Tuesday 21 June 2011

मेरा मुंडा बिगडा जाय

शरद पवार चार वेळा राज्याचे मुख्यमंत्री होते, संरक्षण मंत्री होते त्यानंतर खासदार होते. पुतण्या आमदार होता, मुलीचा राजकारणात प्रवेश व्हायचा होता. तरीही ते नाराज होते. छगन भुजबळ मंत्री आहेत, त्यांचा मुलगा आमदार तर पुतण्या खासदार आहे. तरिही ते नाराज असल्याच्या बातम्या अधून-मधून येतात. काँग्रेसमध्ये आल्यावर नारायण राणे मंत्री झाले, मुलगा खासदार झाला, दुसरा मुलगा आमदार होण्याच्या तयारीत आहे  पण मुख्यमंत्रीपद न मिळाल्याने तेही नाराज असतात. गोपिनाथ मुंडे खासदार आहेत, त्यांची मुलगी आमदार आहे, पुतण्याही आमदार आहे तरीही मुंडे नाराज आहेत.


भुजबळ, राणे आणि मुंडे यांची नाराजी अधिकाधिक सत्ता मिळावी यासाठी असते. ही सत्ता कोणासाठी राबवायची आहे, म्हणजे आर्थिक-सामाजिक धोरणं वा कार्यक्रम कोणते असावेत या विषयावरील चर्चेत या नेत्यांचा सहभाग अपवादानेच असतो. आपले नातेवाईक आणि कार्यकर्ते यांचे हितसंबंध सांभाळणं यापलीकडे त्यांची दृष्टी सहसा जात नाही. हे नेते पक्षाचं नेतृत्व करत नसतात तर पक्षातील आपल्या छोट्याशा जनाधाराचीच काळजी घेतात. त्यामुळेच नव्या पक्षाची उभारणी करण्याची दृष्टी आणि वकूब त्यांच्याकडे नसतो. अशा नेत्यांच्या नाराजीला त्यांच्या पक्षात किंमत असेलही पण जनमानसात मात्र त्यांची नाराजी हा टिंगल-टवाळीचा विषय बनतो.

सहमतीचं, विविध पक्षांना बरोबर घेऊन जाण्याचं राजकारण करण्याचं कौशल्य हा प्रमोद महाजन यांचा मोठा गुण होता. प्रमोद महाजन यांच्याकडे स्वतःचा लोकसभा मतदारसंघ नव्हता म्हणजेच त्यांना व्यापक जनाधारही नव्हता. तरिही युती आणि आघाडीच्या राजकारणात मित्र पक्ष आणि भाजप दोघांचेही हितसंबंध सांभाळण्याची कसरत त्यांना उत्तम जमत होती म्हणून त्यांना राष्ट्रीय राजकारणात स्थान होतं. महाजन नसते तर अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात तीन वेळा सरकार बनवण्याची संधी भाजपला मिळाली नसती. महाराष्ट्राच्याच नाही तर अन्य राज्यांतील भाजपच्या संघटनेवरही त्यांची म्हणूनच हुकूमत चालत होती. त्यांचे शिलेदार म्हणून गोपिनाथ मुंडे यांनी राज्य पातळीवर उत्तम काम केलं. पण ते स्वतःला महाजन यांचे वारसदार मानू लागले. मात्र त्यांना मित्र पक्षांपेक्षा विरोधी पक्षांमध्येच मित्र अधिक आणि तेही सर्व महाराष्ट्रातले. मुंडे यांना आपला विधानसभा मतदारसंघही ताब्यात ठेवायचा आहे, महाराष्ट्र भाजपवरही पकड ठेवायची आहे आणि राष्ट्रीय राजकारणातही स्थान हवं आहे.

व्यापक जनाधार असलेले भाजपमधले नेते असा मुंडेंचा लौकीक आहे. कारण वंजारी समाज त्यांच्या पाठिशी एकमुखाने उभा आहे. वंजारी समाजाची लोकसंख्या ज्या जिल्ह्यात वा तालुक्यात आहे तिथे मुंडे यांना जनाधार मिळतो. राजकारणात वंजारी समाजाची स्पर्धा मराठ्यांशी आहे. बीड जिल्ह्यात मराठा आणि अन्य मागासवर्गीय अशीच स्पर्धा असते. केशरकाकू क्षीरसागर या जातीने तेली पण त्यांनी वंजारी, माळी आणि अन्य मागासवर्गीयांचा पाठिंबा मिळवून त्यांना सत्तेत वाटा देऊन जिल्ह्याच्या राजकारणावर वर्चस्व ठेवलं. मुंडेही तेच राजकारण करतात. मराठ्यांना एकदम अंगावर घ्यायचं नाही पण दूरही लोटायचं नाही असा समतोल ते ठेवतात. वंजारी, धनगर, माळी या घटकांमध्ये भाजपचा जनाधार निर्माण करण्याची रणनीती प्रत्यक्षात आणण्यात प्रमोद महाजन यांचा मोठा वाटा होता. पण तीच मुंडे यांच्या राजकारणाची मर्यादाही आहे.

आपल्यामागे हजारो कार्यकर्ते आहेत, आमदार आहेत, नेते आहेत असा दावा गोपिनाथ मुंडे करत असले तरिही एका हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच माणसं आपल्याकडची सत्ता पणाला लावून मुंडे यांना साथ देण्याची हिंमत दाखवतील. (मुंडे यांनी भाजपला सोडचिठ्ठी द्यावी असा अनेक मुंडे समर्थकांचा आग्रह आहे. हे समर्थक राजकारणात नाहीत तर फेसबुकवर आहेत.) बंड पुकारण्याची वेळ कोणती त्यावरूनच नेता झुंजीला उभा राहणार की नाही हे ठरतं. निवडणुका तोंडावर नाहीत. मुंडे यांच्यासोबत काँग्रेस वा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कळपात सामील झाल्यावर विधानसभा वा लोकसभेची उमेदवारी मिळण्याची खात्री एकाही मुंडे समर्थकाला नाही. आपल्या मागण्या कोणत्या हेही मुंडे यांनी अजूनपर्यंत सांगितलेलं नाही. कारण त्यापैकी एकाही मागणीचा संबंध व्यापक समाजहिताशी नाही. धोरण, कार्यक्रम, रणनीती याबाबत मुंडे आणि पक्ष नेतृत्वात कोणतेही मतभेद नाहीत. याचा अर्थ मुंडे नुसताच शड्डू ठोकत आहेत. कोणत्याही पक्षाचं नेतृत्व अशा नाटकांना कधीही शरण जात नाही.



7 comments:

  1. अनिल महात्मे22 June 2011 at 10:58

    वैयक्तिक स्वार्थ व आपल्या गटाची तळी राखणं हेच या मंडळीच्या नाराजीच कारण असतं,मिडीयाला बाबा एपिसोडनंतर खाद्य नव्हतं ना,
    ते या निमित्तानं मिळालं.लिखाण वास्तववादी आहे.

    ReplyDelete
  2. करेक्‍ट विश्‍लेषण.

    - मिलिंद

    ReplyDelete
  3. its an open secret that Maharashtra is ruled by around 50 dominanat Maratha families(gharanee)and few persons like Munde has some scope some where perhaps with the support and blessings of those stronmen marathas to whom he was meeting during last few days. You have analysed correctly that their vision is so limited that to use word VISION is an insult to the worditself.More money, more expansion of individual empires in controlling Banks, Co-operatives, Sugar factories, IT hubs, Education Industry from womb and exploiting individuals is the name of the game. You should write a coloumn in a weekly(SADHANA?)or in a monthly (ANDOLAN?PA.WA.)to expand thye reach.

    ReplyDelete
  4. श्री.गोपिनाथ मुन्डे यांच्यावर संघपरिवार का नाराज आहे ?या प्रश्नाच्या मुळाशी गेल्याशिवाय ही चर्चा अपुरी राहील. मुंडे यांनी ओबीसी जातवार जनगणनेचा विषय लोकसभेत आणि जनमाणसात उचलुन धरला यामुळे संघ चिडला ही वस्तुस्थिती आहे.ब्राह्मणांचा पक्ष ही भाजपाची ओळख बदलुन त्या पक्षाला बहुजनवादी चेहरा मिळवून देणारे मुंडे, आक्रमक मुंडे,व्यापक जनाधार असलेले भाजपातील एकमेव नेते मुंडे, हे पैलु विसरुन केलेले विश्लेषन अपुरे नाही काय?

    ReplyDelete
  5. tuje likhan vachayala awadel...lihit raha

    Raj Shinge

    ReplyDelete
  6. neeteen Vaidya25 June 2011 at 14:26

    vishleshan nemake , muddesud aahe.. yapudhehee ya dabavtantracha vapar munde karat rahile tar , tyanchee gat ' landga aala re aala ' kathetlya kolhyasarkhee hoil...

    ReplyDelete
  7. agadi khare ahe.Kharetar munde he sharad pawaranchi gadi chalavu pahat aahet.
    kharetar lokasabheteel netepadamule tyana sampurn bharatache rajkaran karayachi sandhi aali ahe tee nibhavane garajeche aahe,aathwun paha sushama swarajani karnatakatun ubhe rahun dhadas dakhvale.Tya hrlya pan tyachveli akhil bharatiya netya honyachee tayari jhalee ani aaj jhalyahee.Aho gopinathrao, tumacha jansampark itaka motha aahe pan to maharashtrapurata.Jara durvar baghun sarva deshbhar sampark vadhava na,ugachach gadkari mala mothe hou det naheet he mhannyat kahi arth nahi.Jara athwa tumhi rajakarnat alat tevha jansangh hota.sudaivane paya ghalnare deendayalji,sundersinghaji,atlaji,lalji ase anek nete hote.tyanchya javal rahun aapan mothe nahi jhalat.congreschy jatipatichya rajkarnat adkalat.Vasantraona athwa, Tyani tumhala yasathee nibadale hote ka?
    Aho tumhee akhil bharatiya rajkarnavar chhap padavi ase vatate.Ugach Pune and pimparichya adhyakshapadat kay adkat?Mothi regh mara.Tarach tumhala bhavitavya ahe.

    ReplyDelete