Friday 23 July 2010

हिंदू वाचण्यापूर्वी...

सिंधू आणि बिंदूः

निखिलेश चित्रेने विक्राळ वा आदी लेखकांमध्ये मराठीतल्या दोनच लेखकांची—भालचंद्र नेमाडे आणि श्याम मनोहर, गणना केली. आपल्या अल्पाक्षरी भाषणात बाल्झाक, प्रूस्त (फ्रेंच) आणि एदुआर्दो गॅलिनो (उरुग्वे) या लेखकांच्या रांगेत त्याने या दोन मराठी लेखकांना बसवलं आहे.

म.गांधी, विनोबा, साने गुरुजी, डॉ. राममनोहर लोहिया, यांची नावं देशी परंपरेत घेताना देशातील कम्युनिस्ट, समाजवादी, गांधीवादी, आंबेडकरवादी राजकीय प्रवाहांशी नेमाडे फटकून असतात. महाराष्ट्रातील ब्राह्मणेतर परंपरेला नेमाडे आपलेसे वाटतात. मराठा, जाट या जातींची निर्मिती ब्रिटीशांनी केली अशी त्यांची मांडणी आहे. शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचा वापर ब्राह्मणांनी मुस्लिमांच्या विरोधात केला, मराठे तो ब्राह्मणांच्या विरोधात करत आहेत आणि उत्तर भारतीयांच्या विरोधात शिवसेना उद्या शिवाजी महारांजांच्या प्रतिमेला वापरेल, हे नेमाडे यांचं विधान शिवधर्माची घटना लिहिणार्‍या आ.ह. साळुंखे यांना कितपत रुचेल याची शंका वाटते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हा सर्व भारतीय भाषांमध्ये पोचलेला एकमेव मराठी लेखक आहे, याकडे नेमाडे यांनी लक्ष वेधलेलं असलं तरीही त्यांनी हिंदू असण्याचा अभिमान बाळगणार्‍या नेमाडे यांना आंबेडकरवादी चार हात नाही तरी दोन हात दूर ठेवणंच पसंत करतील. नेमाडेंना अडगळीचं जतन करायचं आहे. या अर्थाने ते काँन्झर्वेटिव ठरतात. उदारमतवादी हिंदू हीच त्याची भूमिका आणि ओळख आहे.

हिंदु ही कादंबरी प्रकाशित होण्याच्या दिवशीच हिंदुत्ववाद्यांनी नेमाडे यांचा पुतळा जाळला, असं प्रकाशनाच्या कार्यक्रमात समर खडस या लोकसत्तेच्या बातमीदाराचा हवाला देऊन सांगण्यात आलं. पण दुसर्‍या दिवशीच्या मुंबईच्या वर्तमानपत्रात मी तरी ही बातमी वाचली नाही. सनातन प्रभात या हिंदुत्ववादी संघटनेने नेमाडे यांच्या हिंदू संकल्पनेवर सडकून टीका केली आहे. त्यांच्या ब्लॉगवर ती उपलब्ध आहे. असो.

हिंदूच्या प्रकाशन कार्यक्रमात बोलताना नेमाडे म्हणाले लेखक हा समाजाशी जोडला गेलेला असतो. समजाच्या मनाच्या तळात बुडी मारून तो आपलं विधान, कथानक आणि पात्रं बाहेर काढतो. लेखकाची कलाकृती अर्थात लिखाण आणि समाजाचा सांधा जुळला तरच ती कादंबरी वा लेखन लोकप्रिय होतं. अर्थातच नेमाडे यांची अशी प्रामाणिक धारणा आहे की ते मांडत असलेला देशीवाद भारतीय समाजाच्या मनात मुरलेला आहे.
कोणत्याही समाजाला, व्यक्तीला स्वतःची ओळख पटवून देण्यासाठी लेखक वा साहित्यिक आपली लेखणी झिजवतात. ही ओळख इतिहासात बुडी मारून, परंपरेचे पदर उलगडत करून घ्यायची की आत्ता प्राप्त क्षणाच्या सर्वांगीण ज्ञानाने करून घ्यायची? नेमाडे अर्थातच इतिहास, परंपरेचा वेध घेणारे आहेत. समाजवादी, कम्युनिस्ट, आंबेडकरवादी आणि हिंदुत्ववादीही नेमकं हेच करू पाहतात. कोणत्याही राजकीय विचारप्रवाहांप्रमाणेच नेमाडेंचा देशीवादही शत्रूलक्ष्यी मांडणीच्या जवळ जाणारा आहे.

प्राप्त क्षणाचं सर्वांगीण ज्ञान करून घेण्याचा प्रयत्न श्याम मनोहर करतात. श्याम मनोहरांचा प्रयत्नही अस्सल देशी परंपरेतलाच आहे. वेदांचं उलट-सुलट पाठांतर करण्यात ब्राह्मणांनी आपली अक्कल वाया घालवली, मेलेली जनावरं फाडण्याचं काम ज्या जातींनी केलं त्यांनी प्राण्यांच्या शरीरशास्त्राची पायाभरणी केली नाही. म्हणजे ब्राह्मण आणि महार, ढोर यांच्यापैकी कुणीही बुद्धि वापरलेली नाही, याकडे श्याम मनोहर लक्ष वेधतात. समाजातील बुद्धिच्या स्थानाची चर्चा करताना, श्याम मनोहर व्यक्तीवर कॅमेरा फोकस करतात.


समुद्राच्या पाण्याचे गुणधर्म त्या पाण्याच्या एका थेंबात असतात. नेमाडेंना सिंधूचं आकर्षण आहे, तर श्याम मनोहरांनी थेंबावर लक्ष केंद्रीत केलं आहे. नेमाडे आणि श्याम मनोहर, हे दोन लेखक मराठी साहित्याचे दोन ध्रुव असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी फारा वर्षांपूर्वीच नमूद केलं आहे.

3 comments:

  1. Every author has his writing angle and the same applies to reader of the Book. Before even publication of Hindu there are vivid views about Hindu some of them might be even politically motivated. What is most important is author should not change his views post publication.

    ReplyDelete
  2. चंद्रकांत पाटलांच्या मताशी एकदम सहमत! दोन्ही लेखक ग्रेट आहेतच. तरी मला श्याम मनोहर जास्त आवडतात व जवळचे वाटतात. अर्थात हे वैयक्तिक मत.

    ReplyDelete
  3. Nemadenchi Kosla,arthat tyanni Salinger na Wachata lihili ase samjun aani Shyam Manoharanchi Kal ya don kadambarya lakshyat rahanyasarkhya aahet.aata Nikhilesh chitreche mhanane political aahe aani Chandrakant Patilanche mhanane dosti-yaari type.Donhi changle lekhak aahet pan great nakkich nahit.

    ReplyDelete