Blog Archive

Sunday 11 October 2009

कापूसकोंड्याची गोष्ट—३ एका गरीब कत्तीनीचा अर्ज

मी एक कत्तीन आहे. खूप दुःख सोसल्यानंतर मी हे पत्र लिहीत आहे. कृपया या पत्राला आपल्या वृत्तपत्रात प्रसिद्धी द्यावी. हे पत्र प्रसिद्ध झालं तर माझी परवड कमी करतील आणि विनंती मान्य करतील अशा लोकांपर्यंत ते पोचेल, असं मी ऐकलं आहे. एका गरीब दुःखी महिलेच्या या पत्राकडे कृपया दुर्लक्ष करू नका. मी एक अभागी महिला आहे. माझ्या दुःखाची कहाणी खूप मोठी आहे. ती मला थोडक्यात सांगितलीच पाहीजे. बावीस वर्षांची असताना मी विधवा झाले. माझ्या पदरात तीन मुली होत्या. मृत्युसमयी माझ्या पतीने काहीही संपत्ती मागे ठेवली नव्हती. वृद्ध सासू, सासरे आणि तीन मुलींना पोसण्याची जबाबदारी माझ्यावर आली. मी माझे दागिने विकले आणि श्राद्धविधि पूर्ण केला. आमची उपासमार होण्याचीच वेळ येऊन ठेपली होती तेव्हा मला ईश्वराने मार्ग दाखवला त्यामुळे आम्ही वाचलो. मी टकळी आणि चरख्यावर सूत कातू लागले.

झाडलोट आणि अन्य कामं आटोपून मी सकाळी सूत कातावयास बसे. दुपारपर्यंत चरख्यावर सूत कातीत असे. त्यानंतर स्वैपाक करून वृद्ध सासू-सास-यांना आणि मुलींना जेवू-खाऊ घालून मी टकळीवर बारीक सूत कातत असे. सर्वसाधारणपणे एक तोळा सूत मी दिवसाभरात कातत असे. विणकर घरी येऊन ते सूत घेऊन जात. तीन तोळे सूत एक रूपया दराने ते विकत घेत असत. विनंती केली की ते आगाऊ रक्कमही देत. त्यांच्यामुळे आमची अन्न-वस्त्राची ददात मिटली.
काही वर्षांतच माझ्याकडे सात गंडास (२८ रुपये) जमले. त्या पैशातून मी एका मुलीचे लग्न केले. त्याप्रमाणेच तिन्ही मुलींची लग्न केली. जातीचे रितीरिवाज मी पाळले जेणेकरून माझ्या मुलीकडे कोणीही खालच्या नजरेने पाहू नये. मी घटका आणि जातीच्या लोकांचा योग्य तो सन्मान मी केला. माझे सासरे वारले तेव्हा मी ११ गंडास (४४ रुपये) त्यांच्या श्राद्धावर खर्च केले.
हे पैसे मला विणकरांनी आगाऊ दिले. दीड वर्षात मी हे सर्व पैसे फेडले. हे सर्व चरख्यामुळे झालं. गेली तीन वर्षं माझी आणि माझ्या सासूची परवड सुरु आहे. अन्नासाठीही आमच्याकडे पैसे नाहीत. सूत घेण्यासाठी विणकर घरी येत नाहीत. सूत बाजारात पाठवलं तर पूर्वी जेवढी किंमत मिळायची त्याच्या एक चतुर्थांश रक्कमही हातात येत नाही. हे कशामुळे घडलं ते मला ठाऊक नव्हतं. मी अनेकांना याबाबत विचारलं. ते म्हणाले विलायती सूत मोठ्या प्रमाणावर येतं. विणकर तेच सूत विकत घेतात आणि कापड विणतात. विलायती सूत माझ्या कातलेल्या सूताशी स्पर्धा करू शकणार नाही अशी मला घमेंड होती. विलायती सूत शेराला ३-४ रुपये दराने मिळायचं. मी कपाळावर हात मारून घेतला. देवा रे, विलायतेला माझ्यापेक्षाही गरीब बायका आहेत हे मला ठाऊक नव्हतं. विलायतेतले सर्व लोक श्रीमंत आहेत हे मला ठाऊक होतं. पण माझ्यापेक्षाही गरीब बायका तिथे आहेत हे मला कळलं होतं. गरीबीमुळेच त्या बायकांना एवढ्या कमी किंमतीत सूत कातावं लागत होतं. तिथे त्या सूताला गि-हाईक नसल्याने ते सूत एवढ्या कमी किंमतीत इथे विकायची पाळी त्यांच्यावर आली. त्यामुळे आमचं मरण ओढवलं आहे. त्या सूताचे कपडे महिना-दोन महिन्यातच विरू लागतात. माझी तेथील कत्तीनींना विनंती आहे की त्यांनी माझ्या अर्जाचा विचार करावा आणि इथे सूत पाठवणे योग्य आहे का ते ठरवावे.
कळावे
एक गरीब कत्तीन
शांतीपूर समाचार दर्पण १८२८ (कोलकता)

सदर पत्र १९३१ साली म्हणजे १०० वर्षांनी म. गांधींनी यंग इंडिया या त्यांच्या नियतकालिकात १९३१ साली पुनर्मुद्रित केलं. लँकेशायरच्या कापडगिरण्यात काम करणा-या कामगारांना हाच अनुभव १९२९ साली आलेल्या जागतिक मंदीत आला. भारतातल्या असहकार आंदोलनाने विदेशी कपड्यांवर बंदी घालण्याचं आवाहन केल्यानंतर लँकेशायरच्या कामगारांवर बेकारीची नोबत आली. गोलमेज परिषदेच्या निमित्ताने इंग्लडला गेल्यावर म. गांधीनी लँकेशायरच्या गिरणी कामगारांची भेट घेऊन भारतातील दारिद्र्याची वस्तुस्थिती त्यांच्यासमोर मांडली आणि खादीचा कार्यक्रम या गरीबीवरचा तोडगा कसा ठरू शकतो तेही सांगितलं.

1 comment:

  1. तुझा ब्लॉग आख्खा वाचून काढला. इंटरेस्टिंग आहे. सत्यजित राय, शरद पवार ते कापूस, ही रेंज चांगली आहे. तुला ब्लॉगचं मर्म कळलं आहे. अगदी चारुलता बद्दल लिहिताना सुद्धा वर्तमानाचं भान असतं. carry on!
    हेमू

    ReplyDelete