Tuesday 27 July 2010

हिंदू वाचताना...पंजाबात...

चंडीगडला होतो. रमिंदरसिंगच्या चेहेर्‍याची ठेवण बघितली तर तो इराणी वाटतो, सुरिंदर थेट ग्रीक. रणजित म्हणाला. इखलाख इंडियन म्हणजे मुंडावंशी असावा मी मनाशी म्हटलं. अशोक नायर समोरच बसला होता. तो केरळी पण गोरा. त्याचा चेहरा नाही तरी रंग इराणहून आला की काय.

चंडीगडहून भाक्रा-नानगलला जात होतो. भारतात कुठेही प्रवास करा वर्क इन प्रोग्रेसचे बोर्ड रस्त्यारस्त्यावर दिसतात. गोहाटीला जा की चंडीगडला रस्त्यांची कामं जोरात. म्हणजे रस्त्यांच्या रुंदीकरणाची. अवाढव्य फ्लायओव्हर्सची. पुलांची. अगडबंब व्होल्वो बस सुसाट जाऊ शकेल असे रस्ते. रस्त्यांच्या कामामुळे ट्रॅफीक जाम. चिराग म्हणाला वाट लग गयी. मराठीतली वाट पंजाबापर्यंत पोचली. रात्री कोणत्या तरी हिंदी चॅनेलवर बातम्या सांगताना निवेदिका म्हणली ये तो चोर पे मोर हो गया. बातमी सुरु असाताना खाली अक्षरं—चोर पे मोर. मराठीतल्या चोरावर मोराची पाळमूळं तमिळमध्ये आहेत—चूर म्हणजे भात, मूर म्हणजे दही किंवा ताक, असं विश्वनाथ खैरे यांनी सिद्ध करून दाखवलंय. चूर-मूर, चोरावर मोर चं चोरपे मोर झालंय.

पंजाबात अनेकजण कोणत्याही हायवेला जीटी रोड म्हणतात. ग्रँट ट्रंक रोड. पाटलीपुत्र-तक्षशिला जोडणारी ही प्राचीन सडक. जीटी रोड म्हणजे अमृतसर-दिल्ली एवढा समजला जातो. दिल्लीच्या पुढेही तो जातो कोलकत्यापर्यंत. पंजाबातले धाबे फायुस्टार. तिथे जेवण काय तर चिकनचे सहा-सात प्रकार. मटणाचे तीन-चार प्रकार. सप्टेंबर ते एप्रिल मासे मिळू शकतात. ज्या महिन्यांमध्ये आर येतो तेव्हाच आम्ही मासे खातो, इखलाख म्हणाला. जुलै होता त्यामुळे मासे नाहीत. रमिंदरसोबत रेड लेबल पिताना मलईचिकन कबाब, चिकन सीग कबाब, चिली चिकन खात होतो. जेवताना व्हेज म्हटलं तर पर्याय अगदी लिमिटेड. दाल मखनी म्हणजे काळे उडीद. दाल फ्राय म्हणजे चणा डाळ. छोले नाश्त्याला असतात त्यामुळे राजमा. दम आलू म्हणजे बटाटा. आलू-मटर किंवा आलू-गोभी (फ्लॉवर). सॅलड म्हटलं की गाजर, टोमॅटो, काकडी आणि आल्या तर बीटाच्या चकत्या. वांगी, कोबी, फरसबी, लौकी, भोपळा, भेंडी, तिंडा, तोंडली, परवल अशा अनेक भाज्या धाब्यांवरून नाहीशा झाल्यात.

पंजाबात वर्षाला तीन ते चार पिकं घेतात. खरीपात बासमती किंवा धान, रब्बीत गहू. मालव्यामध्ये बासमती, धान किंवा कापूस. रब्बीत गहू. एक-दोन एकर जमीन परवडत नाही कसायला. त्याशिवाय अ‍ॅबसेंटी लँडलॉर्डची संख्या जास्त. हे लोक जमीन खंडाने कसायला देतात. वर्षाकाठी एकरी ३५ ते ४५ हजार रुपये मिळतात. दोआबात म्हणजे बियास-सतलज या नद्यांच्या मधल्या भागात, (रणजित म्हणाला पर्शियनमध्ये अब म्हणजे नदी) बटाट्याची लागवड याच जमिनीवर आहे. मालव्यात आणि मांझा (गुरुदासपूर, होशियारपूर) मध्ये हीच जमीन भाजीपाल्यासाठी वापरतात. होशियारपूरकडे सैनी लोकांची वस्ती मोठी. शतकानुशतकं ते भाज्या, फळं यांचं उत्पादन घेतात. इखलाखसिंग म्हणाला. कंभोज, सैनी हे भाजीपाला पिकवण्यात माहीर आहेत. हे म्हणजे आपल्याकडचे माळी असावेत.

सुखपालसिंग म्हणाला शेती किफायतशीर हवी म्हणजे आज माझ्याकडे १० एकर जमीन असेल तर पाच-दहा वर्षात त्यामध्ये आणखी १० एकराची भर घालता आली पाहीजे. जमीनीतून सतत उत्पन्न काढत राह्यचं. भूगर्भातून पाणी उपसत राह्यचं. धान, बासमती, बटाटा, गहू. कणभर जमीन पडीक ठेवायची नाही. खतं, कीटकनाशकं मारत राह्यचं. उत्पादन वाढवत न्यायचं. जमिनीचं काही का होईना. मालव्यातल्या काही भागात खतं आणि कीटकनाशकांनी भूजल प्रदूषित झालंय. रब्बी शेरगील हा गायक आता याच्या विरोधात जाहीरपणे बोलू लागलाय. तालुक्याच्या गावाला एक लिमोझिन असते. लग्नात भाड्याने देण्यासाठी दिवसाचं भाडं वीस हजार रुपये. आमच्याकडे लग्न साधं असतं. गुरुद्वारात होतं. कर्मकांड, मंत्रतंत्र यांचा फारसा बडेजाव नाही. रिसेप्शनला मात्र भरपूर दारू हवी. म्हणजे लायसन्स काढण्यापासून लग्नाची तयारी सुरू होते, इखलाख सांगत होता. पंजाब, हरयाना या राज्यात सर्वांना मुलंच हवी असतात. त्यामुळे गर्भलिंगचिकित्सा हा मोठा बेकायदेशीर धंदा जिल्ह्या-जिल्ह्यात फोफावलाय. मुक्तसरचा शिवचरणसिंग ब्रार मला म्हणाला होता, जमिनीची वाटणी होते म्हणून मुली नको असतात आम्हाला. त्यामुळे गावागावात वरांची संख्या मोठी आहे पण मुलीच मिळत नाहीत. सिक्कीममधून मुली आणून हरयानात त्यांची विक्री करतात. एका मुलीची किंमत ५० हजार रुपये. मागच्या आठवड्यातच दोन केसेस उघडकीला आल्या.

रोपडचं नाव रुपनगर करण्यात आलं. यावर्षी कळलं की रुपनगरचं नाव आता शहीद भगतसिंग नगर करण्यात आलंय. रोपड सतलुजच्या किनार्‍यावर आहे (नदी ओलांडली की दोआबा). तिथे मोहोंजोदडोच्या काळातलं एक नगर मिळालयं. म्हणजे रोपड प्राचीन शहर आहे. प्राचीन विटांचं नगर. तीनशे वर्षांपूर्वीची कुणा मुसलमानाची टोलजंग इमारत म्हणजे कबर वगैरे असावी. तिही विटांचीच. आणि आजचं रोपडही विटांचंच. सतलुजच्या किनार्‍यावरील मैदानी प्रदेशात एकमेव टेकाड होतं. त्या टेकाडाखालीच प्राचीन शहराचे हे अवशेष सापडले. टेकाड बहुधा सतलुजच्या गाळाचं असावं कारण एकही दगड मला तरी भेटला नाही त्यावर. रूमवर परतल्यावर हिंदू वाचायला सुरुवात केली.

No comments:

Post a Comment