Wednesday 2 June 2010

टीप : प्रधान मास्तरांचं चरित्र-कार्य, अल्प परिचय कोणत्याही वृत्तपत्रात वाचा

आधुनिक भारत आणि सत्याग्रही समाजवाद हे आचार्य जावडेकरांचे दोन महत्वाचे ग्रंथ. हिंदुस्थानातील ब्रिटीश साम्राज्याच्या विस्तारापासून म. गांधीच्या नेतृत्वाखालील स्वांतत्र्य चळवळ या वाटचालीची चिकित्सा आचार्य जावडेकरांनी आधुनिक भारत या ग्रंथामध्ये केली. आधुनिक भारत हा इतिहास नाही, विविध विचारधारा आणि त्यांचा सामाजिक-राजकीय आधार यांचा साक्षेपी आढावा आहे. या ग्रंथातच आचार्यांनी सत्याग्रही समाजवाद या संकल्पनेची मांडणी केली. मार्क्सवाद आणि गांधी विचार यांच्या समन्वयाचा प्रयत्न म्हणजे सत्याग्रही समाजवाद. सत्तेमध्ये प्रत्यक्ष सहभागी होणार नाही, सत्तेचे लाभ घेणार नाही परंतु बहुजनांच्या हितासाठी आणि सुखासाठी सत्तेवर अंकुश ठेवणार्‍या समतोल बुद्धीच्या यतिवर्गाची कल्पना भागवतांनी आधुनिक भारत या ग्रंथात मांडली. सत्याग्रही समाजवाद या ग्रंथामध्ये हीच संकल्पना अधिक विस्ताराने विशद केली. भारतातील नाही तरी महाराष्ट्रातील समाजवादी आंदोलनावर भागवतांच्या मांडणीचा सर्वाधिक प्रभाव दिसून येतो. त्यामुळेच निष्कलंक चारित्र्य, समाजवादी कार्यक्रमाशी अर्थातच आर्थिक-राजकीय सत्तेमध्ये बहुजनांना सर्वाधिक वाटा मिळावा यासाठी संघटन, रचना आणि संघर्ष, निवडणुकीच्या राजकारणातही या दोन्ही तत्वांचं भान ठेवणं. राजकीय सत्ता नाकारण्याचीही हिंमत दाखवणं, निवडणूकीचं राजकारण अंतिम नाही याबाबत स्पष्टता बाळगून निवडणूकीनंतर वा निवडणूकीच्या राजकारणातून निवृत्त झाल्यावरही कार्यरत असणं, ही वैशिष्ट्यं महाराष्ट्रातील समाजवादी नेते आणि कार्यकर्ते यांच्यामध्ये सर्वाधिक प्रमाणात आढळतात. एस.एम.जोशी, नानासाहेब गोरे, बाबा आढाव, मधु दंडवते, मधु लिमये अशी अनेक नेत्यांची नावं या संदर्भात घेता येतात. त्यापैकीच एक ग. प्र. प्रधान.
प्रधान मास्तरांवर आचार्य जावडेकरांचा म्हणजे त्यांच्या विचारधनाचा आणि भूमिकेचा खोलवर परिणाम होता. आधुनिक भारताचा उत्तरार्ध लिहिण्याची त्यांची महत्वाकांक्षा होती आणि आपला आवाका काय आहे याची वास्तववादी जाणीवही होती. साता उत्तराची कहाणी या ग्रंथात प्रधान मास्तरांनी १९४२ ची चळवळ ते जनता पक्षाच्या सत्तेचा उदय आणि अस्त, असा मोठा कालखंड पकडण्याचा प्रयत्न केला. आचार्य भागवतांप्रमाणे समाजवादी आंदोलनाला वैचारिक मार्गदर्शन करण्याची, सिद्धांत मांडण्याची प्रज्ञा आपल्याकडे नाही याची नम्र जाणीव प्रधान मास्तरांना होती. त्यामुळे त्यांनी स्वातंत्र्योत्तर भारतातील राजकीय-सामाजिक वाटचालीची चिकित्सा नाही तर आढावा घेण्यासाठी आणि तो सामान्य वाचकाला पचनी पडेल अशा तर्‍हेने लिहिण्यासाठी कादंबरीसदृश्य घाट निवडला. साता उत्तराची कहाणी ही राजकीय कादंबरी नाही वा इतिहास नाही. देशातील राजकीय, सामाजिक स्थित्यंतराचा चिकित्सक आढावाही नाही. या पुस्तकाने समाजवादी विचाराच्या तरुणांना राजकीय पैस काय असतो याचं भान दिलं. प्रधान मास्तरांची बहुतेक ग्रंथसंपदा स्वातंत्र्य आंदोलन आणि स्वातंत्र्योत्तर भारतातील राजकीय-सामाजिक प्रवाहांची वैचारिक बैठक यांचा आढावा घेणारीच आहे.
आधुनिक भारत या ग्रंथात आचार्य जावडेकरांनी म. जोतिराव फुले यांच्या कार्याकडे काणाडोळाच केला आहे. खेडोपाड्यात पोचलेली समाजसुधारणेची पहिली चळवळ असा सत्यशोधक चळवळीचा उल्लेख त्यांनी जरूर केला पण चार-दोन पानातच त्यांनी हा अध्याय संपवून टाकला. त्यांना टिळकांबद्दल अधिक ममत्व होतं. प्रधान मास्तरांनाही टिळकांबद्दल ममत्व होतंच पण त्यांना सामाजिक प्रश्नांबद्दल आणि म्हणूनच म. फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, दलित चळवळ, मागासवर्गीयांचे प्रश्न आणि आंदोलनं यासंबंधात विशेष आस्था होती.
प्रधान मास्तरांनी त्यांच्या पिढीला उद्देशून फारच कमी लिखाण केलं. राष्ट्र सेवा दलाचे बौद्धिक प्रमुख असल्याने राजकीय जाण असलेला समाजवादी वा सेवादलातला तरूण हाच त्यांचा वाचक होता. त्यांचं बहुतेक सर्व लिखाण याच वाचकवर्गासाठी आहे. (ही प्रेरणा त्यांनी साने गुरुजींकडून घेतली असावी). मी त्याच वाचकवर्गात होतो. आमच्या पुढच्या पिढीत प्रधान मास्तरांचे वाचक आहेत का? मला वाटतं फारच कमी. प्रधान मास्तरांना ज्या विषयात रस होता, ते ज्या आकांक्षांना संबोधित करत होते त्याच्याशी नव्या पिढीचा सांधा जुळत नाही. जुळणारही नाही.

टीपः या टिपणात मी आचार्य जावडेकर यांच्याऐवजी आचार्य भागवत यांचं नाव लिहिलं होतं. ही चूक माझे वडील, राम तांबे, अभय कांता आणि अनिल अवचट यांनी ध्यानी आणून दिली. चुकीची दुरुस्ती मी केली नाही कारण अभयच्या प्रतिक्रीयेच्या उत्तरात मी माफी मागितली. मात्र ब्लॉग वाचणारे प्रतिक्रीया वाचतीलच असं नाही हे अनिलच्या मेलवरून ध्यानी आलं. म्हणून ब्लॉगच्या टिपणात दुरुस्ती करून वाचकांची पुन्हा एकदा माफी मागतो.
सुनील तांबे

3 comments:

  1. आपण- त्याच्याशी नव्या पिढीचा सांधा जुळत नाही. जुळणारही नाही.- असं लिहिलेलं आहे. मास्तरांचं कार्य ग्रेटच यात शंकाच नाही. पण आजच्या पिढीशी ते जुळत नाहीत हे त्यांची मर्यादा समजायची का... मला असं वाटतं की ही सगळी पिढी फारच रोमॅण्टिसिझमने भारलेली होती जो आताच्या काळात संपूर्णतः कोलमडलेला आहे... असो हे माझे मत झाले. पण तुमच्याशी शेअर करावसं वाटलं.

    ReplyDelete
  2. tumhala acharya jawadekar mhanayacha ahe. jawadekarana bhagwat tharwnya itki moklik bari nahi! aso. tarihi moklik chi kalpana awadli.

    ReplyDelete
  3. Moothi Chook Zaali. Dhyani Anun Dilyabaddal Aabhar.
    Sunil

    ReplyDelete