फोनमध्ये कॉपी केली. हान्स झिमर (ग्लॅडिएटर), ए. आर. रहमान (स्लमडॉग मिलेनेअर), फरिदा खानुमच्या गझल, किशोर कुमार, महंमद रफी, हेमंत कुमार यांची गाणी हेडसेटवर ऐकायला लागलो.

हान्स झिमर आणि रहमान यांचं संगीत हेडसेटवर ऐकताना वाद्यमेळातील प्रत्येक वाद्याचा ध्वनी स्पष्ट ऐकू येतो. आपण त्या वाद्यमेळा (ऑर्केस्ट्रा) च्या मधोमध उभे आहोत असा अनुभव येतो. एखादं वाद्य कानाच्या मागे वाजतंय तर दुसरं आपल्या पुढ्यात वाजतंय असा अनुभव येतो. कानामध्ये संगीत घुमत नाही तर डोक्याच्या मध्यभागी, डाव्या, उजव्या, खालच्या, वरच्या भागात संगीत वाजत राहतं. म्हणूनच इअर फोनला हेडसेट म्हणू लागले असावेत.

जुनी हिंदी गाणी ऐकताना हा अनुभव येत नाही. कारण त्या गाण्यांचं ध्वनिमुद्रण करण्याचं तंत्रज्ञान वेगळं होतं. वाद्यमेळ म्हणजे ऑर्केस्ट्रा पारंपारिक भारतीय संगीतात नाही. वाद्य असतात पण ती साथीला. केवळ वाद्यसंगीतही असतं पण वाद्यमेळ नसतो. त्यामुळे भारतीय संगीतात नाट्य नसतं. नाट्य निर्माण होतं वाद्यमेळातून. वेगवेगळ्या वाद्यांच्या संयोजनातून. हिंदी चित्रपटांनी वाद्यमेळ पाश्चात्य संगीताकडून घेतला. तो उसना होता. पार्श्वगायक, पार्श्वसंगीत असेच शब्द आपल्याकडे रुढ झाले. ते शब्द प्लेबॅक सिंगर, बॅकग्राऊंड म्युझिक या इंग्रजी शब्दांचेच पर्याय होते. मात्र आपल्याकडे संगीत बॅकग्राउंडलाच असायचं. म्हणजे जुनी हिंदी गाणी ऐकताना दोन कडव्यांच्यामध्ये वाद्यमेळ येतो. तो गाण्याशी एकात्म झालेलाच असतो असं नाही. वाद्यमेळ काढून टाकला तरीही गाणं म्हणता वा ऐकता येतं. आनंद थोडा कमी होतो पण मूळ गाणं सर्वांनाच माहीत असेल तर वाद्यमेळाची जागा स्मृतीने भरून काढता येते. म्हणून तर आपल्याकडे अंताक्षरी सर्व भाषांमध्ये प्रसिद्ध आहे.

रहेमानचं संगीत असलेली गाणी वाद्यमेळाशी एकरूप झालेली असतात. म्हणजे जय हो हे गाणं वाद्यमेळाशिवाय गाताच येणार नाही. कोणी गायलाच तर कोणतं गाणं गातोय ते चट्कन कळणारही नाही. किशोर, रफी, हेमंत कुमार, लता, आशा, यांची गाणी ऐकताना असं होणार नाही. त्यामुळे असेल कदाचित् जुन्या हिंदी चित्रपटांमध्ये संगीत म्हणजे गाणी—शब्द, चाली आणि आवाज असंच समीकरण होतं. दोन कडव्यांच्या मध्ये वाद्यसंगीत ठोकायचं असा खाक्या होता. त्यात अनेक संगीतकारांनी अनेक प्रयोग केले हे मान्यच करायला हवं. पण वाद्यसंगीतापेक्षाही शब्द आणि चाली यामुळे ती गाणी पिढ्यान पिढ्या टिकून राह्यली.

जुनी हिंदी वा मराठी गाणी ऐकायला इअर फोन पुरेसे होते. नवी गाणी ऐकायला हेडसेटच हवा.

Friday 30 October 2009

मराठी वर्तमानपत्रांचं अधःपतन

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांमध्ये मराठी पत्रकारितेचा बळी गेला. या विषयावर लोकसत्तामध्ये दोन लेख प्रसिद्ध झाले आहेत. विधानसभा निवडणुकींचं वृत्तांकन करण्यासाठी महाराष्ट्रातील बहुतेक बड्या, साखळी वर्तमानपत्रांनी विविध पक्षांच्या उमेदवारांकडून काळा पैसा घेऊन त्यांची जाहिरात केली. हेडलाईन, फोटो, बातम्या इत्यादीचे दर ठरवले, त्याची पॅकेजं करून विकली. जो मजकूर नगद रक्कम घेऊन प्रसिद्ध केला ती जाहिरात आहे, असं वाचकांना सांगितलं नाही. अंकुश काकडे, संजय दाभाडे-अजित अभ्यंकर यांनी मराठी प्रसारमाध्यमं कुसक्या कण्याची निघाली ही बाब अधोरेखित केली आहे. त्यांचे लेख प्रसिद्ध केल्याबद्दल लोकसत्ता दैनिकाला धन्यवाद दिले पाहिजेत. निवडणुकांमध्ये पत्रकाराची राजकीय भूमिका त्याच्या लिखाणातून, बातमीदारीतून डोकावतेच. ते अपरिहार्य आहे. राजकीय भूमिका घेणं आणि काळा पैसा घेऊन प्रसिद्धी देणं यातला फरक मराठी वर्तमानपत्रांनी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने संपवून टाकला.
मराठी वाहिन्यांवर निवडणूकीच्या निमित्ताने प्रायोजित कार्यक्रम म्हणजे राजकीय नेत्यांच्या मुलाखती प्रसारीत करण्यात आल्या. सदर कार्यक्रम प्रायोजित आहेत अशी सूचना काही वाहिन्यांनी दिली होती. टेलीमार्केटिंगचे वा ख्रिश्चन धर्माच्या प्रसाराचे असे प्रायोजित कार्यक्रम प्रसारीत केले जातात. राजकीय नेत्यांच्या मुलाखती घेण्यासाठी नावाजलेले पत्रकार प्रायोजित कार्यक्रमात बसलेले होते. हे पत्रकार स्तंभलेखकही आहेत.
एका बांधकाम कंपनीत पीआरओचं काम करणा-या एका पत्रकाराने त्याच कंपनीच्या एका प्रकल्पावर लोकसत्तात चर्चा सुरु असताना कंपनीची बाजू स्वतंत्र पत्रकार म्हणून मांडली होती. (लोकसत्ताच्या संपादकांना या बुजुर्ग पत्रकाराच्या या लाग्याबांध्यांची कल्पना नसावी अन्यथा त्यांनी सदर लेख छापला नसता.)
लेखन आणि सादरीकरणं ही कौशल्यं येणारा पत्रकार अशी या मंडळींची धारणा असावी. कोणताही व्यवसाय वा उद्योग ननैतिक नसतो. पत्रकारिता हा तर नीतीवर आधारित व्यवसाय समजला जातो. मात्र बहुतेक पत्रकार नैतिकतेच्या कसोटीला उतरत नाहीत कारण पत्रकारितेला लागू करता येणारे नैतिक निकष कोणत्याही वर्तमानपत्राने वा पत्रकारांच्या संघटनेने निश्चित केलेले नाहीत. निश्चित केले असतील तर ते स्वीकारलेले नाहीत. ते स्वीकारलेले असतील तर केवळ तोंडदेखले.
वृत्तपत्र वा प्रसारमाध्यम चालवायचं तर पैसा हवा, तो मिळवण्यासाठी या प्रकारच्या तडजोडी अपरिहार्य आहेत, अशा प्रकारचा दावा प्रसारमाध्यमं चालवणा-या कंपन्या आणि तिथे काम करणारे पत्रकार करतात. नैतिक मार्गांनी धंदा वा उद्योग करता येत नाही, असा हा युक्तिवाद आहे. नैतिकतेचा सतत नव्याने शोध घ्यावा लागतो आणि बदलत्या परिस्थितीच्या संदर्भात त्यानुसार कायदेकानून, आचारसंहिता आणि वर्तणूक यामध्ये बदल करावे लागतात. उदाहरणार्थ अमेरिकेत गुलामांना निग्रो म्हणत असत, पुढे ब्लॅक हा शब्द प्रचारात आला आता आफ्रिकन-अमेरिकन असं म्हटलं जातं. हे केवळ शब्द नाहीत तर त्यांच्यासोबत सामाजिक-राजकीय व्यवहारही जोडलेला आहे. म्हणूनच बराक ओबामा अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष होऊ शकतो. ध्वनि प्रदूषणाविषयी जागृती नव्हती, माहिती नव्हती, संशोधन झालेलं नव्हतं तेव्हा हा प्रश्न कायद्याच्या कक्षेत येत नव्हता, केवळ नैतिकतेच्या परिघातच होता. तो प्रश्न कायद्याच्या कक्षेत आल्यानंतर कायद्याच्या अंमलबजावणीचा प्रश्न आला. मराठी वा भारतीय भाषांमधील प्रसारमाध्यमं आणि समाजधुरीण नैतिकतेच्या केवलरूपावरच चर्चा करत बसतात तिच्या ऐहीक आयामांकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे उक्ती आणि कृती यांच्यामधली दरी कधीही सांधली जाणार नाही असाच त्यांचा पवित्रा असतो. अर्थातच त्यामधील अंतर कमी करण्याचे प्रामाणिक मार्गही ते शोधत नाहीत. पारंपारिक नीतीचा आपल्यावरील काबू सुटला आहे आणि नव्या मूल्यांना—स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय, समाजाने आत्मसात केलं नाही. आपल्या राजकीय आणि सांस्कृतिक जीवनात बोकाळलेल्या भ्रष्टाचाराचं हे एक कारण असावं. मे.पुं.रेगे यांनी या मुद्द्याकडे सत्तरच्या दशकात लक्ष वेधलं होतं.
देश पारतंत्र्यात होता तेव्हा भारतीय पत्रकारितेचा पाया घातला गेला. बाळशास्त्री जांभेकर असोत वा टिळक, आगरकर, आंबेडकर वा गांधी असोत, वाचकांनी दिलेल्या वर्गणीवर त्यांची पत्रकारिता उभी होती. जाहिरातीपासून मिळणा-या उत्पन्नावर त्यांची लेखणी चालत नव्हती. स्वातंत्र्योत्तर काळात वर्तमानपत्रांचं बिझनेस मॉडेल बदललं. जोपर्यंत सरकार हाच सर्वात मोठा जाहिरातदार होता तोवर विचारावर आधारित पत्रकारितेचा दबदबा होता. १९९० नंतर सरकारशी स्पर्धा करणा-या अनेक कंपन्या बाजारात उतरल्या. विचारांवर नव्हे तर माहितीवर आधारीत निर्णय घेण्याला महत्व आलं. अशा परिस्थितीत अचूक, निष्पक्ष माहिती देण्याकडे प्रसारमाध्यमांचा कटाक्ष असायला हवा होता. पण जाहिरातीच्या उत्पन्नामुळे पक्षपाती माहिती देण्याकडेच प्रसारमाध्यमांनी मोहरा वळवला. मराठी वा देशी भाषांमधील प्रसारमाध्यमांचं विलक्षण वेगाने अधःपतन सुरु झालं. कारण ही माध्यमं जाहिरातींसाठी सरकार, स्थानिक स्वराज्य संस्था, स्थानिक नेत्यांचे वाढदिवस, सरकारी आश्रयाने मोठ्या झालेल्या सहकारी संस्था वा विनाअनुदानित शिक्षणसंस्था यांच्याकडून मिळणा-या जाहिरांतींवर सुरु राह्यली. म्हणूनच जागतिक मंदीचा फटका भारतीय भाषांमधील प्रसारमाध्यमांना बसला नाही. अमेरिकेत छोटी वर्तमानपत्रं बंद पडत असताना, भारतात मात्र भारतीय भाषांमधील वर्तमानपत्रांच्या आवृत्या आणि खप वाढत होता. अशा प्रकारचं बिझनेस मॉडेल धंदा आणि नितिमत्ता दोन्हींच्या दृष्टीने पोकळ असतं कारण या वृत्तपत्रांनी वा प्रसारमाध्यमांनी विश्वासार्हता गमावलेली असते. या प्रसारमाध्यमांमध्ये काम करणा-या पत्रकारांना पैसा आणि प्रसिद्धी मिळते पण त्यांच्या करिअरचा वा व्यक्तिमत्वाचा विकास होत नाही. साहजिकच बुद्धिमान आणि संवेदनशील तरुण-तरूणी अशा प्रसारमाध्यमांकडे वळत नाहीत आणि वळले तर स्वतःचा नवा रस्ता शोधण्यासाठी बाहेर पडतात. असे तरूण-तरुणी जग जिंकण्याची आकांक्षा बाळगून असतात.

Monday 19 October 2009

दिवाळी अंक वाचतो कोण?

माझे आई-वडील दोन-चार दिवाळी अंक विकत घेतात. बाकीचे लायब्रीतून आणतात. माझ्या
सासू-सास-यांकडेही चार दिवाळी अंक असतातच. माझ्या घरी दोन-तीन दिवाळी अंक येतात. माझ्या भावाच्या आणि चुलतभावाच्या घरीही दिवाळी अंकांची एवढीच संख्या असते. म्हणजे आमच्या विस्तारीत कुटुंबात १२ ते १५ दिवाळी अंक असतात. इयत्ता चौथीत असलेला एक पुतण्या हातात पडेल तो कागद वाचून काढतो. तो अर्थातच दिवाळी अंकही वाचतो. माझा मुलगा मात्र दिवाळी अंक वाचत नाही. माझे दोन-तीन पुणतेही दिवाळी अंक वाचत नाहीत. दिवाळी अंकातले लेख वाचण्यापेक्षा वर्तमानपत्रातले अग्रलेख वाचावेत आणि कथा तर पकावच असतात असं माझा मुलगा म्हणतो.

सरकारी वा खाजगी नोकरीत असलेल्या मध्यमवर्गीय माणसांकडे वेळ भरपूर होता. त्यावेळी ऑफिसला जाण्या-येण्यामध्ये फारसा वेळ जायचा नाही. एकदा का तुम्ही कारकून वा अधिकारी म्हणून नोकरीत चिकटलात की करिअर डेव्हलपमेंटला फारशी संधी नव्हती. नोकरी करून राह्यलेल्या या वेळाचा सदुपयोग म्हणजे उत्तमोत्तम नाटक वा सिनेमा पाहणं, गाण्याच्या मैफिलीला जाणं, वृत्तपत्र विशेषतः अग्रलेखाचं पान नियमाने वाचणं, त्यावर चर्चा करणं, नाटक, सिनेमा, साहित्य या क्षेत्रात जे नवे प्रयोग होतात त्यांची दखल घेणं, परिसंवाद, भाषणं यांना हजेरी लावणं, असं या मध्यमवर्गाचं स्वरूप होतं. प्रत्येक विषयातलं थोडंफार तरी आपल्याला कळलं पाहिजे, आपल्या संवेदनांचा विस्तार केला पाहिजे, अशी धारणा असणा-याला सुसंस्कृत म्हणण्याचा प्रघात होता. काही जण त्यांना विद्वान असंही म्हणत.

जुन्या हिंदी चित्रपटांमध्ये एंटरटेनमेंट, कॉमेडी, ट्रॅजेडी, क्राईम, सस्पेन्स, रोमान्स, ह्यूमर सर्वकाही एकाच चित्रपटात कोंबलं जायचं. दिवाळी अंकांचं म्हणजे तथाकथित दर्जेदार दिवाळी अंकांचं स्वरूपही अशाच प्रकारचं होतं. चालू घडामोडींविषयक एक परिसंवाद वा विशेष विभाग, वैचारिक लेख, नाटक, चित्रपट, लोकप्रिय संगीत, शास्त्रीय संगीत या विषयांना स्पर्श, नामवंत आणि नवोदितांच्या कथा-कवितांची भेळ, एखादी कादंबरी, नर्म विनोदाचा शिडकावा, दृष्यकलांची दखल असा दिवाळी अंकांच्या यशाचा फॉर्म्युला होता. दिवाळी अंकांचं अर्थशास्त्र जाहिरात मिळवण्याच्या क्षमतेवर अवलंबून असतं. वाचक असोत वा नसोत, वर्षातून एक जाहिरात अनेक कंपन्या, बँका वा छोटे-मोठे जाहिरातदार सांस्कृतिक कर्तव्य म्हणून देतात, त्यामुळे दिवाळी अंकांचं संपादन, लेखन, मांडणी, सजावट, निर्मिती यासंबंधात अनेकविध प्रयोगही केले जातात.

मराठी पत्रकारिता, साहित्य, नाटक आणि चित्रपट अशा निवडक विषयांशी संबंधीत असणारे व्यावसायिकच दिवाळी अंक गांभिर्याने वाचतात. त्यांना या अंकांच्या मजकूरातून अनेक नव्या संकल्पना, कल्पना, माहिती, प्रेरणा मिळतात. दिवाळी अंकात विज्ञान, निसर्ग, तंत्रज्ञान, दृष्यकला—चित्र, शिल्प, वास्तुकला, आरोग्य, क्रिडा, अर्थशास्त्र असे विषयही हाताळलेले असतात. परंतु त्यांचं स्वरूप मध्यमवर्गीय वाचकाला नव्या विषयांचा परिचय करून देणं हे असतं. अर्थातच या विषयातील व्यावसायिक दिवाळी अंक आवर्जून वाचत नाहीत. या विषयांमधील वा क्षेत्रांमधील नव्या संकल्पना, संशोधन वा प्रयोग यामध्ये गुंतलेले तरूण-तरूणी वा अन्य वयोगटातील वाचकांना दिवाळी अंकांच्या वाचनातून फारसं काही हाती लागत नाही.

माझा मुलगा, पुतणे वा पुतण्या यांच्या इंटरेस्टचे विषय लिंकीग पार्क, वेस्ट लाइफ, एमीनेम हे बँड्स, युरोपियन फुटबॉल, टेक्नॉलाजी म्हणजे मोबाईल फोन, आयपॉड, हँडीकॅम्स, हाय स्पीड इंटरनेट, कंप्युटर वा मोबाईल फोन गेम्स, म्युझिक सिस्टीम्स, सोशल नेटवर्किंग साइट्स हे आहेत. महाराष्ट्रात इंजिनीयरींग अभ्यासक्रमाच्या एकूण ४० हजार जागा आहेत, मेडिकल वा अन्य प्रोफेशनल कोर्सेसबाबतही अशीच स्थिती आहे. करिअरच्या दृष्टीने मॅनेजमेंट हे क्षेत्र आता महत्वाचं ठरू पाहात आहे. या तरूणांची अभिरूची, संवेदनशीलता यापेक्षाही त्यांच्या इंटरेस्टना दिवाळी अंक संबोधित करत नाहीत. हे विषय मराठी संवेदनशीलतेच्या परिघात नाहीत. दिवाळी अंकांच्या संपादकांना यापैकी अनेक विषय माहीतच नाहीत. या विषयांवर अधिकाराने लिखाण करणारे लेखकही मराठीत नाहीत. या विषयांवर उदंड साहित्य इंटरनेटवर उपलब्ध असतं. टिव्ही, एफएम रेडीयो, इंटरनेट, मोबाईल फोन या माध्यमांची दोस्ती करणारा तरूण सध्याच्या काळात करिअरिस्ट असतो. हा तरूण दिवाळी अंकांचा वाचक नसतो.

मराठी पत्रकारिता, साहित्य, नाटक आणि सिनेमा या क्षेत्रात करिअर करू पाहणा-या तरूणांची संख्या तुलनेने कमी असते. कारण तिथे रिस्क फॅक्टर मोठा असतो. शैक्षणिक वा तांत्रिक कौशल्यं याहीपेक्षा अन्य काही बाबी तिथे यशस्वी होण्यासाठी महत्वाच्या ठरतात. तरूण-तरुणींचा हा छोटा वर्ग आणि चाळिशी पार केलेले स्त्री-पुरुष हा दिवाळी अंकांचा वाचक असतो. तुमची काय निरिक्षणं आहेत?

Friday 16 October 2009

मोहन गुंजाळ

आणिबाणीनंतर राष्ट्र सेवा दलात दोन गट पडले. लोकशाही समाजवादी नागरिक घडवण्याचं कार्य सेवा दलाने करावं की लोकशाही समाजवादी विचारसरणीचे कार्यकर्ते निर्माण करणं हे सेवा दलाचं कार्य आहे, या मुद्द्यावरून हे दोन गट पडले होते. आणिबाणीच्या काळात सेवा दलाच्या कार्यात अनेक तरूण कार्यकर्ते ओढले गेले. त्यांच्यावर अर्थातच जयप्रकाश नारायण यांनी दिलेल्या संपूर्ण क्रांतीच्या ना-याचा प्रभाव होता. समाजवादी चळवळीमध्ये आलेला हा तरूण प्रामुख्याने ग्रामीण भागातून आलेला होता. मात्र आणिबाणीनंतर समाजवादी पक्षाचं विसर्जन जनता पक्षामध्ये झाल्याने या तरूणांचा तेजोभंग झाला होता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जनसंघ या हिंदुत्ववादी विचारसरणीच्या कार्यकर्त्यांशी, संघटना काँग्रेस वा तत्सम विचाराच्या नेतेमंडळींशी त्यांची नाळ जुळत नव्हती. समाजवादी पक्ष अस्तित्वात होता त्यावेळी सेवा दलाच्या कार्याचं स्वरूप शैक्षणिक वा सांस्कृतिक असणं स्वाभाविक होतं मात्र समाजवादी पक्षाच्या विसर्जनानंतर सेवा दलाने राजकीय भूमिका घ्यावी, सामाजिक संघर्षात उतरावं याबाबत नवा तरूण आग्रही होता. विशेषतः जातीप्रथेच्या निर्मूलनासाठी सेवा दलाने सामाजिक संघर्षात उतरणं आवश्यक आहे, असं या गटाचं म्हणणं होतं. एस.एम. जोशी, नानासाहेब गोरे, बापूसाहेब काळदाते इत्यादी नेत्यांबद्दल तरूणांना आदर होता, आत्मीयता होती, मात्र समाजवादी चळवळीचा राजकीय वारसा पुढे नेण्यासाठी या नेत्यांनी सेवा दलाच्या कार्यकक्षा वाढवाव्यात असं नव्या तरूणांचं म्हणणं होतं.
सेवा दलाच्या कार्याचं स्वरूप बदलण्याला समाजवादी आंदोलनातील अनेक नेत्यांचा विरोध होता. सेवा दल ही शाळा आहे. या संघटनेने सामाजिक वा राजकीय संघर्षात उतरू नये. या शाळेतून उत्तीर्ण झालेल्या मुलांनी सामाजिक वा राजकीय काम करण्यासाठी कामगार संघटना, राजकीय पक्ष वा अन्य संघटनांमध्ये जावं आणि लोकशाही समाजवादी चळवळ वाढवावी असं बुजुर्ग नेत्यांचं म्हणणं होतं.
सेवा दला मुंबई विभागाने नव्या विचारांच्या समाजवादी तरूणांचं एक महाराष्ट्रव्यापी शिबिर आयोजित केलं होतं. त्यामध्ये मी मोहन गुंजाळला पहिल्यांदा पाह्यला. मोहन माझ्यापेक्षा १० वर्षांनी मोठा असावा. खादीचे कपडे, दाढी, काळा हसरा चेहेरा. अंगाने भक्कम आणि साधा सरळ माणूस. कोणालाही मदत करण्यास सदा तत्पर. संघर्ष कसा सामाजिक कार्य करताना संघर्ष कसा अपरिहार्य ठरतो हे सोदाहरण त्याने सांगितलं. तो येवल्याचा. जेपींच्या प्रेरणेने स्थापन झालेल्या लोकसमिती या संघटनेत तो काम करायचा. शेतमजूर, भटके-विमुक्त यांच्यात तो काम करायचा. त्या शिबिरानंतर वर्ष-सहा महिन्यातच मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराच्या प्रश्नावर जो लाँगमार्च निघाला त्यात आम्हीही सामील होतो. नाशिकच्या सबजेलमध्ये आम्ही ८ दिवस होतो. तुरुंगात भाषणं, चर्चा, संवाद, खेळ आयोजित करण्यात मोहन आणि सुरेश पगारे यांचा पुढाकार असायचा.
मोहनची बायको निर्मला. ती पोस्टात नोकरीला होती. मोहन पूर्णवेळ कार्यकर्ता असल्याने घर-संसाराची जबाबदारी तिनेच पेलली. मोहनच्या आईला कॅन्सर झाला. तिला मुंबईतल्या इस्पितळात दाखल करण्यासाठी मोहन येवल्याहून आला. तो टाटा कॅन्सर इस्पितळातच राह्यला. म्हणजे रस्त्यावरच. अनेक मित्र, कार्यकर्ते मुंबईत होते. त्यांना तो भेटला पण अन्य कॅन्सर पेशंटच्या नातेवाईकांबरोबरच तो राह्यला. टाटा कॅन्सर रुग्णालयाने कॅन्सर पेशंटच्या नातेवाईकांना रोजगार देण्याचीही व्यवस्था केली होती. त्यामुळे जेवणाचा वगैरे खर्च सुटायचा. प्यूनचं काम करून तो आईची शूश्रूषा करायचा. टाटा कॅन्सर हॉस्पीटलाच्या ह्या सेवेबाबत त्याने मुंबईच्या एका वर्तमानपत्रात लेख लिहून त्यांच्या कार्याची ओळख करून दिली.
येवल्याच्या सेवा दलाच्या गटाने मार्क्सवाद-फुले-आंबेडकरवादाची कास धरली. समाजवादी चळवळीकडून तो गट सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाकडे सरकला. समतेची स्थापना करायची तर भक्कम तत्वज्ञानावर आधारित राजकीय पक्षाची गरज आहे. मार्क्सवादाला फुले-आंबेडकरवादाची जोड दिली तरच असं तत्वज्ञान निर्माण होऊ शकतं, अशी या गटाची धारणा होती. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातून बाहेर पडलेले कॉ. शरद पाटील यांनी मार्क्सवाद-फुले-आंबेडकरवाद या तत्वज्ञानाची पायाभरणी केली. धुळ्याच्या आदिवासी क्षेत्रात ते काम करायचे. या विचारधारेनुसार भारतातील क्रांतीचा नायक आदिवासी होता. सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षात गेल्यावर मोहनही धुळ्याला काम करायला गेला. त्यांनतर माझा आणि त्याचा संबंधही कमी झाला. या काळात एकदा तो भेटला तेव्हा गप्पा मारताना मी त्याला म्हटलं, तुमच्या पक्षाच्या तत्वज्ञानाविषयी मला वाद घालायचा नाही पण भारतात आदिवासींचं लोकसंख्येतलं प्रमाण ५ ते ६ टक्के असावं, एवढ्या अल्पसंख्येने असलेला समूह क्रांतीचं नेतृत्व कसं करू शकेल. माझ्या प्रश्नामुळे मोहन किंचितही विचलीत झाला नव्हता. तो हाडाचा कार्यकर्ता होता. वैचारीक वादात त्याचा रस केवळ प्रयोजनापुरता होता. कार्यकर्ता असल्याने नेता मिळाला की तो आश्वस्त होत असे. कदाचित् त्यामुळेच तो शरद जोशींच्या शेतकरी संघटनेकडे आकृष्ट झाला. संघटन कौशल्याच्या जोरावर तो शेतकरी संघटनेचा राज्यपातळीवरील नेताही झाला. विधानसभेची निवडणूकही त्याने शेतकरी संघटनेच्या तिकीटावर आणि जनता दलाच्या चिन्हावर लढवली. येवला मतदारसंघातून. त्याच्या पोस्टरवर मोहन गुंजाळ (पाटील) असं नाव होतं. मोहन लोकप्रिय होता पण निवडणूकीच्या राजकारणात त्याची डाळ शिजली नाही. त्या निवडणूकीनंतर मोहनची भेट झाल्याचं मला आठवत नाही. दोन महिन्यांपूर्वी येवल्याला गेलो होतो अर्जुन कोकाटे भेटला. शिवाजी गायकवाडही होता. खूप वर्षांनी आम्ही भेटलो. पण खूप माणसांच्या गराड्यात होतो. मोहनची चौकशी केली. पण तो गावात नव्हता त्यामुळे त्याला भेटायचं राहून गेलं. एकदा सवड काढून काढून येवल्याला ये, असं अर्जुन म्हणाला.
बुधवारी (१४ ऑक्टोबरला) रात्री मोहनचं निधन झालं. संजीव सानेचा एसएमएस आला. अरूण ठाकूर आणि अर्जुनला मी फोन केला. सात-आठ दिवस मोहन हॉस्पीटलातच होता. झोपेतच त्याने शेवटचा श्वास घेतला. मोहन आणि सुरेश दोघांचा प्रवास समाजवादी चळवळीकडून सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाकडे तिथून शेतकरी संघटना असा झाला. मोहन त्यानंतर मध्यममार्गी राजकारणात स्थिरावला. सुरेशचं काही वर्षांपूर्वीच निधन झालं. दोघेही सपाटून वाचन करणारे, संघटनकुशल कार्यकर्ते होते. आपणही कुणाचे तरी रोल मॉडेल आहोत हे त्यांना कधीच कळलं नाही. अनुयायांना सहकारी बनवणारे हे दोघे नेत्याच्या शोधात होते. त्यांच्या कल्पनेतला आदर्श नेता त्यांना कधीच गवसला नाही.

Sunday 11 October 2009

कापूसकोंड्याची गोष्ट—३ एका गरीब कत्तीनीचा अर्ज

मी एक कत्तीन आहे. खूप दुःख सोसल्यानंतर मी हे पत्र लिहीत आहे. कृपया या पत्राला आपल्या वृत्तपत्रात प्रसिद्धी द्यावी. हे पत्र प्रसिद्ध झालं तर माझी परवड कमी करतील आणि विनंती मान्य करतील अशा लोकांपर्यंत ते पोचेल, असं मी ऐकलं आहे. एका गरीब दुःखी महिलेच्या या पत्राकडे कृपया दुर्लक्ष करू नका. मी एक अभागी महिला आहे. माझ्या दुःखाची कहाणी खूप मोठी आहे. ती मला थोडक्यात सांगितलीच पाहीजे. बावीस वर्षांची असताना मी विधवा झाले. माझ्या पदरात तीन मुली होत्या. मृत्युसमयी माझ्या पतीने काहीही संपत्ती मागे ठेवली नव्हती. वृद्ध सासू, सासरे आणि तीन मुलींना पोसण्याची जबाबदारी माझ्यावर आली. मी माझे दागिने विकले आणि श्राद्धविधि पूर्ण केला. आमची उपासमार होण्याचीच वेळ येऊन ठेपली होती तेव्हा मला ईश्वराने मार्ग दाखवला त्यामुळे आम्ही वाचलो. मी टकळी आणि चरख्यावर सूत कातू लागले.

झाडलोट आणि अन्य कामं आटोपून मी सकाळी सूत कातावयास बसे. दुपारपर्यंत चरख्यावर सूत कातीत असे. त्यानंतर स्वैपाक करून वृद्ध सासू-सास-यांना आणि मुलींना जेवू-खाऊ घालून मी टकळीवर बारीक सूत कातत असे. सर्वसाधारणपणे एक तोळा सूत मी दिवसाभरात कातत असे. विणकर घरी येऊन ते सूत घेऊन जात. तीन तोळे सूत एक रूपया दराने ते विकत घेत असत. विनंती केली की ते आगाऊ रक्कमही देत. त्यांच्यामुळे आमची अन्न-वस्त्राची ददात मिटली.
काही वर्षांतच माझ्याकडे सात गंडास (२८ रुपये) जमले. त्या पैशातून मी एका मुलीचे लग्न केले. त्याप्रमाणेच तिन्ही मुलींची लग्न केली. जातीचे रितीरिवाज मी पाळले जेणेकरून माझ्या मुलीकडे कोणीही खालच्या नजरेने पाहू नये. मी घटका आणि जातीच्या लोकांचा योग्य तो सन्मान मी केला. माझे सासरे वारले तेव्हा मी ११ गंडास (४४ रुपये) त्यांच्या श्राद्धावर खर्च केले.
हे पैसे मला विणकरांनी आगाऊ दिले. दीड वर्षात मी हे सर्व पैसे फेडले. हे सर्व चरख्यामुळे झालं. गेली तीन वर्षं माझी आणि माझ्या सासूची परवड सुरु आहे. अन्नासाठीही आमच्याकडे पैसे नाहीत. सूत घेण्यासाठी विणकर घरी येत नाहीत. सूत बाजारात पाठवलं तर पूर्वी जेवढी किंमत मिळायची त्याच्या एक चतुर्थांश रक्कमही हातात येत नाही. हे कशामुळे घडलं ते मला ठाऊक नव्हतं. मी अनेकांना याबाबत विचारलं. ते म्हणाले विलायती सूत मोठ्या प्रमाणावर येतं. विणकर तेच सूत विकत घेतात आणि कापड विणतात. विलायती सूत माझ्या कातलेल्या सूताशी स्पर्धा करू शकणार नाही अशी मला घमेंड होती. विलायती सूत शेराला ३-४ रुपये दराने मिळायचं. मी कपाळावर हात मारून घेतला. देवा रे, विलायतेला माझ्यापेक्षाही गरीब बायका आहेत हे मला ठाऊक नव्हतं. विलायतेतले सर्व लोक श्रीमंत आहेत हे मला ठाऊक होतं. पण माझ्यापेक्षाही गरीब बायका तिथे आहेत हे मला कळलं होतं. गरीबीमुळेच त्या बायकांना एवढ्या कमी किंमतीत सूत कातावं लागत होतं. तिथे त्या सूताला गि-हाईक नसल्याने ते सूत एवढ्या कमी किंमतीत इथे विकायची पाळी त्यांच्यावर आली. त्यामुळे आमचं मरण ओढवलं आहे. त्या सूताचे कपडे महिना-दोन महिन्यातच विरू लागतात. माझी तेथील कत्तीनींना विनंती आहे की त्यांनी माझ्या अर्जाचा विचार करावा आणि इथे सूत पाठवणे योग्य आहे का ते ठरवावे.
कळावे
एक गरीब कत्तीन
शांतीपूर समाचार दर्पण १८२८ (कोलकता)

सदर पत्र १९३१ साली म्हणजे १०० वर्षांनी म. गांधींनी यंग इंडिया या त्यांच्या नियतकालिकात १९३१ साली पुनर्मुद्रित केलं. लँकेशायरच्या कापडगिरण्यात काम करणा-या कामगारांना हाच अनुभव १९२९ साली आलेल्या जागतिक मंदीत आला. भारतातल्या असहकार आंदोलनाने विदेशी कपड्यांवर बंदी घालण्याचं आवाहन केल्यानंतर लँकेशायरच्या कामगारांवर बेकारीची नोबत आली. गोलमेज परिषदेच्या निमित्ताने इंग्लडला गेल्यावर म. गांधीनी लँकेशायरच्या गिरणी कामगारांची भेट घेऊन भारतातील दारिद्र्याची वस्तुस्थिती त्यांच्यासमोर मांडली आणि खादीचा कार्यक्रम या गरीबीवरचा तोडगा कसा ठरू शकतो तेही सांगितलं.

कापूसकोंड्याची गोष्ट—२

मुघल बादशहा जहाँगीरकडून ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीला व्यापाराची सनद मिळाली. भारतीय सुती वस्त्रांची निर्मिती आणि निर्यात करण्याचा परवानाही मिळाला. मद्रास आणि सूरत इथे भारतीय कापसापासून वस्त्रं आणि अन्य उत्पादनं तयार करण्याचे कारखाने ब्रिटींशांनी काढले. कालिकत या बंदरातून सुती वस्त्रांची निर्यात सर्वप्रथम झाली. कॅलिको या नावाने भारतीय वस्त्रं इंग्लडात विकली जाऊ लागली. इंग्लडच्या बाजारपेठेत त्यामुळे जणू धरणीकंपच झाला. ब्रिटीश पार्लमेंटने रंगीत छपाई केलेली कॅलिको वस्त्रं वापरण्यावर बंदी घालण्याचा कायदाच केला. १८ व्या शतकात ब्रिटनमध्ये औद्योगिक क्रांती झाली. लोकर किंवा कापूस यांचं सूत काढण्याचं यंत्र स्पिनिंग जेनी प्रचारात आल्यानंतर औद्योगिक क्रांतीला आरंभ झाला असं ढोबळपणे मानलं जातं.

सूत कताई आणि वस्त्र विणणे यंत्राने होऊ लागल्यावर जगाचा पेहरावच बदलून गेला. तोपावेतो कापसाची वस्त्र अतिशय महाग होती. कारण त्यांचं ठोक पद्धतीने उत्पादनच होत नव्हतं. निम्म जग लोकरीचे किंवा कातड्याचेच कपडे वापरत होतं. सुती वस्त्रांचा वापर खूपच मर्यादीत होता. इंग्लडात सुरू झालेली औद्योगिक क्रांती नंतर इतरही युरोपीय देशांमध्ये—जर्मनी, फ्रान्स, हॉलंड, इत्यादी पसरली. स्पिनिंग जेनीवर सूत काढण्यासाठी अमेरिकेतील कापूस वापरण्यात आला. म्हणजे त्या यंत्राची रचना अमेरिकन कापसाच्या गुणधर्मांवर आधारित झाली. लांब आणि मजबूत धागा ही अमेरिकन कापसाची वैशिष्ट्यं होती. साहजिकच या जातीच्या कापसाची मागणी वाढली.

अमेरिकेच्या म्हणजे आजच्या युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेच्या दक्षिण भागात कापसाची शेती होत असे. कापसाची शेती करायची तर मनुष्यबळ मोठ्या प्रमाणावर लागतं. कारण त्या काळी कापूस वेचण्यासाठी यंत्रं नव्हती. हजारो एकर शेतातील कापूस वेचणं आणि मशागतीची कामं करणं यासाठी गुलामांच्या टोळ्या कामाला जुंपल्या जात. अमेरिकन यादवीयुद्धाच्या मुळाशी कापसाचीच शेती होती. दक्षिणेकडची राज्यं युरोपला कापसाचा पुरवठा करत. त्यामुळे यादवी युद्धात युरोप आपल्याला मदत करेल अशी त्यांची अपेक्षा होती. यादवी युद्ध सुरू झाल्यावर युरोपिय भांडवलदारांनी अमेरिकन कापसाच्या जाती अन्य देशांमध्ये नेऊन नव्या जातींची निर्मिती करून कापूस लागवडीत मोठी भांडवल गुंतवणूक करायला सुरुवात केली. इजिप्त या गुंतवणूकीमुळे कर्जबाजारी झाला आणि पारंतत्र्यात अडकला. आफ्रिका आणि आशिया खंडात अमेरिकन कापसाच्या जातींनी असा प्रवेश केला.

न्यूयॉर्क कॉटन एक्सेंजवर सट्टा खेळणा-या मुंबईतली काही सटोडियांनी अमेरिकन वाणाच्या कापसापासून तयार केलेलं बेणं गावागावात नेऊन रुजवलं. तोपावेतो ईस्ट कंपनीचं धोरणही बदललं होतं. भारतातून कच्चा माल निर्यात करायचा आणि पक्क्या मालाची आयात करायची असं धोरण कंपनीने वस्त्रोद्योगाबाबत ठरवलं. त्यामुळे कापसाच्या या व्यापारी शेतीला ईस्ट कंपनीने सर्वतोपरी साहाय्य केलं. गुजरात, सिंध, पंजाब, विदर्भ, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, आंध्र इथे झालेली कापसाची लागवड रेल्वे लाईनच्या बाजूने झाली हा योगायोग नाही. या सर्व रेल्वे लाईन बंदरांशी जोडलेल्या होत्या. कापसाच्या वाहतूकीसाठीच रेल्वेचा प्रामुख्याने उपयोग होता. बंदरातून हाच कापूस निर्यात केला जायचा. १८०१ मध्ये साडे पाच कोटी पौंडांचा कापूस भारतातून इंग्लडला निर्यात झाला. हा कापूस देशी वाणाचा होता. मात्र २० शतकात अमेरिकन वाणापासून तयार करण्यात आलेल्या कापसाच्या जातींचं उत्पादन वाढत गेलं.

भारतीय कापसाच्या जाती आखूड आणि नाजूक धाग्याच्या होत्या पण त्यांच्यावर बोंडअळी नव्हती. अमेरिकन वाणाच्या कापसावरच बोंडअळीचा प्रादुर्भाव होत असे. अमेरिकन वाणाच्या कापसासोबतच बोंड अळीचा प्रवेशही भारतात झाला. मावा आणि तुडतुडे या रोगांना प्रतिकार करण्याची उपजत क्षमता या भारतीय कापसाच्या जातींमध्ये होती. बोंड अळीचा उपद्रव नाही, मावा तुडतुडे अशा रोगांना प्रतिकार करण्याची अंगभूत क्षमता या गुणांमुळे भारतीय कापसाच्या जातींचा उत्पादन खर्च कमी होता. अमेरिकन कापसाचं वाण आल्यानंतर हा उत्पादन खर्च काही पटींनी वाढला. अमेरिकन जातीपासून तयार केलेल्या कापसाचं बियाणं व्यापा-यांनी गावोगाव पोहोचवलं. त्या बियाण्यांच्या पाठोपाठ मावा, तुडतुडे, बोंड अळी इत्यादी रोगांवरची औषधंही गावागावात पोचली. बियाण्याच्या किंमती, रसायनं वा औषधं व्यापारी लोक उधारीवर शेतक-यांच्या गळ्यात मारायचे. ही एक प्रकारची कंत्राटी शेती होती. या कंत्राटी शेतीत शेतक-याच्या अधिकारांना, हक्कांना काही स्थानच नव्हतं. अमेरिकेतल्या यादवी युद्धाची, इंग्लड-युरोपातल्या औद्योगिक क्रांतीची किंमत युरोपातला मजूर आणि भारतातला शेतकरी यांना चुकवावी लागली.

कापूसकोंड्याची गोष्ट सुरु होते अमेरिकेतल्या गुलामांच्या शोषणाने। तिचा विस्तार झाला आशिया आणि आफ्रिका खंडात। शेतक-यांसोबतच वस्त्रोद्योगातल्या इतर समूहांच्या गळ्याभोवतीचा फासही आवळत गेला। एका कत्तिनीने म्हणजे कापूस कातणा-या महिलेने मांडलेली कैफियत वाचूया पुढच्या भागात।

टीपः संदर्भ, सनावळी, आकडेवारी इत्यादीसाठी जिज्ञासूंनी विविध ग्रंथ, अहवाल शोधावेत आणि वाचावेत.

Friday 9 October 2009

कापूसकोंड्याची गोष्ट—१

बीटी कापसाच्या बियाण्याच्या जनुकामध्येच असा बदल करण्यात आला आहे की कापसाची बोंड खाणारी अळी या बियाण्यापासून तयार झालेल्या बोंडावर हल्ला करू शकत नाही. त्यामुळे कापसाच्या उत्पादनात वाढ होते आणि उत्पादन खर्चात बचत होते. बीटी कापसाचं बियाणं भारतातमध्ये वादग्रस्त ठरलं आहे. या बियाण्याच्या किंमती आणि त्यावर होणारा अन्य खर्च यामुळे शेतकरी सावकारी पाशात अडकले आणि त्यामुळेच शेतक-यांच्या आत्महत्यांमध्ये कापूस उत्पादकांची संख्या सर्वाधिक आहे, असा दावा अनेक अभ्यासकांनी, आंदोलकांनी केला आहे. बियाण्यामध्ये जनुकीय बदल करणं पर्यावरणाच्या दृष्टीने कितपत योग्य आहे, असा नैतिक प्रश्नही अनेकांनी उपस्थित केला आहे. अमेरिकेतल्या मोन्सॅटो कंपनीने बीटी कापसाचं बियाणं बाजारात आणल्याने या वादाला अर्थ-राजकीय परिमाणही मिळालं आहे. बीटी कापसाच्या बियाण्याचा शोध लागण्यापूर्वीही भारतातील कापूस उत्पादकांची स्थिती अन्य कोणत्याही शेतक-यासारखीच हलाखीची होती.

गहू वा धान यांना ओंब्या वा लोंब्या आल्या की ते रोपं पिवळी पडतात. (देवाजीने करूणा केली भाते पिकूनी पिवळी झाली... अशा ओळी म्हणूनच कवीला सुचल्या.) कापसाच्या पिकाचं तसं काही नसतं. बोंडं आल्यानंतरही कापसाचं झाडं वाढतच राहतं. कापसाचं ठोक पद्धतीने उत्पादन घेता यावं म्हणून कापसाच्या अनेक जाती माणसाने विकसीत केल्या. नैसर्गिक कापसाची सर्वात परिचित जात म्हणजे सावरीचा कापूस. सावरीच्या कापसालाच संस्कृतात श्याल्मली म्हणतात. सावरीच्या झाडापासून मिळणा-या कापसाचं व्यापारी तत्वावर उत्पादन करणं शक्य नाही. कोकणात आणि देशावरही परसात कापसाचं झाडं दिसायचं. तेही चांगलं ८-१० फूट उंचीचं असायचं. त्या कापसाच्या वाती वळल्या जायच्या. व्यापारी तत्वावर लागवड करण्यायोग्य चारच कापसाच्या जाती आहेत. त्यापैकी एक अमेरिकेत, एक आफ्रिकेत तर दोन भारतात आहेत. लागवडीयोग्य कापसाच्या शेकडो जाती गेल्या हजारो वर्षांमध्ये विकसीत करण्यात आल्या आहेत. मूळ चार जातींमधील गुणधर्मच या व्यापारी जातींमध्ये उतरले आहेत. लांब आणि मजबूत धागा हे अमेरिकन कापसाच्या जातीचं वैशिष्ट्य आहे. मध्यम आणि कमी मजबूत धागा हे आफ्रिकन कापसाच्या जातीचं वैशिष्ट्य तर आखूड आणि नाजूक धागा ही भारतीय कापसाच्या जातींची वैशिष्ट्यं आहेत. सुप्रसिद्ध ढाक्याची मलमल या आखूड आणि नाजूक धाग्यानेच विणली जायची.

हेरॉडोटस हा ग्रीक विद्वान आद्य इतिहासकार म्हणून ओळखला जातो. तो खैबरखिंड ओलांडून तेव्हाच्या हिंदुस्थानात आला होता. कापसाच्या सुतापासूनही कपडे विणता येतात हे नोंदवणारा तो पहिला पाश्चात्य विद्वान. भारतातले लोक ज्या लोकरीपासून सूत काढतात ती लोकर झाडावर लागते, असं त्याने नोंदवलं आहे. गूळ बनवण्याचा कारखाना पाह्यल्यावर भारतातले लोक गवतापासून मध बनवतात असं मेगॅस्थेनिस या ग्रीक प्रवाशाने नोंदवलं आहे. मेगॅस्थेनिस हा अलेक्झांडरसोबत भारतात आला होता. मेगॅस्थेनिसला वा हेरॉडोटसला फक्त ग्रीक भाषा येत असे. परंतु ग्रीस देशातून भारताताच्या वायव्य सीमेपर्यंत त्यांना कुठेही भाषेची अडचण जाणवली नाही म्हणजे मोठ्या प्रमाणावर ग्रीक लोक जगभर पसरलेले होते. कोणत्याही भारतीयाने प्राचीन काळात परदेशांची म्हणजे चीन, म्यानमार वा मलेशिया यांचीही वर्णनं लिहून ठेवलेली नाहीत. तूर्तास हे विषयांतर थांबवून पुन्हा कापूसकोंड्याच्या गोष्टीकडे वळूया.

कापसाचा शोध भारतात लागला, कापसाची लागवडही सर्वप्रथम भारतातच सुरु झाली आणि कापसापासून वस्त्रनिर्मितीही भारतातच सुरु झाली. चीनमध्ये रेशमाचा शोध लागला. चेंगीजखानाने मंगोलियापासून स्पेनपर्यंत मुलुखगिरी केली आणि सिल्क रूट सुरु केला. चीनमधील रेशीम आणि भारतातील सुती वस्त्रं पुढे याच मार्गाने युरोपात गेली. (चीनमधली सफरचंद आणि पीच ही फळंही सिल्क रुटनेच युरोपात गेली.) मात्र तरिही सुती वस्त्रांची बाजारपेठ मर्यादीतच होती. बाबरने तर बाबरनाम्यात असं लिहूनच ठेवलंय की भारतीय लोकांना पोषाखाची आवडच नाही. लाज राखणापुरतीच वस्त्रं ते कंबरेला गुंडाळतात म्हणजे अर्धनग्नच असतात. कापसाचा, सूत काढण्याचा, विणण्याचा शोध प्राचीन काळात लागूनही भारतीय लोक अंगभर वस्त्रं दीर्घकाळपर्यंत म्हणजे बाबरच्या आगमनापर्यंत वापरत नव्हते. आर्य चाणक्य वा कौटिल्य या जगातील पहिल्या अर्थशास्त्रज्ञाने लिहून ठेवलंय की अन्नधान्याच्या शेतीला अग्रक्रम द्यावा, त्यांनतर भाजी-फळे यांना प्राधान्य द्यावं आणि सर्वात शेवटी कापूस, ऊस अशा नगदी पिकांना पसंती द्यावी. म्हणजे गंगा-यमुनेच्या सुपीक खो-यातही कौटिल्य पोटापुरत्या शेतीलाच प्राधान्य देत होता. गरजा मर्यादीत ठेवा असं सांगणारा कौटिल्य हा बहुधा जगातील पहिला आणि शेवटचा अर्थशास्त्रज्ञ असावा.

भारतीय कापसाला युरोपात उदंड मागणी होती. तरिही कापसाचं व्यापारी उत्पादन आणि वस्त्रोद्योगाची वाढ भारतात जोमाने झाली नाही. ब्रिटीशांच्या आगमनानंतरही भारतीय सूती वस्त्रांची निर्यात युरोपात होत होती. किंबहुना या काळात भारत पक्क्या मालाची निर्यात करणारा देश होता. इंग्लडात औद्योगिक क्रांती झाल्यानंतर मात्र भारताच्या वस्त्रोद्योगाला उतरती कळा लागली. भारतातून कच्च्या मालाची अर्थात कापसाची निर्यात होऊ लागली आणि पक्क्या मालाची—कपड्याची आयात होऊ लागली. या शोषणातूनच भारतीय राष्ट्रवादाच्या आर्थिक अंगाची मांडणी दादाभाई नवरोजी यांनी केली. त्यानंतर इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना झाली. स्वदेशी आणि त्यानंतर खादी म्हणजेच कापूस आणि वस्त्रोद्योग प्रदीर्घकाळपर्यंत स्वातंत्र्य चळवळीच्या केंद्रस्थानी होता. औद्योगिक क्रांतीनंतर इंग्लडात आणि अन्य युरोपियन देशात भारतातून निर्यात होणारा कापूस देशी नव्हता तर अमेरिकन होता. कापूसकोंड्याच्या गोष्टीची सुरुवात तिथे झाली. स्वातंत्र्योत्तर काळातही या गोष्टीत फारसा बदल झाला नाही. कापूस उत्पादक शेतकरी आणि कापड उद्योगातील कामगार यांच्या परिस्थितीत फारसा बदल झाला नाही. दोन शतकं उलटली तरिही कापूसकोंड्याची गोष्ट सुरुच आहे.

टीप- जिज्ञासूंनी विविध संदर्भ उदा. हेरॉडोटसचा वा मॅगेस्थेनिसचा काळ, कापसाच्या मूळ चार जाती इत्यादी, स्वतःच शोधावेत. त्यासाठी विकीपिडिया किंवा इंटरनेटवरील अन्य वेबसाईटना भेटी द्याव्या किंवा ग्रंथांचा आधार घ्यावा.

Tuesday 6 October 2009

आणि बाकीचे सगळे.....

गेल्या अनेक विधानसभा निवडणुकांमध्ये सातत्याने एक ट्क्का किंवा त्यापेक्षा कमी मतं मिळवणारे अनेक पक्ष आणि कालपरवापर्यंत निवडणुकीच्या राजकारणात नसलेल्या संघटना, रिपब्लिकन डावी लोकशाही आघाडीच्या झेंड्याखाली एकत्र आल्या आहेत.
अरूण कोलटकरची एक कविता आठवली...
वेडाच्या टेबलावर
बैस पावासारखा
कागदाचा कोष फाटेल
तेव्हा सगळे स्लाईस गडगडतील
आधीचाच कापलेला असशील
एवढंच.

ही कविता ताज्या राजकीय संदर्भातही वाचता येते.....
वेडाचं टेबल—विधानसभा निवडणूक
बैस पावासारखा—रिडालोस
कागदाचा कोष फाटेल—निवडणूक निकाल
तेव्हा सगळे स्लाईस गडगडतील—१ टक्क्यापेक्षा कमी मतं मिळवणारे पक्ष-संघटना गडगडतील
पुढच्या दोन ओळी स्पष्ट करायला हव्यात ?

Monday 5 October 2009

भारतीय जिना पार्टी

हिंदुत्ववाद ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अधिकृत विचारधारा आहे. भारतीय जनसंघाने एकात्मिक मानवतावाद या विचारधारेचा पुरस्कार केला. भारतीय जनसंघाची स्थापना संघ स्वयंसेवकांनीच केली होती. जनसंघाचे बहुतांशी कार्यकर्ते संघाचेच पूर्णवेळ सेवक होते. एकात्मिक मानवतावाद आणि हिंदुत्ववाद यांच्यामध्ये त्यांनी कधीही फरक केला नाही. मंदिरात जाणारा मुसलमान तयार करणं हे संघाचं उद्दिष्ट होतं आणि आजही आहे. मात्र हिंदु समाज एवढा बहुप्रवाही आहे की या विचारधारेला व्यापक हिंदू समाजाची मान्यता मिळणार नाही, याची पक्की खूणगाठ संघ नेतृत्वाने बांधली होती. म्हणूनच संघ परिवारासाठी हिंदुत्ववाद तर निवडणूकीच्या राजकारणासाठी एकात्मिक मानवतावाद अशी विभागणी संघ परिवाराने केली. हिंदुत्वाच्या हितासाठी एकात्मिक मानवतावादाची किंवा गरज पडल्यास जनसंघाचीही आहुती देण्याची संघ परिवाराची व्यूहरचना होती.
भारतीय स्वातंत्र्यलढ्यात रास्वसंघाचं योगदान नव्हतं. किंबहुना स्वातंत्र्यप्राप्तीमुळे हिंदुत्ववाद बळकट होण्याची चिन्हं नव्हती म्हणून संघाने आपलं कार्य सांस्कृतिक असल्याचं घोषित केलं. स्वातंत्र्य आंदोलनात सहभाग नसल्याने जनसंघाचा जनाधार फारच मर्यादीत होता. उच्चवर्णीय, संस्थानिक आणि फाळणीमध्ये होरपळलेले हिंदु समूह, काँग्रेसच्या राजकारणात स्थान न मिळालेले जमीनदार, उदाहरणार्थ ठाकूर, असा जनसंघाचा जनाधार होता. अतिशय मर्यादीत जनाधार असल्याने जनसंघाने बिगर-काँग्रेसवादी राजकारणात शिरून आपलं प्यादं पुढे सरकवलं. या प्याद्याचा वजीर करण्याची कर्तबगारी संघ परिवाराने केली हे त्यांच यश मान्य केलं पाहिजे.
बिगर काँग्रेसवादाच्या राजकारणावर स्वार झाल्याने जनता पार्टीत जनसंघाचं विसर्जन झालं. १९७९ साली, दुहेरी निष्ठा या मुद्दयावर जनता पार्टीत फूट पडली. गांधीवादी समाजवाद ही जनता पार्टीची विचारधारा होती. तिचा मेळ संघ परिवाराच्या हिंदुत्वाशी बसत नाही. परिणामी जनता पार्टीतील पूर्वाश्रमीच्या जनसंघींनी रा.स्व.संघाशी असलेले संबंध तोडावेत, अशी मागणी जनता पार्टीचे नेते मधु लिमये, जॉर्ज फर्नांडीस इत्यादींनी केली. या मुद्द्यावर चरणसिंग, राजनारायण, कर्पूरी ठाकूर हे नेते जनता पार्टीतून बाहेर पडले. जनता पार्टीचं केंद्रातलं सरकार कोसळलं. त्यानंतर पूर्वाश्रमीच्या जनसंघाने भारतीय जनता पार्टीची स्थापना करण्याचं ठरवलं. नव्याने स्थापन झालेल्या भारतीय जनता पार्टीने गांधीवादी समाजवाद या विचारधारेचा स्वीकार केला. जनता पार्टी फुटली हिंदुत्वाच्या मुद्द्यावर पण भाजपने स्वीकारला गांधीवादी समाजवाद. या विचारधारेचा स्वीकार केल्यानंतर १९८४ साली झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपचे फक्त दोनच खासदार निवडून आले. अटलबिहारी वाजपेयीसारखे दिग्गजही पराभूत झाले.
१९८८ साली बाबरी मशीद पाडण्यासाठी संघ परिवाराने आंदोलन छेडलं. या आंदोलनाच्या समर्थनार्थ, लालकृष्ण अडवाणी यांनी नकली धर्मनिरपेक्षतेच्या (स्यूडो सेक्युलॅरिझम) विरोधात लढाई पुकारली आणि हिंदुत्वाचा उघड पुरस्कार केला. त्यानंतर भाजपची ताकद वाढू लागली. समाजवादी तोंडवळ्याचं बिगर-काँग्रेसवादी राजकारण हिंदुत्वाने हायजॅक केलं. मंडल आयोगाच्या राजकारणाने भाजपच्या हिंदुत्वाला विरोध करण्याचा क्षीण प्रयत्न केला. पण तो फारसा यशस्वी झाला नाही. जॉर्ज फर्नांडीस, शरद यादव, नितीशकुमार, रामविलास पासवान हे मंडल आयोगाचे खंदे समर्थकच भाजप नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सामील झाले.
काँग्रेसच्या नकली सेक्युलॅरिझमच्या विरोधातला प्रचार भाजपने कमालीच्या टोकाला नेला. शत्रूचा शत्रू तो आपला मित्र या नात्याने, गांधी-नेहरू-पटेल यांच्याशी उभा दावा मांडणारे धर्माच्या आधारावर देशाची विभागणी करण्याची मागणी करणारे महंमदअली जिना सेक्युलर होते अशी घोषणा भाजप अध्यक्ष लालकृष्ण अडवाणी यांनी पाकिस्तानात केली. त्यानंतर भाजपचे नेते जसवंतसिंह यांनी तर तशी मांडणी करणारा ग्रंथच लिहून काढला. अखंड भारताचा पुरस्कार करायचा आणि पाकिस्तानच्या निर्मात्याला सेक्युलर ठरवायचं आणि नेहरू-पटेल हे स्यूडो सेक्युलर नेते फाळणीला जबाबदार होते असा इतिहास लिहिण्याचा प्रयत्न भाजप नेतृत्वाने केला. देशाच्या फाळणीला चार-दोन राजकारण्यांना जबाबदार धरणं हीच मोठी गफलत आहे. जसवंत सिंह यांच्यावर टीका करताना भाजप नेतृत्वाने फक्त सरदार पटेलांना क्लीन चीट दिली, देशाच्या पहिल्या पंतप्रधानाला जसवंत सिंहांनी फाळणीचा गुन्हेगार ठरवलं, या आरोपावर मात्र मौन पाळलं.
वस्तुस्थिती ही आहे की तथाकथित नकली सेक्युलॅरिझमच्या विरोधातली भाजपची लढाई आता संपली आहे. रावण मेल्यावर रामायण संपतं त्यानुसार बाबरी मशीद पाडल्यावर हिंदुत्वाचं आंदोलन थंडावलं आहे. तथाकथित रामजन्मभूमीवर राम मंदिराची उभारणी करणं केंद्रात आणि राज्यात सत्ता असूनही भाजपला शक्य झालं नाही. बाबरी मशिदीच्या जागेवर राममंदिराची उभारणी करण्याचा मुद्दा सरकारच्या अजेंड्यावर आणण्यास भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या घटक पक्षांनी विरोध केला. जो श्रद्धेचा प्रश्न होता असं मानलं जात होतं तो आता कायदेशीर प्रश्न बनला आहे. जमिनीची मालकी कोणाकडे आहे याचा निकाल लागल्याशिवाय बाबरी मशीदच्या स्थानावर मंदिराची उभारणी करता येणार नाही. अर्थातच हिंदुत्वाचा विचार पुढे नेण्यासाठी भाजप वा भाजपच्या नेतृत्वाखालील बिगर-काँग्रेसवादाचं राजकारण उपयुक्त आहे असं संघ परिवाराला वाटत नाही कारण बिगर-काँग्रेसवादाच्या हिंदुत्वाला पाठिंबा देण्याच्या मर्यादा संघ परिवाराच्या ध्यानी आल्या आहेत. त्यामुळेच भारतीय जिना पार्टी अशी भाजपची बदनामी झाली तरीही संघ परिवाराला त्यात फारसा रस नाही.

२००९ च्या लोकसभा निवडणुकांनंतर भाजपच्या विद्यमान नेतृत्वात बदल करावा अशी चर्चा संघ परिवारानेच सुरु केली. बिगर काँग्रेसवादाच्या राजकारणाचा स्वीकार करताना मध्यम जातींमध्ये भाजपने आपला जनाधार निर्माण केला. त्यामुळेच अण्णा डांगे, ना.स. फरांदे, गोपिनाथ मुंडे यांचं नेतृत्व महाराष्ट्रात उभं राह्यलं. त्यापैकी फक्त मुंडेच टिकले. या मध्यमजातीय नेतृत्वाच्या राजकीय आकांक्षांमुळे हिंदुत्वाचा विचार पातळ होतो असा संघ परिवाराचा समज असल्याने, मुंडेंना शह देण्यासाठी नितीन गडकरी यांच्या हाती महाराष्ट्र भाजपची सूत्रं देण्यात आली. मी दिल्लीतून पुन्हा महाराष्ट्रात येऊ इच्छित नाही असं म्हणणारे मुंडे शेतक-यांना नाडणा-या सावकारांना धडा शिकवण्यासाठी पुन्हा महाराष्ट्राचा गृहमंत्री होईन अशी गर्जना करू लागले आहेत. काँग्रेस आघाडीचा पराभव करण्यासाठी सेना-भाजपने बिगर-काँग्रेसवादाच्या राजकारणाची कास धरली आहे. रायगड जिल्ह्यात शेकापला तर कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात राजू शेट्टींच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला तिस-या आघाडीला जागा सोडून काँग्रेसविरोधी मतांची विभागणी टाळण्याचे संकेत सेना-भाजपने दिले आहेत. मात्र या खेपेला सेना-भाजपला शरद पवारांची छुपी साथ लाभणार नसल्याने विधानसभेवर भगवा फडकवण्यासाठी मुंडेंना पराक्रमाची शर्थ करावी लागणार आहे.

Sunday 4 October 2009

शिवसेना पुराणात मनसेची वांगी

शिवसेना स्थापन झाली १९६७ साली आणि मुंबई महापालिका पूर्णपणे तिच्या ताब्यात आली १९८५ साली। तेव्हापासून आजतागायत मुंबई महापालिकेवर सेना-भाजप युतीचाच झेंडा फडकत राह्यलाय. याचा साधा अर्थ असा की मराठी माणसाचा मुंबईच्या लोकसंख्येतील टक्का जसा कमी होऊ लागला तशी शिवसेनेच्या मतांची टक्केवारी वाढत गेली. मुंबई महापालिकेत ९० टक्के कर्मचारी मराठी आहेत. पण मान्यताप्राप्त युनियन शिवसेनेची नाही. मुंबईच्या बेस्ट उपक्रमातही ९० टक्के कर्मचारी मराठी आहेत पण युनियन शिवसेनेची नाही. महाराष्ट्र शासनाच्या सुमारे २५ लाख कर्मचा-यांमध्ये ८५ टक्के मराठी आहेत पण तिथेही कर्मचारी संघटनांमध्ये शिवसेनेला स्थान नाही. मुंबईच्या गिरणीकामगारांमध्ये ८५ टक्के मराठी भाषक होते पण सेनेच्या युनियनला स्थान नव्हतं. ज्या उद्योगांमध्ये वा आस्थापनांमध्ये मराठी माणसाचा टक्का कमी तिथे शिवसेनेच्या युनियनची ताकद मोठी. जिथे आपण अल्पसंख्य आहोत तिथे मराठी माणूस आक्रमक होतो, बाहूबळाचा चमत्कार दाखवतो आणि सत्तेत पाय रोवतो. जिथे मराठी भाषक बहुसंख्य आहेत तिथे मात्र सेनेची मात्रा चालत नाही. आपणच मूळ शिवसेना आहोत असा दावा करणा-या राज ठाकरेंचीही लाइन हीच आहे. मराठी माणूस खतरे में अशी आरोळी देऊन, बाहुबळाचं प्रदर्शन करूनच राज ठाकरेंनी स्वतःचं स्थान निर्माण केलंय. बाळासाहेब ठाकरे यांनी जसं कायद्याच्या कक्षेबाहेर स्वतःचं समांतर सत्ताकेंद्र उभं केलं नेमका तोच मार्ग राज ठाकरेंनीही अवलंबला आहे. जया बच्चन, करण जोहर इत्यादी तालेवार लोक त्यांची माफी मागून स्वतःची सुटका करून घेऊ लागले आहेत.

मराठी माणसाचा न्यूनगंड हेच सेनेचं आणि आता मनसेचं इंधन आहे। म्हणूनच मी शिवाजीराजे भोसले बोलतोय हा चित्रपट मराठी लोकांना भावतो. न्यूनगंडांने पछाडलेला मराठी मध्यमवर्गीय नायक शिवाजी महाराज आपल्या पाठिशी उभे आहेत हे समजताच नरवीर होतो. हीच मराठी माणसाची फँटसी आहे. १९९० च्या विधनासभा निवडणुकांपासून शिवसेनेने महाराष्ट्र पादाक्रांत करायला सुरुवात केली. काँग्रेसच्या म्हणजे साखर सम्राटांच्या, शिक्षण सम्राटांच्या राजकारणाला मतदार कंटाळलेले होते. मध्यम जातींची तर या राजकारणाने गळचेपीच केली होती पण तरुण मराठा रक्तालाही वाव मिळत नव्हता. काँग्रेसमधल्या गटा-तटांनी ग्रामपंचायत, तालुका पंचायत, जिल्हा परिषद, साखर कारखाना, दूध सोसायट्या, खरेदी-विक्री संघ, क्रेडीट सोसायट्या ताब्यात ठेवल्या होत्या. सत्तेच्या वर्तुळात शिरकाव करण्याची संधीच मराठेतर समाजला मिळत नव्हती. ठराविक घराणी सोडली तर इतर मराठा कुटुंबातल्या तरुणांनीही आपल्या राजकीय महत्वाकांक्षा दडपून टाकाव्या लागत होत्या. हे समूह मोठ्या प्रमाणावर शिवसेनेकडे वळले. बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाचा करिष्मा त्याला कारणीभूत होता. मराठा स्ट्राँगमन याचं मराठी भाषांतर होतं मर्द मराठा. ही उपाधी इंग्रजी वर्तमानपत्रांनी शरद पवारांना बहाल केली होती. परंतु हा मर्द मराठा बाळासाहेब ठाकरेंचा केसही वाकडा करू शकत नव्हता. शिवसैनिकांनी वानखेडे स्टेडिअमची खेळपट्टी उखडली, दंगल केली, बाहुबळाचं उघड प्रदर्शन केलं, विधनासभेने बाळासाहेब ठाकरे यांच्यावर कारवाई करण्याची शिफारस केली, श्रीकृष्ण आयोगाने हिंदु-मुस्लिम दंगलीचा ठपका बाळासाहेंबावर ठेवला तरिही कोणत्याही काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याने बाळासाहेबांवर कारवाई करण्याची हिंमत दाखवली नाही. बाळासाहेब ठाकरे कायद्याच्या कक्षेबाहेर आहेत हाच त्यांचा करिष्मा होता. त्यामुळे केवळ मराठीच नाही तर अनेक समूहांना विशेषतः सत्ताकांक्षी समूहांना बाळासाहेबांचं आणि सेना या शब्दाचं आकर्षण होतं. पारशी सेनाही मुंबईत स्थापन झाली होती (अर्थात तिचा बाळासाहेबांशी संबंध नव्हता).

बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार दोघांनीही आपल्या पुतण्यांना आधी राजकारणात आणलं. पण आपला वारसा मात्र पुत्राला वा कन्येला द्यायचं ठरवलं. कुटुंबामध्ये आपल्याला वारसा हक्क मिळणार नाही हे ओळखूनच राजने लोकांमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आणि शिवसेनेचा राजकीय वारसा मिळवण्याचं राजकारण सुरु केलं. त्याने बाळासाहेबांचीच नेतृत्वशैली उचलली. म्हणजे बेधडक, बेलगाम विधानं करणं, फटकळपणे रेषेतून आणि शब्दांतून व्यंगचित्रं काढणं. ही शैली तरूणांनाच नव्हे तर प्रौढांनाही भावते. आपण समांतर सत्ता केंद्र आहोत हे ठसवण्याची एकही संधी तो वाया घालवत नाही. जेट एअरवेजने नोकर कपातीची घोषणा केल्यावर कर्मचा-यांनी राजकडे धाव घेतली. जेट एअरवेजच्या कर्मचा-यांमध्ये मराठी माणसांचा टक्का फारच कमी असेल पण राजने तात्काळ आवाज दिला आणि जेट एअरवेजने नोकर कपातीचा निर्णय मागे घेतल्याचं जाहीर केलं।

मनसेने काँग्रेसकडून सुपारी घेतल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला आहे। पण राजकारणात हे अटळ असतं. वसंतराव नाईक मुख्यमंत्री असताना शिवसेनाही वसंतसेना म्हणून ओळखली जात होतीच. त्यावेळी सेनेच्या मदतीने काँग्रेसने गिरणगावातला कम्युनिस्टांचा प्रभाव मोडून काढला होता. पण आता त्याच काँग्रेसला सेनेला ठेचण्यासाठी मनसे हाताशी आली आहे. अशी संधी साधूनच मनसेचा किल्ला मजबूत करायचा राज ठाकरे यांचा विचार आहे. शिवसेनेचं नवनिर्माण म्हणजे मनसे, अशीच राज ठाकरे यांची भूमिका आहे. तीच त्यांच्या पक्षाच्या नावातही प्रतिबिंबित होते.

संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनापासून मराठी भाषक हाच एक मोठा मतदारसंघ तयार व्हायला सुरुवात झाली. या आंदोलनाच्या काळात यशवंतराव चव्हाणांसारखा नेता केवळ ६०० मतांच्या फरकाने विजयी झाला होता, एवढा पाठिंबा संयुक्त महाराष्ट्र समितीला मिळाला होता. संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाच्या नेत्यांना या मतदारसंघांची ताकद ध्यानी आली नाही आणि वैचारिक भूमिकांच्या खडकांवर समितीचं तारू फुटलं. शिवसेना नामक संघटनेसाठी एक पोलिटीकल स्पेस त्यामुळे तयार झाली. मनसेने याच मतदारसंघावर लक्ष केंद्रीत केलं आहे. म्हणूनच शिवसेनेला मनसेचा कडवा विरोध आहे. बाटगा अधिक कडवा असतो. संयुक्त महाराष्ट्र समिती, शिवसेना आणि मनसे, मराठी माणसाचा कडवेपणा दिवसेंदिवस वाढत चालला आहे.

Saturday 3 October 2009

गाढव आणि ब्रह्मचर्य सांभाळण्याची काँग्रेसी रणनीती

राष्ट्रवादी काँग्रेस हे काँग्रेसच्या आवारातील अनधिकृत बांधकाम आहे. ते नियमीत करून घ्यायचं तर महाराष्ट्रात पुन्हा काँग्रेस आघाडीचं सरकार आलं पाहिजे, अशी तंबी काँग्रेस श्रेष्ठींनी शरद पवारांना दिली असावी. नुक्त्याच झालेल्या लोकसभा निवडणूकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं पितळ उघडं पडलं. शरद पवार पंतप्रधान बनावेत असा कौल देशाच्या वा महाराष्ट्राच्या जनतेने सोडाच पण पुणे आणि कोल्हापूरातल्या मतदारांनीही दिला नाही. पुन्हा काँग्रेस आघाडीचं सरकार महाराष्ट्रात आलं तर क्लिअर टायटल मिळालं नाही तरी राष्ट्रवादी काँग्रेसचा वहिवाटीचा हक्क शाबीत होईल।

१९९५ साली राज्यात ख-या अर्थाने पहिलं बिगर-काँग्रेस सरकार आलं. त्या सरकारला ४५ अपक्ष आमदारांचा पाठिंबा मिळाला. यापैकी बहुतेक अपक्ष आमदार काँग्रेस पक्षातील बंडखोर होते. १९९९ साली यापैकी बहुतेक बंडखोरांनी राष्ठ्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. १९९९ साली झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये शरद पवारांनी बिगर-काँग्रेसवादाचा हुकूमाचा पत्ता खिशात ठेवलेला असल्याने सेना-भाजप युतीची साथ त्यांना काही मतदारसंघात मिळाली. आणि त्याचा फायदा घेऊनच राष्ट्रवादी काँग्रेसला मुख्यमंत्रीपद मिळावं असा प्रयत्न शरद पवारांनी केला होता पण उपमुख्यमंत्रीपदावर त्यांना समाधान मानावं लागलं. राष्ट्रीय पातळीवर भाजपची पिछेहाट सुरु झाल्यानंतर सोनिया गांधींचं नेतृत्व स्वीकारण्याखेरीज पर्यायच नव्हता. त्यातच सोनिया गांधींनी पंतप्रधानपद नाकारल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्वतंत्र अस्तित्वाचं प्रयोजनच संपुष्टात आलं. ऑक्टोबर महिन्यात होणा-या विधानसभा निवडणुकांनंतर राष्ट्रीय पातळीवर भाजपचं पुनरुत्थान होईपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस पक्षातील एक गट म्हणूनच कार्यरत राहील।

काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय नेतृत्वावर दबाव टाकण्यासाठी बिगर काँग्रेसवादाचा हुकूमाचा पत्ता शरद पवार १९७८ सालापासून मोठ्या हुषारीने खेळत आले आहेत. बिगर-काँग्रेसवादाच्या राजकारणाला दोन महत्वाचे संदर्भ आहेत. बिगर काँग्रेसवादाचं राजकारण काँग्रेसच्या वैचारिक भूमिकेला विरोध करणारं होतं. काँग्रेस जरी स्वतःला समाजवादी म्हणवत असली तरी ती पुरेशी समाजवादी नाही हे बिगर काँग्रेसवादाचं म्हणणं होतं. इंदिरा गांधी यांच्या एकाधिकारशाहीच्या विरोधाचा एक पदर या भूमिकेला ब-याच वर्षांनी चिकटला. या राजकारणासाठी मध्यम जातींचा सामाजिक आधार बिगर-काँग्रेसवादी राजकारणाने मिळवला. बिगर-काँग्रेसवादाचं राजकारण भाजप आणि अन्य प्रादेशिक पक्षांनी हायजॅक केलं. बिगर-काँग्रेसवादाची वैचारिक भूमिका हिंदुत्वाकडे म्हणजे डावीकडून उजवीकडे गेली. जॉर्ज फर्नांडीस, नितीशकुमार, रामविलास पासवान इत्यादी समाजवादी चळवळीतल्या नेत्यांनी आपल्या संकुचित स्वार्थासाठी भाजपच्या नेतृत्वाला मान्यता दिली।

इंदिरा गांधींच्या काळात ब्राह्मण, मुसलमान, दलित आणि आदिवासी या समाजघटकांवर काँग्रेसने लक्ष केंद्रीत केलं. त्यानंतर राज्याच्या पातळीवर वेगवेगळी समीकरणं जुळवण्याचा प्रयत्न काँग्रेसने केला. राज्य पातळीवरील समीकरणांमध्ये राज्यामधील शेतकरी जातींचं नेतृत्व शिरजोर होणार नाही याची खबरदारी काँग्रेसने घेतली. १९७८ साली काँग्रेस (चव्हाण-रेड्डी) मधून बाहेर पडल्यावर शरद पवारांनी काँग्रेस (समाजवादी) या पक्षाची स्थापना केली. हा पक्ष १९८६ साली त्यांनी काँग्रेसमध्ये विसर्जित केला. १९९२-९३ साली झालेल्या दंगलीनंतर काँग्रेस अध्यक्ष आणि पंतप्रधान, पी.व्ही. नरसिंहराव यांनी शरद पवारांची दिल्लीतून महाराष्ट्रात रवानगी केली. त्यापूर्वी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्याकरवी शरद पवार राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाला जबाबदार असल्याच्या समजुतीवर काँग्रेस श्रेष्ठींनी जवळपास शिक्कामोर्तबच केलं होतं. कोंडीत सापडलेल्या पवारांनी सेना-भाजप युतीच्या ताब्यात राज्य जाण्याची व्यवस्था केली. स्वगृही परतल्यानंतर १०-१२ वर्षांनंतर पवारांनी काँग्रेसमधून हकालपट्टी ओढवून घेतली आणि राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. देशाचा पंतप्रधान भारतीय वंशाचा असावा ही मागणी करून आपला राष्ट्रीय बाणा भाजपच्या तोंडावळ्याचाही असू शकतो असं सूतोवाच पवारांनी करून ठेवलं. अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना त्यामुळेच पवारांना कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा असणारं पदही मिळवलं. शरद पवारांनी काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर सुरु केलेल्या पक्षांची नावं पाह्यली की बिगर काँग्रेसवादाच्या राजकारणाचा लंबक डावीकडून उजवीकडे गेला हे स्पष्ट होतं. १९७८ साली शरद पवारांनी समाजवादी काँग्रेस नावाचा पक्ष काढला तर एकविसाव्या शतकात राष्ट्रवादी काँग्रेस असं आपल्या पक्षाचं नामकरण केलं।

२००९ सालच्या लोकसभा निवडणुकांनंतर, आपण राष्ट्रीय पातळीवरील नेते असलो तरिही राष्ट्रीय नेते नाही, हे वास्तव पवारांनी स्वीकारलं असावं. पंतप्रधान होण्याच्या त्यांच्या महत्वाकांक्षेला जनतेने साथ दिली नसल्याने राष्ट्रीय पातळीवर सोनिया आणि त्यानंतर राहुल गांधींचं नेतृत्वच आपल्याला मान्य करावं लागणार याची खूणगाठ त्यांनी बांधली आहे. म्हणूनच राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची संख्या वाढल्यानंतरही मुख्यमंत्रीपदावर आपला पक्ष दावा करणार नाही, याची खबरदारी त्यांनी घेतली. नजिकच्या भविष्यकाळात म्हणजे पुढच्या पाच वर्षांत पवारांच्या महत्वाकांक्षेला राष्ट्रीय पातळीवर राजकीय पाठिंबा मिळणार नाही हे आता स्पष्ट झालंय. म्हणूनच महाराष्ट्रात १९९५ साली जे घडलं त्याची पुनरावृत्ती होणार नाही याची जबाबदारी काँग्रेसश्रेष्ठींनी पवारांवरच सोपवली आहे. त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या दोन्ही पक्षातील बंडोबांना थंड करण्याच्या कामी शरद पवारांनी पुढाकार घेतला असावा. याचा अर्थ निवडणुकीत विजयी होणारे काँग्रेस वा राष्ट्रवादीचे बंडखोर सेना-भाजपच्या आश्रयाला जाणार नाहीत याची खबरदारी शरद पवारांनी घ्यावी, असं काँग्रेसश्रेष्टींना अभिप्रेत आहे. गाढवही जाऊ नये आणि ब्रह्मचर्यही शाबूत रहावं यासाठी दोन्ही काँग्रेस पक्ष इरेला पडले आहेत.

Tuesday 29 September 2009

बाजारातली तूर २

हरित क्रांती होण्याअगोदर तूर आणि गव्हाच्या उत्पादनात फारसा फरक नव्हता. हरित क्रांतीनंतर गव्हाचं उत्पादन झपाट्याने वाढलं. म्हणजे जवळपास पाच पटीने वाढलं. सिंचनाची व्यवस्था झाली, दर एकरी अधिक उत्पादन देणा-या गव्हाची बियाणं शेतक-यांना मिळाली, सरकारी दराने गव्हाची खरेदी सुरु झाली. गव्हाच्या उत्पादनाची आणि विक्रीची जोखीम सरकारने उचल्याने, गव्हाच्या उत्पादनात विक्रमी वाढ झाली. याउलट डाळींची परिस्थिती गंभीरच राह्यली. परिणामी डाळींच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली नाही.
पावसाळ्यामुळे म्हणजेच मान्सूनमुळे कोणत्याही पशुखाद्याचा पुरवठा ठोक पुरवठा होत नाही त्यामुळेच भारतात मांसाहारापेक्षा शाकाहार सामान्यांना परवडतो. म्हणूनच प्रथिनांची गरज डाळींद्वारे भागवली जाते. डाळींमध्ये तूरडाळ सर्वाधिक लोकप्रिय आहे. कारण हे पिक जवळपास कोणत्याही हवामानात येतं. काश्मीरपासून कन्याकुमारी पर्यंत आणि मणिपूरपासून कच्छपर्यंत प्रत्येक राज्यात तूरीची लागवड कमी-अधिक प्रमाणात होत असते. मात्र मार्केटेबल सरप्लस असं तूरीचं उत्पादन कर्नाटक, आंध्र, महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश या राज्यांमध्येच होतं. तूर हे खरीपाचं पिक आहे. म्हणजे पावसाळ्याच्या सुरुवातीला या पिकाची पेरणी होते आणि पावसाळा संपल्यावर त्याची काढणी होते. तूर हे पिक पावसाच्या पाण्यावर घेतलं जातं. अर्थातच सिंचनाची व्यवस्था नसते. अगदी संरक्षित पाणीही या पिकाच्या वाट्याला येत नाही. त्यामुळे तूरीचं दर हेक्टरी उत्पादन जास्तीत जास्त ७ क्विंटल येतं. त्यातच तूर हे सहा महिन्याचं पिक आहे. काही जाती तर १० महिन्यांच्या आहेत.
तूर हे कोरडवाहू पिक आहे. त्यामुळे मान्सूनच्या आगमनानुसार त्याच्या पेरणीच्या आणि काढणीच्या तारखा प्रत्येक राज्यात बदलत जातात. मान्सून पहिल्यांदा पोचतो केरळला. तिथे तूरीचं वरकड उत्पादन नसल्याने त्यानंतरच्या राज्यात म्हणजे कर्नाटक आणि आंध्रमध्ये सर्वात प्रथम तुरीची पेरणी होते. त्यानंतर महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश या क्रमाने तुरीची पेरणी होते. कर्नाटक आणि आंध्रमधली तूर पहिल्यांदा बाजारात येते. तिला दर बरा मिळतो. परंतु कोणत्या का कारणाने या राज्यातली तूर यायला उशीर झाला की महाराष्ट्रातून आवक सुरु झाल्याने तुरीचे भाव पडतात. महाराष्ट्रामागोमाग गुजरात त्यानंतर मध्य प्रदेशातून आवक सुरु झाल्याने तुरीला चांगला भाव मिळणं अवघड असतं. उत्तर प्रदेशातून तुरीची आवक सुरु होते तोवर आंध्र आणि कर्नाटकातून रब्बी डाळींची मुख्यतः चण्याची, उडदाची आवक सुरु होते. सरकारने जाहीर केलेला हमीभाव खूपच तुटपुंजा असतो. म्हणजे बाजारपेठेतल्या दरापेक्षा भरपूर कमी असतो. त्यामुळे सरकारी भावाला तुरीची खरेदी-विक्री होतच नाही. गेली दोन वर्षं आंध्र प्रदेशने तूरीचा हमीभाव ५०० रुपयांनी वाढवून दिला. जेणेकरून शेतक-यांना तुरीचं उत्पादन घेण्यासाठी उमेद यावी. केंद्राने जाहीर केलेला हमीभाव २००० रुपये क्विंटल त्यामध्ये राज्य सरकारने ५०० रुपयांनी वाढ केली. जेणेकरून हंगाम सुरु होताना शेतक-यांना चांगला दर मिळावा. याचा अर्थ असा की तुरीला चांगला भाव मिळत नाही. भाव मिळत नसल्याने तीन महिन्यात तयार होणा-या तुरीच्या जातींचा प्रसार होत नाही. प्रसार झाला तरी शेतकरी त्यांच्या देखभालीवर फारसा खर्च करत नाहीत. परिणामी तूरीचं उत्पादन कधीही पुरेसं होत नाही. म्यानमारसारखे देश तुरीचं उत्पादन केवळ भारतीय बाजारपेठेसाठीच करतात. तूरीचं सर्वाधिक उत्पादन आणि सेवन भारतातच होतं. भारतच तूरडाळीचा सर्वात मोठा आयातदार आहे. वेगवेगळ्या राज्यांतून वेगवेगळ्या वेळी सुरु होणारी आवक आणि आयात यामुळे तूर हे नगदी पिक होण्यावरच मर्यादा येतात. त्यामुळे अर्थातच तुरीचं उत्पादन वाढत नाही.
त्यातच म्यानमार वा चार-दोन आफ्रिकी देशातही तुरीच्या उत्पादनाला फटका बसला की मागणी जास्त पण पुरवठा कमी असल्याने तुरीच्या किंमती वाढतात. अशा परिस्थितीत रास्त दरात डाळ उपलब्ध करून देण्यासाठी सरकारचा बाजारपेठेतला हस्तक्षेप आवश्यकच ठरतो। तूर डाळीच्या किंमती ८०-९० रुपये किलो झाल्यावर सरकारने हस्तक्षेपाचा निर्णय घेतला। सरकारचा हस्तक्षेप म्हणजे नोकरशाहीचाच हस्तक्षेप ठरतो। त्यामुळे भ्रष्टाचाराला वाव मिळतो। सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील भ्रष्टाचार दूर करायचा असेल तर केवळ धाडी घालून वा केसेस दाखल करून तो प्रश्न सुटणार नाही। त्यासाठी नव्या मार्गाचाच अवलंब करावा लागेल। म्हणजे नवी सिस्टीम आणावी लागेल।
तरच बाजारातली तूर रास्त दरात घरात येईल।

टीपः जिज्ञासू वाचकांनी विविध नियकालिकं, वेबसाईटस्, अहवाल आणि ग्रंथ, संदर्भ तसेच आकडेवारी, संख्याशास्त्रीय माहितीसाठी पहावेत।

Monday 28 September 2009

बाजारातली तूर -- १

भारतातली शेती पावसाच्या भरवंशावर असते, हे वाक्य शाळेपासून मनावर बिंबवलं जातं। वस्तुतः कोणत्याही देशातली शेती पावसावरच अवलंबून असते कारण शेतीसाठी आणि पिण्यासाठी आवश्यक असणारं पाणी आकाशातच तयार होतं. जमिनीत पाणी तयार होण्याची नैसर्गिक यंत्रणा कुठेही अस्तित्वात नाही. मान्सून वा मोसमी वा-यांवर भारतातली शेती अवलंबून असते असं म्हणणं अधिक योग्य ठरेल. मोसमी वारे वा मान्सून हा शब्द अरबांनी भारतीय उपखंडाची ओळख झाल्यावर प्रचलित केला. आपल्याकडे “नेमेचि येतो मग पावसाळा”, म्हणजे ‘पावसाळा’ हाच शब्द होता. मान्सून हा शब्दच परदेशी असल्याने तो लहरी असतो हे गृहितकही परदेशीच आहे. मान्सून लहरी असता तर भारत हा शेतीप्रधान देश राहिलाच नसता. अन्नधान्याची वाढती गरज पुरवण्यासाठी पावसाने जे वेळापत्रक पाळायला हवं ते पाळलं जात नाही म्हणून मान्सूनला लहरी म्हणण्याचा प्रघात रुढ झाला आहे.
शेतीप्रधान ही संज्ञाही तपासून पाह्यला हवी. शेतीप्रधान या शब्दामध्ये पिकांचं वैविध्य अभिप्रेत नाही. केवळ शेतीवर अवलंबून असणारी लोकसंख्या आणि सकल राष्ट्रीय उत्पादनात शेतीचा वाटा हे दोन मुद्दे विचारात घेऊन एखादा देश शेतीप्रधान आहे की नाही हे ठरवलं जातं. औद्योगिक क्रांती होईपर्यंत जगातील अनेक देश शेतीप्रधान होते. युरोप कदाचित व्यापार प्रधान असावा. शेतीवर गुजराण होईल एवढं उत्पादनच तिथे त्या काळात होत नव्हतं. पिकांची विविधताही फारशी नव्हती. मान्सूनमुळेच भारतामध्ये विविध प्रकारची शेती आणि पिकं आहेत. युरोप वा अमेरिकेसारखी केवळ चार-दहा पिकांची शेती भारतात होत नाही. धान्य, डाळी, तेलबिया, भाज्या, फळं, दूध, मांस, मासे अशा कोणत्याही खाद्यान्नामध्ये भारतात जेवढी विविधता आहे तेवढी क्वचितच अन्य कोणत्या देशात असेल. मान्सूनच्या नैसर्गिक वेळापत्रकाप्रमाणे जगण्याच्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी विविध पिकं आणि खाद्यान्न भारतातल्या समूहांनी विकसीत केली. कमोडिटी मार्केटच्या परिभाषेत याला हेजिंग म्हणतात. अमेरिकेत गहू, मका, सोयबीन या तीनच पिकांमध्ये स्पर्धा असते. या उलट भारतात गहू, धान (धानाच्या अनेक जाती आहेत), ज्वारी, बाजरी, मका, डाळी, सोयबीन, भुईमूग, करडई, सूर्यफूल अशी अनेक पिकं घेतली जातात. विविधता आहे म्हणूनच दर एकरी उत्पादन कमी आहे. किंवा दर एकरी उत्पादन कमी आहे म्हणूनच विविधता आहे.
शेतीमालाचं ठोक उत्पादन नसल्यामुळे आपल्याकडचा अन्न प्रक्रिया उद्योगही प्रामुख्याने घरगुती वा कौटुंबिक पातळीवरचा आहे। राज्यच नव्हे तर प्रादेशिक वैशिष्ट्यानुसार स्वैपाकाच्या पद्धती, चवी आपल्याकडे आहेत। त्यामुळे आहारशास्त्राचे अनेक नियम आपल्या खाण्या-पिण्याला लागू होत नाहीत. कारण आधुनिक आहारशास्त्राला आपल्या देशातील अनेक खाद्यान्नांचे गुणधर्मच ठाऊक नाहीत. खाद्यान्नांच्या किंमती त्यांच्यातील पोषणमूल्यांवर ठरतात अशी आधुनिक अर्थातच अमेरिकन धारणा आहे. भारतामध्ये मात्र हे सूत्र उलटंपालटं होऊन जातं. उदाहरणार्थ डाळी. प्रथिनांची गरज पूर्ण करण्यासाठी डाळी आहारात आल्या. प्रथिनांचं सर्वाधिक प्रमाण उडदामध्ये असतं। त्यानंतर मूग, त्यानंतर तूर आणि सर्वात शेवटी चणा। मात्र मेदाचं प्रमाण चण्यामध्ये सर्वाधिक असतं। त्यामुळेच तूरडाळ सर्वसामान्यांना परवडणारी होती. या वर्षी मात्र तूरडाळीच्या किंमती चणाडाळीपेक्षा दुप्पट आहेत. मात्र त्यामुळे चणाडाळीचा खप वाढला नाही. लोकांना महाग तूरडाळच हवी आहे. भारतीय जीवन तथाकथित कमोडिटी मार्केटच्या चौकटीत पूर्णपणे बंदिस्त होऊ शकत नाही.

टीपः जिज्ञासू वाचकांनी विविध नियकालिकं, वेबसाईटस्, अहवाल आणि ग्रंथ, संदर्भ तसेच आकडेवारी, संख्याशास्त्रीय माहितीसाठी पहावेत।

Sunday 27 September 2009

चौकटीबाहेरचे चिंतन

प्रिय किशोर,
बोलणं आणि ऐकणं स्केल-अप केलं की लिहिणं-वाचणं होतं. बोलताना ऐकणारा साक्षात समोर असतो. तो आपल्याला ओळखत असो वा नसो. लिहिताना मात्र वाचकाच्या प्रतिमेला उद्देशून आपण लिहितो. निवडक पळशीकर या पुस्तकाची तू लिहिलेली प्रस्तावना वाचताना तू माझ्याशी बोलतो आहेस हे मला कळलं.
व्यक्ती, विचारवंत, विचारव्यूह आणि मांडणीची शैली म्हणून वसंत पळशीकरांची ओळख तू अतिशय नेमकेपणाने करून दिली आहेस. परिक्षेला बसणारा विद्यार्थीच सर्व मुद्दे तपशीलात लिहून दाखवू शकतो. सर्वसाधारण वाचक आपल्याला जे ठाऊक आहे त्याला दुजोरा देणारे मुद्दे ध्यानात ठेवतो तर चोखंदळ वाचक आपल्या ठाऊक असलेल्या मुद्द्यांचे संदर्भ ताडून पहातो आणि वेगळे मुद्दे नोंदवून ठेवतो. वसंत पळशीकरांच्या निबंध संग्रहाला तू लिहिलेल्या प्रस्तावनेत यापैकी प्रत्येक वाचकाला काही ना काही मिळेलच.
पळशीकरांच्या निबंधांची निवड करण्याचा पेच तू मांडला आहेसच मात्र तो ब-याच अंशी सोडवलाही आहेस. तो पूर्णपणे सोडवणं खुद्द पळशीकरांनाही जमणार नाही एवढं लिखाण त्यांनी केलं आहे. हे अवघड काम दिलेल्या वेळेत पूर्ण करून पळशीकरांचं विचारधन पुढच्या पिढीच्या हाती सोपवण्याचं महत्वाचं काम तू केलंयस. लोकवाङमयगृह आणि सुनील कर्णिकचे त्यासाठी आभारच मानायला हवेत.
निवडलेल्या निबंधांची साक्षेपी ओळख करून दिल्यामुळे पळशीकरांचा विचारव्यूह त्या काळातील सामाजिक-राजकीय संदर्भात समजून घेण्यास मदत होते. पळशीकर ज्या काळात लिहित होते त्या काळात शासनाच्या हस्तक्षेपाने राजकीय-सामाजिक-आर्थिक पुनर्रचना केली पाहिजे या विचाराला सर्वसाधारणपणे मान्यता होती. पळशीकरांनी मात्र शासनापेक्षा लोकांचा सहभाग हा या पुनर्रचनेचा केंद्रबिंदू मानला. हा तू मांडलेला मुद्दा अन्य कोणी विचारवंताने पळशीकरांच्या संबंधात नोंदवल्याचं मला ठाऊक नाही. संपूर्ण पळशीकर ग्रंथरुपात उपलब्ध नाही. विविध नियतकालीकांमधील शेकडो लेख मिळवणं वाचकाला शक्य नाही, त्यामुळे निवडक पळशीकर हाच पळशीकरांच्या साहित्याचा दस्तऐवज होईल. (भा. ल. भोळेने संपादित केलेले वसंत पळशीकरांचे जमातवादासंबंधातील लेख ग्रंथरूपात उपलब्ध आहेतच. ते महत्वाचे आहेत मात्र ते एकाच विषयाशी संबंधीत आहेत.)
विसाव्या शतकात विकसीत झालेल्या समाजशास्त्रीय परिप्रेक्ष्यात गांधी विचाराची मांडणी आणि विस्तार पळशीकरांनी केला असं माझं आकलन आहे. नर्मदा बचाव आंदोलन आणि त्यानुषंगाने उपस्थित झालेले अनेक मुद्दे यासंबंधातही पळशीकर मूलगामि मांडणी करू शकले. त्यांच्या पिढीच्या अनेकांना ते शक्य झालं नाही.
नानासाहेब गोरे, स. ह. देशपांडे आणि ज. वि. पवार यांच्याशी पळशीकरांचे वाद झाले असा उल्लेख तू केला आहेस. ज. वि. पवारांसोबत झालेला वाद माझ्या वाचनात नाही. स.ह. देशपांडेंच्या सोबत झालेला वाद भारतातील हिंदु-मुस्लिम समस्येची मांडणी कशी करावी या संबंधातील होता. सेक्युलर आणि पुरोगामि विचारवंतांनी केलेल्या मांडणीतील उणिवांचा फायदा उठवत, स.ह. देशपांडेंनी हिंदुत्ववादी मांडणीची गरज अधोरेखित केली होती. ग्रंथापेक्षा लोकजीवन-लोकसंस्कृती यांना केंद्रस्थानी ठेवून पळशीकरांनी त्यांचा प्रतिवाद केला होता. या अर्थाने तो निव्वळ वैचारीक वाद होता. नानासाहेब गोरे हे केवळ वैचारिक वादात नव्हते कारण ते एका पक्षाचे नेते होते. त्यांनी वैचारिकतेसोबतच कार्यक्रमाचाही मुद्दा उपस्थित केला आणि त्यामुळे पळशीकर दोन पावलं मागे सरल्याचं मला स्मरतं। साता-याला झालेल्या लोकशाही समाजवाद या विषयावरील चर्चेत पळशीकरांनी मांडलेल्या टिपणाच्या संदर्भात प्रकाश बाळनेही नेमका हाच म्हणजे कार्यक्रमाचा मुद्दा उपस्थित केला होता। पळशीकरांनी केलेल्या वाद-विवादांचा आढावा कदाचित् पानांच्या मर्यादेमुळे तुला घेता आला नसावा. परंतु पुढच्या आवृत्तीत त्याचा समावेश करता आला तर उत्तम.
या पुस्तकाच्या आणि प्रस्तावनेच्या निमित्ताने तुला आपला वाचक आणि विषयही गवसलेला आहे. त्यामुळेच आता दणकून लिखाण करायला हवंस।
कळावे,
सुनील तांबे



निवडक वसंत पळशीकर
चौकटीबाहेरचे चिंतन
संपादक- किशोर बेडकिहाळ
प्रकाशन- लोकवाङमय गृह

Wednesday 23 September 2009

लॅपटॉपवर सत्यजित राय-- २

रांड, सांड, सिढी, संन्यासी
उनसे बचे तो सेवा करे काशी

अच्युतराव पटवर्धनांच्या अंत्यसंस्कारासाठी वाराणसीला गेलो होतो तेव्हा या ओळी मी ऐकल्या. रत्नाकर पांडे या काँग्रेसी नेत्याकडून. मात्र त्यावेळी वाराणसी शहरात जायला वेळ नव्हता. त्यानंतर ब-याच वर्षांनी मी आणि सतीश तांबे वाराणसीला गेलो होतो. तेव्हा या ओळींची प्रचिती आली. छोट्या गल्ल्यांमध्ये निवांत उभे असलेले वळू, दगडी पाय-यांचे घाट, यात्रेकरूंचा पिच्छा पुरवणारे पंडे वा संन्यासी आणि गंगापूजन करणा-या विधवा बायकांचे तांडे. काशी ही मृत्युची नगरी आहे. अनेक जण तिथे शेवटचा श्वास घेण्यासाठी येतात. अपराजितो या चित्रपटात सत्यजित रायने ओपूच्या आईची कहाणी सांगताना वाराणसी हे शहर एक पात्र म्हणून उभं केलंय. वाराणसीचं असं दर्शन अन्य कोणत्याही चित्रपटात घडत नाही.
अपूर्वचे वडील बायको-मुलाला घेऊन बंगालातून वाराणसीला येतात. तिथे गंगाकिनारी एका घाटावर ते बंगाली विधवांना पोथी वाचून दाखवायचे. त्यावर मिळणा-या दक्षिणेवर कुटुंबाचा चरितार्थ चालायचा. वाराणसीच्या गल्ली-बोळांमध्ये ओपू खेळायचा. वडलांचा मृत्यु होतो. आई एका श्रीमंताघरी घरकाम करू लागते. लहानगा ओपू घरमालकाच्या हुक्क्यामधे निखारे भरताना ती पाहते आणि मुलाच्या भवितव्याची चिंता तिच्या चेहे-यावर स्पष्ट दिसते. आता इथे काम करायचं नाही असं ती मनोमन ठरवते. बंगालात आपल्या दूरच्या नातेवाईकाकडे ती राह्यला जाते. तिथे ओपूची शाळा सुरु होते. त्याला विज्ञानाची गोडी लागते. शालांत परिक्षेत तो जिल्ह्यातून दुसरा येतो. पुढच्या शिक्षणासाठी कोलकत्याला शिकायला जायचं ठरवतो. ओपू दूर जाणार या कल्पनेनेच आईचा जीव कासावीस होतो. पण तरीही ती त्याला अनुमति देते. पै पै करून साठवलेली पुंजी त्याला देते. ओपूला स्कॉलरशिप मिळालेली असते. हेडमास्तरही त्याला मदत करतात. एका प्रिटिंग प्रेसमध्ये काम करून तो कॉलेजचं शिक्षण घेऊ लागतो. सुटीत गावी आईला भेटायला जातो. एक दिवस घरी राहतो. सकाळी लवकर उठून कोलकत्याला जाणारी रेल्वे पकडायची असते. तो अजून काही काळ घरी असावा असं आईला वाटत असतं. ती त्याला पहाटे उठवत नाही. त्याला जाग येते तेव्हा उशीर झालेला असतो. तो आईवर चिडतो. धुसफूस करत कपडे भरतो आणि स्टेशनवर जातो. तिकीट काढतो. आगगाडी येते. तेव्हा त्याला आईची आठवण येते. तो माघारी जातो. एक दिवसानंतर तो कोलकत्याला जातो. इथे आई आजारी पडते. वातामध्ये ओपू घरी आल्याचा तिला भास होतो. शेजारीण ओपूला कार्ड टाकते. ओपू धावत घरी येतो. तोवर सर्व संपलेलं असतं. ओपू झाडाखाली बसून अश्रू गाळतो आणि कोलकत्याला जायला निघतो.
या चित्रपटातला काळ खूपच मोठा आहे. अनेक स्थळं आहेत. त्यामुळे असेल कदाचित् पण प्रत्येक टप्प्यावर एडिटिंगने चित्रपटला गती दिलीय. ओपूचे वडील रात्री शेवटचा श्वास घेतात आणि दुस-या शॉटमध्ये कबुतरांचा थवा आभाळात झेप घेताना दिसतो. गंगेच्या घाटावरून आकाशात रेघोट्या ओढणारे कबुतरांचे थवे दिसतात. आई ओपूला घेऊन बंगालात परत जाते तेव्हा रेल्वेच्या खिडकीत ती बसलेली असते. तिच्या चेहे-यावरचे बदलणारे भाव आणि तिच्या नजरेने टिपलेली पळत्या झाडांची, गावांची, निसर्गाची दृष्यं काही क्षणात आपल्याला उत्तर भारतातून बंगालात घेऊन जातात. सत्यजित रायचे चित्रपट पाह्यले की पंचेद्रियांच्या संवेदना तीक्ष्ण होतात; आपले अनुभव, नातेसंबंध परिसराशी, निसर्गाशी घट्ट जुळलेले असतात त्यांना असलेल्या वैश्विक परिमाणाचं भान येतं.
अपराजितो मी लॅपटॉपवर पाह्यला. कानात इअरफोन घातले की पूर्ण एकाग्र होऊन चित्रपट पाहता येतो. थिएटरमध्येही आपण एकटेच असतो. तो एकटेपणा समूहातला असतो. समूहातल्या प्रत्येकाचा चित्रपटाचा अनुभव आणि आकलन वेगळं असतं. चित्रपट संपल्यावर एकमेकांशी चर्चा, गप्पा होतातच. त्यातून कलाकृतीचं आकलन अधिक समृद्ध होण्याची शक्यता असते. लॅपटॉपवर चित्रपट पाह्यला तर ही मौज मिळत नाही.

लॅपटॉपवर सत्यजित राय १

चारुलता हा सत्यजित रायचा सिनेमा मी फक्त एकदाच पाह्यला होता. त्यावेळी रिळं लावताना काही तरी गडबड झाली होती. अर्थात तरीही त्याची मजा कमी झाली नव्हती. त्यानंतर चारूलता बघायचा राहून गेला. त्यातलं एक गाणं... ओ बिदेशिनी... अंधुकसं आठवत होतं आणि चारुलता बागेत झोपाळ्यावर बसून अमोलशी बोलत असते तो शॉट मनात ठसला होता. रविंद्रनाथांच्या नष्टनीड या कथेवर हा चित्रपट बेतलेला आहे. ही कथा कित्येक वर्षांपूर्वी म्हणजे शाळेत असताना वाचली होती. पण नीट आठवत होती. मध्यंतरी पुण्याहून मुंबईला येताना सतीश तांबेकडे गेलो होतो. त्याच्याकडे सत्यजित रायच्या चित्रपटांच्या डिव्हिडी होत्या. कोपरखैरणेहून लोअर परेलला ऑफिसात जाईपर्यंत तास-दीड तास लागणार. तेवढ्या वेळात चारुलता पाहता येईल असं मनात आलं म्हणून त्या घेतल्या.

मोटारीत बसल्यावर मी चारुलताची डिव्हीडी लावली. ऑफिसला जाईपर्यंत चित्रपट बघत होतो. मोटारीत गाणी ऐकायला मजा येते. खिडकीच्या काचा बंद केल्या एसी सुरु केला आणि म्युझिक लावलं की खिडक्यांमधून गुंडाळल्या जाणा-या चित्रांना अर्थ प्राप्त होतो. चित्रपटच सुरु होतो. मोटारीत मागच्या सीटवर बसून वीतभर पडद्यावर डोळे एकाग्र करायला विशेष श्रम घ्यायला लागतात. मोटारीच्या वेगाने चित्रपट पळावा असं वाटतं. मोटारीतल्या किंवा बसमधल्या पडद्यावर एक्शन पट पाह्यला मजा येते. कारण दृष्यांचे बारकावे टिपण्याची गरज नसते. अर्थातच चारुलता पाहताना मजा आली नाही. हिरमोड झाला.

दोन-तीन दिवसांनी कामानिमित्त भोपाळला जायचं होतं. सकाळी सहा वाजताचं विमान पकडायचं म्हणजे पाच वाजता विमानतळावर पोचायचं. भल्या पहाटे उठायचं. विमान इंदूरमार्गे भोपाळला जाणार होतं. इंदूर येईपर्यंत डुलक्या घेत होतो. इंदूरला विमान चाळीस मिनिटं थांबतं. बाहेर तर जाता येत नाही. म्हणून लॅपटॉप काढला आणि चारुलताची डिव्हीडी लावली. भोपाळ येईपर्यंत तीच पहात बसलो. सिनेमा लॅपटॉपवर पाह्यला मजा येते. मागेपुढे करत प्रत्येक क्षणाचा दृकश्राव्य अनुभव घेता येतो. चित्रपट आणि आपण यांच्यामध्ये कोणताच अडथळा येत नाही. लॅपटॉपवर कानात इअरफोन घालून चित्रपट बघणं हे वाचनासारखं आहे. तुम्ही अगदी एकटे होता.

नष्टनीड ही रविंद्रनाथांची कथा. १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात ही कथा घडते. भूपती हा जमीनदारपुत्र. कोलकात्यात त्याचा वाडा असतो. त्याला खाण्यापिण्याची ददात नसते. त्याने स्वतःला एका इंग्रजी वर्तमानपत्राच्या कामात गुंतवून घेतलेलं असतं. वाड्यातच त्याने प्रेस टाकलेला असतो. भारताचं आणि इंग्लडचं राजकारण, लोकशाही, कायदाचं राज्य या विषयांमध्येच तो पूर्ण बुडालेला असतो. इंग्लडच्या निवडणुकांमध्ये हुजूर पक्ष आणि मजूर पक्ष यांच्यापैकी कोणता पक्ष सत्तेवर आला तर भारताला हितकारक ठरेल यावर तो आणि त्याचे मित्र चर्चा करायचे. पैजा लावायचे. त्याची पत्नी चारुलता. भूपतीला तिच्याकडे लक्ष द्यायला वेळच नसतो. त्याबद्दल तो अनेकदा शरमिंदाही व्हायचा. तिला बंगाली साहित्यात गोडी असते. भूपतीचा चुलत का मावसभाऊ—अमोल, कोलकत्याला येतो. भूपतीकडेच राहतो. त्याला बंगाली साहित्यात रुची असते. गतीही असते. भूपती त्याला गळ घालतो--चारुलताला बंगाली साहित्यात रुची आहे, पण मी तिला मार्गदर्शन करू शकत नाही, तू ते काम कर. अमोल आणि चारुलताची गट्टी जमते. चारुलताचं भूपतीवर प्रेम असतं, निष्ठा असते आणि अमोलशी असलेले संबंध कमालीचे उत्कट असतात. अमोलला मात्र त्याची कल्पना नसते.

चारुलताचा भाऊ उनाड असतो. भूपतीला वाटतं त्याच्यावर कोणी कसली जबाबदारी टाकलेली नाही. म्हणून तो असा आहे. भूपती त्याला बोलावतो आणि वर्तमानपत्राचा मॅनेजर बनवतो. हा मॅनेजर प्रेसच्या नावावर कर्ज काढून खिशात टाकतो आणि पोबारा करतो. भूपतीला हे समजतं तेव्हा तो खचतो. मेव्हण्याने आपला विश्वासघात केला याच अतीव दुःख त्याला होतं. अमोलही मद्रासला मित्राकडे जातो आणि चारुलताला धक्का बसतो. अमोलमुळेच ती लिखाण करायला लागते. विमनस्क झालेला भूपती घरी येतो तेव्हा त्याला अमोलच्या नावाने आकांत करणारी चारुलता दिसते. तो मोडून पडतो.

ही गोष्ट रविंद्रनाथांच्या जीवनातली आहे. सुनील बंदोपाध्यायची पहिली जाग ही कादंबरी (म्हणजे तिचा अनुवाद) गेल्या वर्षीच मी वाचली. तिच्यामध्ये बंगालच्या प्रबोधन युगाचं चित्रण आहे. त्यामध्ये रविंद्रनाथ आणि त्यांच्या वहिनीचे—बोउठनचे संबंध किती उत्कट होते याचं चित्रण आहे. रविंद्रनाथांचे बंधू जमीनदारीचा व्याप बघायचे, नाटकं लिहायचे, प्रवासी वाहतुकीसाठी त्यांनी एक बोटही बांधून घेतली होती आणि फिरंगी बोटवाल्यांशी स्पर्धा सुरु केली होती. ते मोठे उद्यमशील होते. रविंद्रनाथ, त्यांचे बंधू आणि बंधूंची पत्नी हे गंगेवर नौकाविहार करत असत, रविंद्रनाथ गाणी म्हणत. बोउठनची रविंद्रनाथांबरोबर गट्टी होती. रविंद्रनाथांचं लग्न झाल्यावर त्यांच्या आणि बोउठनच्या गाठीभेटी कमी होतात. त्यातच रविंद्रनाथ साहित्यिक वर्तुळात ओढले जातात. पती अनेक व्यापात आणि दीरही दुरावलेला. बोउठनचा एकटेपणा आणि तगमग वाढते. एकदा बोट कुठेतरी अडकून पडते आणि रविंद्रनाथांचे बंधू बोउठनला दिलेला शब्द पाळू शकत नाहीत. ती कमालीची दुखावली जाते आणि आत्महत्या करते. तिच्यात आणि आपल्यात किती अंतर होतं याचा साक्षात्कार रविंद्रनाथांच्या बंधूंना तिच्या मृत्युनंतर होतो. ते कमालीचे दुःखी होतात,
असा तपशील कादंबरीत आहे.

चारुलता या चित्रपटाची नायिका माधवी मुखर्जी. तिच्या अभिनयाला दाद द्यावी तेवढी थोडी. त्यानंतर ती रायच्या कोणत्या चित्रपटात चमकली की नाही ठाऊक नाही. सत्यजित रायचे तिच्याबरोबरही नाजूक संबंध होते. बायकोने घटस्फोटाची धमकी दिली तेव्हा सत्यजित रायने त्या संबंधांपासून काडीमोड घेतला सत्यजित रायच्या पत्नीने सांगितलं. “मी घटस्फोट मागितला तेव्हा सत्यजित रायच्या डोळ्यात अश्रू आले. तो माझ्या पायावर कोसळला आणि त्याने क्षमा मागितली,” असं रायच्या पत्नीने एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं. राय हयात असताना वा त्याचं निधन झाल्यानंतरही माधवी मुखर्जीने या संबंधांबाबत कोणतंही सनसनाटी विधान केलं नाही. इंग्लडच्या युवराजाची पत्नी लेडी डायना हिची काही प्रेम प्रकरणं तिच्या मृत्युनंतर प्रकाशात आली. एका प्रियकराने तर डायनाने त्याला लिहिलेल्या पत्रांचा लिलावच केला. तीच गत मायकेल जॅक्सनच्या मृत्युनंतर झाली. त्याच्याही चारित्र्याचे धिंडवडे त्याच्या मित्रानेच काढले. जॅक्सनची मुलं वस्तुतः माझीच आहेत, हवं तर डीएनए टेस्ट करा असं त्याने वर्तमानपत्रांना सांगितलं. भारतीय संस्कृती या संबंधात खूपच प्रगल्भ आहे असं दिसतं.

थिएटरमध्ये पाह्यलेला चित्रपट मोटारीत बघताना कंटाळा आला तर लॅपटॉपवर बघताना त्या चित्रपटातल्या आणि चित्रपटाबाहेरच्या अनेक जागा नव्याने कळल्या. विमानाची चाकं धावपट्टीवर झेपावली तेव्हा मी लॅपटॉप बंद केला.

Sunday 20 September 2009

स्पोर्टस् बार २


स्पोर्टस् बार ऐसपैस आहे. सिलींग खूप उंच आहे. कापड गिरणीच्या इमारतीच्या रचनेत बदल करायला परवानगी मिळाली नाही. म्हणून सिलींगला काळा वा प्रकाश शोषून घेणारा रंग देण्यात आलाय. तोच रंग भिंतींनाही आहे. त्यामुळे नजर आपोआपच भिंतींवर ठिकठिकाणी लावलेल्या प्लाझमा टिव्हींवर हिंडत राहते. वेगवेगळे स्पोर्टस चॅनेल त्यावर सुरु असतात. त्यांची नरडी दाबलेली असल्याने त्यातून आवाज फुटत नाही. त्यामुळे वेगवेगळ्या खेळांची दृष्यं तुमचं लक्ष वेधून घेतात. कुस्त्या, फुटबॉल, टेनिस, क्रिकेट, गोल्फ आणि जाहिराती यांचा अखंड प्रवाह त्यांच्यावर सुरु असतो. एक भलामोठा स्क्रीन आहे. त्यावरही कोणता तरी स्पोर्टस् चॅनेल सुरु असतो. बारमध्ये एक पूल टेबल आहे. भिंतीवरच्या निशाणावर डार्ट मारायचा खेळ आहे. टेबलावरच बुद्धिबळाचा पट असतो. एका कोप-यात एक पिंजरा आहे. तिथे जाळीत बॉल टाकण्याचा खेळ आहे. एका कोप-यात साउंड सिस्टीम आहे. तिथे एक डीजे आणि त्याचे एक-दोन मदतनीस असतात. इंग्रजी पॉप म्युझिक सुरु असतं. आवाज एवढा मोठा की गप्पा मारणं शक्यच नसतं. पहिल्यांदा तिथे गेलो तेव्हा मी भांबावून गेलो. कोणाची ओळख करून घ्यायची तर त्याच्या कानात ओरडून नाव सांगायचं. त्यातच एखाद्या फिरंगीशी बोलत असलो तर आणखी पंचाईत व्हायची. संगीताच्या गदारोळात उच्चार कळायचे नाहीत. एखादी बीअर, स्नॅक्स, सहका-यांसोबत हाय-हॅलो की झाली पार्टी.
बीअर वा व्हिस्की प्यायची तर जवळच्या मित्रांसोबत निवांत गप्पा मारायच्या. अनुभवांची देवघेव करायची. नंतर जेवण म्हणजे क्लायमॅक्स, अशी माझी पार्टीची कल्पना होती. स्पोर्टस बारमध्ये येणारी तरूणाई ट्रेकिंग करणारी नाही, आपण जिथे राहतो तिथल्या समाजाशी जुळलेली नाही. ते ना गणपती उत्सवात असतात ना दहीकाल्यामध्ये. धमाल करायला म्हणजे नाच, गाणं, पिणं, खाणं एकाच ठिकाणी करायला ते स्पोर्टस बारमध्ये येतात. कंपन्यांमधले मॅनेजर बहुसंख्येने तरूण असतात. म्हणजे तिशीच्या आसपासचे. दिवसभर काम करून शिणलेले असतात. मिटिंग्जमध्ये वर्किंग लंच असतो. शुक्रवारी वा विक डे ला ऑफिसातल्या सहका-यांसोबत ते पार्टी करतात. तेव्हा ड्रिंक्स, स्नॅक्स आणि म्युझिक. मोठी पार्टी असेल तर डान्स. अशा पार्ट्या टिम बिल्डींगचाही भाग असतात. त्यामुळे पार्टीतही ही माणसं फॉर्मलच असतात. भारतीय संगीत वा नृत्य या ढाच्यात बसत नाही.
आमच्या बाजूच्या टेबलवर दोन मित्र बीअरचे एक-दोन घुटके घेऊन डार्ट मारत होते. निशाणाच्या मध्यबिंदूवर डार्ट मारण्यासाठी त्यातला एकजण इरेस पडला होता. हाताच्या पोझिशन्स बदलून तो निशाणा साधण्याचा प्रयत्न करत होता. निशाणावर डार्ट आदळला की किती गुण मिळाले ते इलेक्ट्रॉनिक बोर्डावर झळकत असे. बीअरचं प्रमाण वाढत गेलं तसा त्यांच्यातल्या एकाचा डार्ट मारण्याचा उत्साह संपला. दुसराही थकला होता पण त्याचा उत्साह कमी झाला नव्हता.
त्यांच्या पलिकडे पूल टेबल होतं. दोन जण तिथे खेळत होते. आमच्या तरुणपणी या खेळाला बिलीअर्डस् म्हणायचे. आता पूल म्हणतात. (पूर्वी लिफ्ट असायची. आताही लिफ्टच असते पण तिला एलेव्हेटर म्हणतात. जाहिरात विभागाला रिस्पॉन्स म्हणतात.) माझ्या समोरच्या टिव्हीवर गोल्फ सुरु होता. बिलीअर्डस आणि गोल्फ अधून-मधून बघत मी गप्पा मारत होतो. गुरुवारी स्पोर्टस बारमध्ये गाण्याचीही संधी मिळते. म्हणजे पाश्चात्य गाण्यांची एक यादी आहे. त्या गाण्यांच्या सिड्या लावतात. त्यातला माणसाचा आवाज ऐकू येणार नाही फक्त वाद्यसंगीत ऐकू येईल अशी व्यवस्था करतात. गाण्याचे शब्द सबटायटल्स सारखे पडद्यावर उमटतात. ते ज्या क्रमाने आणि पॉजने उच्चारायचे तसे हायलाइट होतात. गाणं म्हणणा-याने पडद्यावर बघत गाणं म्हणायचं. हा झकास प्रकार होता. त्यामुळे मला गाण्याचे शब्द कळणं सोपं गेलं. पहिलं गाणं त्यांच्या डीजेनेच म्हटलं. त्यानंतर एका मुलाने म्हटलं. रणजित पाश्चात्य संगीताचा शौकीन. पियानो वाजवणारा, संगीत रचना करणारा. त्याला हुआफ्रीदने आग्रह केला. रणजितने आढेवेढे न घेता गाणं म्हटलं. फ्रँक सिनात्राचं, स्ट्रेन्जर्स इन द नाइट. प्रेमावरचं रोमँटिकच गाणं. रणजितच्या गाण्याचं जोरदार स्वागत झालं. गाणं संपल्यावर अनेकांनी टाळ्या वाजवल्या. खास लोकाग्रहास्तव रणजितने आणखी एक गाणं म्हटलं. तेही फ्रँक सिनात्राचंच.
मी पडद्यावर गोल्फ आणि बारमध्ये बिलीअर्ड आलटून-पालटून बघत होतो. निघताना म्हणालो, गोल्फचं मैदान छोटं करण्यासाठी पूल टेबलचा शोध कोणीतरी लावला असावा. पूल टेबलही खूप जागा खातं म्हणून कॅरम बोर्ड आला असावा. सर्वांनी या कॉमेंटला दाद दिली. मी म्हटलं गोल्फ आणि बिलीअर्डची गंमत अशी की, they put balls in the holes सर्वजण गोरेमोरे झाले. पण हसले. मी एक पाऊल पुढे जाऊन म्हटलं.... and that too with the stick या वाक्यावर मात्र जोरात हसणं त्यांनी टाळलं. ऑफिसातल्या सहका-यांबरोबरच्या पार्टीत असा जोक मारणं बहुधा असभ्य समजलं जात असावं. या पार्ट्यांमध्ये कोमट विनोदाचा अधून-मधून शिडकावा करायचा असतो. तमाशातला रांगडेपणा इथे चालत नाही.

Saturday 19 September 2009

स्पोर्टस बार १

सहा महिने झाले पण ऑपरेशन्स टीमचे मॅनेजर एकत्र जमलेले नव्हते. एक प्रॉडक्ट मॅनेजर बंगलोरला असायचा, तर दुसरा पुण्याला. कंटेट ऑपरेशन्स हेड चंडीगडला तर हेड ऑफ ऑपरेशन्स आणि प्रोग्रॅम मॅनेजर आज पुण्याला तर उद्या कोलकत्याला, परवा चंडीगड वा भोपाळ, असे हिंडत असायचे. कस्टमर सपोर्ट मॅनेजर नुक्ताच टीममध्ये सामील झाला होता. पुढच्या सहा महिन्याची स्ट्रॅटेजी ठरवण्यासाठी सर्व मॅनेजर्सची दोन दिवसांची मिटिंग मुंबईला होती. सकाळी नऊ वाजता सुरु झालेली मिटिंग संध्याकाळी साडेसात-आठ पर्यंत चालायची. मिटींगचा शीण घालवण्यासाठी रात्री आम्ही फिनिक्स मिल कंपाऊंडमधल्या स्पोर्टस बारमध्ये गेलो.
फिनिक्स मिल लोअर परेलला होती. तुळशी पाइप रोडला. तुळशी पाइप रोडचं अधिकृत नाव—सेनापती बापट मार्ग. तुळशी तलावातून मुंबईला पाणी पुरवठा करणारे भलेमोठे पाइप माहीमची खाडी पार केल्यावर भूमिगत होतात त्यांच्यावरून जो रस्ता जातो तो तुळशीपाइप रोड. मिलच्या समोरच्या रस्त्यावर कामगारांच्या चाळी. शिवसेनेचे नेते दत्ताजी नलावडे तिथेच राह्यचे. अजूनही त्यांनी तिथली खोली विकलेली नसावी. गेली कित्येक वर्षं त्यांचं कार्यक्षेत्र तेच आहे. दत्ताजी फार पूर्वी सेवादलात वगैरे होते. साठच्या दशकात शिवसेनेत गेले. ते राह्यचे त्या चाळीतली एक खोली गणेशने भाड्याने घेतली होती. खोली दुस-या मजल्यावर होती. तिला एक पोटमाळाही होता. खोलीत त्याने ऑफीस थाटलं होतं. तो डीटीपीची, प्रिटींगची सटर-फटर काम घ्यायचा. पोटमाळ्यावर झोपायचा. सकाळ-संध्याकाळ जेवणाचा डबा मागवायचा. चहा-नाश्ता टपरीवर करायचा.
१९८१ सालच्या गिरणीसंपानंतर मुंबईतल्या गिरणीकामगारांचं कंबरडं मोडलं. संपाचा फायदा घेऊन मालकांनी गिरण्या बंद करण्याचाच सपाटा लावला. संपापूर्वी मुंबईत जवळपास ६० गिरण्या आणि अडीच लाख कामगार होते. आता त्यापैकी चार-दोन गिरण्या उरल्या असतील. माझा मित्र दत्ता इस्वलकर त्यावेळी मॉडर्न मिलमध्ये नोकरीला होता. यथावकाश ती गिरणीही बंद पडली. १९८८ साली दत्ताने मला त्याच्या कामात ओढलं. आम्ही दोघांनी मिळून वस्त्रोद्योग धोरणावर एक टिपण तयार केलं. त्यातूनच पुढे बंद गिरणी कामगार संघर्ष समिती निर्माण झाली. गिरणीकामगारांमध्ये काम करणा-या विविध पक्षांच्या युनियनना एकत्र आणून आम्ही एक परिषद घेतली होती. साथी बगाराम तुळपुळे परिषदेचे अध्यक्ष होते. डॉ. दत्ता सामंत, कॉम्रेड यशवंत चव्हाण यांनीही या परिषदेला हजेरी लावली. हातमाग, यंत्रमाग, सूत गिरण्या, कापडगिरण्या यांना सामावून घेणा-या वस्त्रोद्योग धोरणाची भारताला गरज आहे. या धोरणामध्ये कामगारांना न्याय मिळेल अशी तरतूद हवी. तसं झालं तरच बेकारी आणि कामगारांचं शोषण या समस्यांची उकल होऊ शकेल, अशी मांडणी बगारामनी आपल्या अध्यक्षीय भाषणात केली होती.
अर्थात सरकारने या मागणीला प्रतिसाद दिला नाही. बंद गिरणी कामगार संघर्ष समिती ही नव्याने स्थापन झालेली संघटना होती. नव्या वस्त्रोद्योग धोरणाच्या मागणीसाठी संघटीत शक्ती उभी करण्याचं सामर्थ्य त्यावेळी या संघटनेकडे नव्हतं. बंद पडलेल्या गिरण्यातील कामगारांची देणी मालकांनी चुकती करावीत यासाठी समितीने संघर्ष सुरु केला. दत्ता, विठ्ठल घाग आणि त्यांचे अन्य सहकारी हे आंदोलन नेटाने चालवू लागले. बंद पडलेल्या गिरण्यांच्या जमिनीवर कामगारांचाही हक्क आहे, हा मुद्दा हाती घेऊन त्यांनी लढाई पुढे नेली. त्यांना कामगारांची साथ मिळाली. या आंदोलनाशी मी जवळून संबंधीत होतो.

त्याकाळातच फिनिक्स मिल बंद झाली. मिलच्या कंपाऊंडमध्ये मॉल, स्पोर्टस बार आणि त-हेत-हेची, रुचीरुचीची रेस्त्रां उभी राहू लागली. गंमत म्हणजे बोलिंग ऍली वगैरे खेळांच्या केंद्राला कामगारांचं करमणूक केंद्र म्हणून मान्यता देण्यात आली होती. बंद गिरणी कामगार संघर्ष समितीने फिनिक्स मिलमध्ये जी नवी डेव्हलपमेंट सुरु झाली त्याच्या विरोधात आंदोलन छेडलं होतं. विक्रम गोखलेने त्यांना पाठिंबा दिला होता. तो त्यांच्या धरण्यात सामील झाला होता.
गिरण्यांच्या जमिनीवर टोलेजंग, अत्याधुनिक इमारती उभ्या राह्यल्या आहेत. तिथे देशी-विदेशी कंपन्यांची ऑफिसं आहेत. देशाचा विकासदर झपाट्याने वर जातोय हे तिथे गेल्यावर पटतं. म्हणून तर या एरियाला आता अप्पर वरळी म्हणा अशी मागणी कधीतरी झाली होती. लोअर परेल या नावावर गिरणगावाचा ठसा आहे. तो पुसून टाकावा म्हणून ही मागणी कोणीतरी केली म्हणे. मागणी कोणी केली, कधी केली हे ठाऊक नाही पण मराठी वर्तमानपत्रांनी मात्र तिच्या विरोधात आघाडी उघडली होती.
तुळशी पाइप रोडवरच्या कॉर्पोरेट पार्कांना गरीब चाळींचा वेढा पडलाय. अजूनही तिथे सनमिल कंपाऊंडसारखी स्वेट शॉप्स आहेत. चार-चार फुटावर चहाची टपरी आणि सिग्रेटची दुकानं आहेत. सकाळी अनेक नाक्यांवर पोहे, उपमा, शिरा यांचे स्टॉल लागतात. कमी भांडवलात चालणारे हे व्यवसाय चाळीतल्या मराठी लोकांच्या ताब्यात आहेत. “माझंही दारिद्र्याचं स्वतंत्र शेत आहे”, या सत्तरच्या दशकात नामदेव ढसाळने लिहिलेल्या ओळी आजही ताज्या वाटतात.
यावर्षी गोकुळष्टामीच्या दिवशी पेनिनसुला कॉर्पोरेट पार्कमधले अनेक जण हंडी फोडण्याचा सोहळा पाह्यला बाहेर आले होते. व्होल्वो बसमधून एक गोविंदा आला. त्यांनी मानवी इमला रचायला सुरुवात केली. चाळीतल्या चार-दोन घरांतून दोन-तीन बादल्या पाणी टाकण्यात आलं. चार-पाच पाण्याचे फुगे कोणीतरी फेकले. त्यांच्या पाठोपाठ दोन ट्रकांमधून दुसरा गोविंदा आला. बसमधल्या गोविंदाला हंडी फोडता आली नाही तर दुसरा गोविंदा रस्त्यावर उतरणार होता. आमच्या आणि इतर कंपन्यांमधले पंजाबी, उत्तर भारतीय, दाक्षिणात्य, बंगाली, बिहारी स्त्री-पुरुष उत्सुकतेने हंडी फोडण्याचा सोहळा बघत होते. हंडी फुटल्यावर त्यांनी टाळ्या वगैरे वाजवल्या. वोल्वोतल्या गोविंदाने हंडी फोडून झाल्यावर दुस-या दिशेला कूच केलं. ट्रकातला गोविंदाही शांतपणे निघून गेला.
हॅव यू प्लेड धिस, असं काही जणांनी मला विचारलं. मी हो म्हटल्यावर, त्यांना चक्क माझा हेवा वाटला. पण मी अशा प्रोफेशनल गोविंदा पथकात नव्हतो, असं त्यांना सांगण्यात अर्थ नव्हता. त्यांना ठाऊक असलेला गोविंदा हाच होता.

Friday 18 September 2009

ओ कोलकता....


मुंबईहून कोलकत्याला आल्यावर दारिद्र्याचा धक्का बसतो. गरीब इमारती, गरीब माणसं, सार्वजनिक वाहतुकीची गरीब वाहनं. डगडगणारी ट्राम, हाताने ओढायच्या रिक्षा, सायकल रिक्षा, तीन चाकी स्कूटर रिक्षा, बसेस. सर्व काही गरीब. रस्त्यावरच्या टप-यांवर मिळणारे खाद्यपदार्थही गरीब. मुंबईत कामाठीपु-यात युसूफ नावाचा आमचा कार्यकर्ता-मित्र होता. तो फेरीवाला होता. फळं विकायचा. युसूफला भेटायला जायचो तेव्हा तो गाडीवर केळी, सफरचंद वगैरे विकत असायचा. त्याच्या गाडीवरही कधी पाह्यली नव्हती अशी गरीब, साल काळी पडलेली मऊ केळी कोलकत्यात गरीब लोक विकत घेत होते. महागाई वाढली हे खरंच आहे पण मुंबईच्या माणसासाठी कोलकता स्वस्तच. सकाळी नाश्त्याला तीन कचोरी (म्हणजे पु-याच) भाजी, एक हलवा पुरी खाल्ली. केवळ पाच रुपयात. मुंबईत वडापावलाही सहा रुपये मोजायला लागतात. मुंबईतल्या कष्टकरी माणसालाही एक अभिमान असतो, गुर्मी असते. सर्वसाधारणपणे श्रीमंत लोकही गरीबांशी आदर राखून बोलतात. ही गुर्मी वा अभिमान त्या शहराचा म्हणजे त्या शहराच्या अर्थव्यवस्थेचा असावा. कोलकत्यात दीनवाणी गरीबी आहे.
संध्याकाळी प्रेस क्लबला गेलो. तोही गरीबच भासला. सर्वजण बंगालीत बोलत होते. पवन लोकल न्यूज चॅनेलचा ब्युरो चिफ आहे. तो मारवाडी आहे. पण त्याचा, त्याच्या वडलांचा जन्म कोलकत्याचा. वडीलांची चक्की होती. ट्रान्सपोर्टचा बिझनेस होता. त्यांना समाजकार्याची, राजकारणाची हौस. धंदा नोकरांवर सोपवून ते या कामातच व्यस्त असायचे. परिणामी धंदा बुडाला. त्यांनी आपला एक गाळा एका हिंदी पेपरला भाड्याने दिला. तिथे पवन नोकरीला लागला. जाहिराती गोळा करणं वगैरे सटरफटर कामं करायचा. बंगाली आणि हिंदी दोन्ही भाषा अवगत असल्याने त्याला अनुवादासाठी बसवला. तिथे त्याला बातमीदारी कळली. म्हणून मी रांकेला लागलो असं तो म्हणाला. त्याआधी मी गुंडागर्दी म्हणा वा राजकारण म्हणा त्या लायनीत होतो, काँग्रेसमध्ये होतो. आंदोलनात बस किंवा इतर वाहनांना आगी लावायचो, असं तो सांगत होता. राजस्थानात हवेली आहे आमची. तिथे वर्षातून एकदा जातो. सकाळी जाऊन संध्याकाळी परत. पण तिथे गेल्यावर छाती अभिमानाने भरून येते. आपलं गाव, आपली हवेली अजून आहे, हाच मोठा दिलासा असतो.
त्याचा चेला नवीन. तो आझमगढचा. त्याला जमिनीचा ओढा. पेरणीची सुरुवात करताना लहान मुलांच्या हाताने काही दाणे टाकतात. लहान मुलांना अहंकार नसतो त्यामुळे पिक चांगलं येतं, अशी श्रद्धा आहे, असं तो सांगत होता. आपल्या हाताचा गुण चांगला आहे, असा त्याला विश्वास होता. प्रेस क्लबमध्ये मी लावलेली झाडं किती जोमदार वाढली आहेत पहा, असं म्हणून तो मला त्या झाडांकडे घेऊन गेला. आपल्याला शेती करता येत नाही याचं त्याला भारी वैषम्य वाटत होतं. आता शेतात मी अनवाणी चालू शकत नाही. दहा बिघे जमीन आहे आमची. आम्ही तीन पिकं घ्यायचो. आता काकांना एवढी जमीन कसता येत नाही. ते पोटापुरता गहू पिकवतात असं सांगत होता. त्याचे आई-वडील कोलकत्यातच स्थायिक झाले होते.
पार्कस्ट्रीट म्हणजे कोलकत्याचा सेंट्रल बिझनेस डिस्ट्रीक्ट. मुंबईतल्या फोर्ट वा काळा घोडा एरियासारखा. ब्रिटीशकाळाच्या खाणाखुणा अभिमानाने मिरवणारा. पार्कस्ट्रीटवर तीन चाकी स्कूटर रिक्षांना बंदी आहे. हात रिक्षा, सायकल रिक्षाही नाहीत. फक्त टॅक्सी. बहुतेक टॅक्सी एम्बॅसिडर. पिवळ्या रंगाच्या. किमान भाडं २२ रुपये. पार्क स्ट्रीटवर चार-पाच पिढ्यांपासूनची रेस्त्रां वा दुकानं आहेत. तिथे कोलकत्याचं समृद्ध रुप दिसतं. तिथं एक रेस्त्रां फक्त इलशा (हिलसा) माशाच्या पदार्थांसाठीच प्रसिद्ध आहे. अशी अनेक रेस्त्रां असतील. आमच्यापैकी प्रत्येकजण कोलकत्याच्या दारिद्र्याबद्दल म्हणजे दारिद्र्याचं जे दर्शन घडलं त्याबद्दल भरभरून बोलत होता. एक जण कल्याणला राहणारी होती. दुसरा लखनऊचा तर तिसरा पुण्याचा. मी म्हटलं आपण कोणत्या शहरातून आलोय हे विसरलो तर कोलकता तुम्हाला आवडायला लागेल. कोलकता गरीब भासलं तरी स्वच्छ आहे. मजूरांची संख्या खूप असल्यामुळे असेल किंवा अन्य कारणांमुळे असेल कोलकत्यात फ्लेक्सचे बॅनर फारच कमी दिसतात. मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर ही शहरं राजकारण्यांच्या भल्यामोठ्या फोटोंनी घाण करून टाकली आहेत. सॉल्ट लेकच्या दिशेला नवं कोलकता साकारतंय ते नवी मुंबईसारखं आखीव-रेखीव आहे. कोलकत्यापासून ५० किलोमीटर्सवरचं कलोनी टाऊन ऐसपैस, शांत, हिरवंगार आहे.
मी कोलकत्याहून नदिया जिल्ह्यात गेलो. गावं हिरवीगार होती. धान, ताग, ऊस, सर्व प्रकारचा भाजीपाला,

पेरू, आंबा यांच्या बागा होत्या. वर्षाला तिथे तीन पिकं घेतात. शेतमजूर मिळत नाहीत त्यामुळे निंदणी-खुरपणीची कामं अडून राहतात. त्यामुळे दोन वर्षांपासून हर्बीसाइडचा खप वाढलाय. प्रत्येक घरात किमान एक मोबाइल फोन आहे. बिधान चंद्र कृषी विद्यापीठात सुदीप नावाचा एक तरूण भेटला. त्याच्या वडलांनी पश्चिम बंगालमध्ये आम्रपाली ही आंब्याची जात लोकप्रिय केली. ज्या मूळ झाडावरून त्यांनी कलमं केली ते २५ वर्षांचं जुनं झाड त्यांनी अजूनही आपल्या शेतात जपलेलं आहे. मागच्या महिन्यात मलिहाबादला गेलो होतो तेव्हा आम्रपाली जातीचे आंबे तिथे होते. यावर्षी दशेरी आंब्याने दगा दिला होता म्हणे. सुदीपचे वडील आणि तो दोघांचाही मोठ्या उद्योगांना विरोध. सुपीक जमीन असताना तिथे उद्योग कशासाठी उभारायचे, असा त्याचा प्रश्न होता. बागा वा फार्म विकसीत करणं हाच सुदीपच्या वडलांचा व्यवसाय आहे. साहजिकच त्यांची सहानुभूती ममता बानर्जींना आहे. महिन्याभरात निवडणूका लागल्या तर मार्क्सवाद्यांचा पराभव होईल, असं सुदीप म्हणत होता.
प्रेस क्लबच्या इलेक्शन होत्या त्यामुळे पवन, नवीन किंवा सर्व पत्रकार तोच विषय बोलत होते. तृणमूल आणि सीपीएम हे दोन गट या इलेक्शनमध्येही होते. इथे राजकीय जाणिवा विलक्षण प्रगल्भ आहेत. बंगाली सिनेमा असो वा क्रिडा क्षेत्र, त्या त्या क्षेत्रातले दिग्गज राजकीय भूमिका घेतात. म्हणजे या किंवा त्या पार्टीच्या बाजून उभे राहतात. सौरव गागुंली सीपीएमच्या बाजूने बोलतो. नट-नट्या ममता बॅनर्जीला खुला पाठिंबा देतात. हॉलीवूड वरून मुंबईतल्या हिंदी चित्रपटसृष्टीला बॉलीवूड म्हणण्याचा प्रघात पडला. कोलकत्यातल्या बंगाली चित्रपटसृष्टीला टॉलीवूड म्हणतात. टॉलीवूडमध्ये मिथुन चक्रवर्ती हे मोठं नाव आहे. दाक्षिणात्य मारधाड चित्रपटांच्या बंगाली आवृत्या इथे विलक्षण लोकप्रिय आहेत.
मला अशोक शहाणेने सांगितलेला किस्सा आठवला. तो शंभू मित्रांकडे गेला होता. भारतीय बैठकीवर ऐसपैस बसून किंवा लोळत त्यांच्या गप्पा चालू होत्या. दरवाजा वाजला, शंभू मित्रांना उठायला नको म्हणून अशोकने जाऊन दरवाजा उघडला. एक इसम विचारत होता, शंभू मित्रा आहेत का. कोण आलंय, कशासाठी भेटायचं अशी जुजबी चौकशी अशोक करणार होता, तेवढ्यात शंभू मित्रांचा आवाज आला, म्हणून तो इसम आत आला. उभा राहून तो इसम त्यांच्याशी अदबीने बोलत होता. शंभू मित्रांनी त्याला बसायलाही सांगितलं नाही आणि त्याच्या विनंतीला वा प्रस्तावाला दोनदा नकार दिला. दुस-यांदा आवाज चढवून. निरुपायाने तो इसम निघून गेला. तो गेल्यावर अशोकने विचारलं कोण होता तो इसम, तर शंभू मित्रा म्हणाले, बुद्ध...बुद्धदेव. त्यावेळी ते राज्य सरकारात सांस्कृतिक मंत्री होते आता ते मुख्यमंत्री आहेत. आता शंभू मित्रा नाहीत. कोलकत्यात आता ना डाव्या विचाराचा दबदबा आहे की बाजारपेठेचा गवगवा.