Sunday 3 September 2017

पुन्हा एकदा कोसी

कोसना म्हणजे छळणे. वारंवार येणार्‍या पूरांमुळे त्या नदीला नाव पडलं कोसी.
महाभारतात म्हटलं आहे की यमाने स्त्रीरुप धारण केलं आणि तो या नदीच्या किनारी येऊन राहू लागला. पृथ्वीवरील वाढत्या लोकसंख्येला आळा घालण्यासाठी.

कोसीला पुन्हा एकदा पूर आला. ४१८ माणसं बुडाली किंवा वाहून गेली आणि १.६७ कोटी लोकांना ह्या पुराचा फटका बसला आहे असं फर्स्ट पोस्ट या वेबसाईटने आपल्या वृत्तांतात म्हटलं आहे.

कोसी नदीचा उगम तिबेटमधील हिमनद्यांमध्ये आहे. दूध कोसी, अरुण अशा सात नद्यांनी मिळून सप्तकोशी वा कोसी नदी बनते. तिबेटमधील हिमनद्या वितळतात. त्यांचे छोटे-मोठे तलाव होतात. बर्फाचा बंधारा कोसळला की अचानक पूर येतो. हा पूर प्रलयंकारी असतो. कोसीच्या एका उपनदीला आलेल्या अशा एका पुरामध्ये एक जलविद्युत केंद्र आणि नदीवरचे पूल वाहून गेले होते. 

एव्हरेस्ट वा सगरमाथा, कांचनजुंगा अशी अनेक हिमशिखरं कोसी नदीच्या कॅचमेंट एरियामध्ये आहेत.  एकट्या अरुण-कोसी नदीच्या प्रदेशात ७०० हिमनद्या आणि २०० च्या आसपास हिमनद्यांचे तलाव आहेत. या हिमनद्यांचा आणि त्यांच्या तलावांचा सर्वेक्षण नेपाळ आणि चीन ही दोन राष्ट्रे संयुक्तपणे करत आहेत. पुरांना आळा घालणं आणि पाण्याच्या मनोर्‍याचा विद्युत निर्मितीसाठी उपयोग करणं यासाठी हा अभ्यास सुरू आहे. मात्र त्यावर अजून तंत्रवैज्ञानिक उपाय सापडलेला नाही.

कोसी हिमालयातून खाली उतरताना प्रचंड प्रमाणावर गाळ आणते. दर वर्षी एका हेक्टरला १९ घनमीटर एवढा प्रचंड गाळ कोसी आणते. जगातली कोणतीही नदी एवढा गाळ आणत नाही. कोसीने आणलेला हा गाळ नेपाळमधील मैदानी प्रदेशात—तराई आणि सर्वाधिक गाळ बिहारच्या मैदानात पसरतो. या गाळामुळे बिहारमधील हा प्रदेश कमालीचा सुपीक आणि भूजलाने संपृक्त आहे. परंतु हा शापित प्रदेश आहे.

हिमनद्या आणि मॉन्सूनची अतिवृष्टी यामुळे कोसीला वर्ष-दोन वर्षाआड प्रलयंकारी पूर येतात. गाळांचे थर वर्षानुवर्षे पसरत असल्याने बिहारमध्ये कोसीचा त्रिभुज प्रदेश निर्माण झाला आहे. जगातला हा सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश आहे. अनेक मुखांनी कोसी गंगेला भेटायला जाते. गाळांच्या थरांमुळे कोसी पूर्वेकडून पश्चिमेकडे सरकते. गेल्या अडीचशे वर्षांमध्ये ही नदी सुमारे १२० किलोमीटर पश्चिमेकडे सरकली आहे. त्यामुळे बिहारमधील मोठा प्रदेश पडिक झाला आहे. पडिक जमिनीला पूर्णिया जिल्ह्यात म्हणतात परती. फणीश्वरनाथ रेणू या थोर लेखकाच्या एका कादंबरीचं नाव आहे—परती परिकथा. रेणू याच प्रदेशातले. त्यामुळे त्यांच्या लेखनात—कथा, कादंबरी, रिपोर्ताज, हा प्रदेश बारिक-सारिक तपशीलानिशी चित्रित झाला आहे.



कोसीच्या पुरांना आळा घालण्यासाठी नेपाळ-भारत सरहद्दीवर पण नेपाळच्या हद्दीमध्ये कोसी बंधारा वा कोसी बराज बांधण्यात आला आहे. या बंधार्‍याच्या सर्व खर्च आणि देखभाल भारत सरकारकडे आहे. हा बंधारा नेपाळ आणि भारत ह्यांच्यामधील वादाचा आणि कटकटीचा विषय बनला आहे. कारण पूर आला की बंधार्‍याची दारं केव्हा आणि किती उघडायची हा निर्णय भारताचा असतो. पुरामुळे नेपाळामध्ये झालेल्या नुकसानीचं खापर भारतावर फोडलं जातं. बंधार्‍य़ाची दारं उघडली की बिहारमध्ये पूर येतो. नाही उघडली तर बंधाराही वाहून जाऊ शकतो. पूर नियंत्रणासाठी या बंधार्‍याचा फारसा उपयोग झालेला नाही.

हा बंधारा बांधण्यापूर्वी कोसीच्या दोन्ही तीरांवर भिंती बांधण्यात आल्या. इंग्रजीत भाषेतला शब्द—एम्बँकमेंट. जेणेकरून नदीने पात्र बदलू नये. मग बंधारा घालण्यात आला. नदीच्या पात्राच्या दोन्ही तीरांना अशा भिंती बांधून नदीला वेसण घालण्याचं तंत्रही फारसं उपयोगी पडलेलं नाही. कारण पूर आला की या भिंतींवरून पाणी वाहतं. या भिंतीची दुरुस्ती-देखभाल ह्यावर दरवर्षी हजारो कोटी रुपये खर्च करावे लागतात. २००८ साली कोसीने प्रवाह बदलला. तोही कोसी बराजच्या अलीकडे.

कोसी नदीच्या पाण्याचा वापर करायचा, पुरांपासून संरक्षण करायचं तर हिमनद्यांपासून ते तिच्या त्रिभुज प्रदेशापर्यंत असलेल्या विविध भौगोलिक रचनांचा आणि मॉन्सूनचा एकत्रित वा एकात्मिक विचार करायला हवा. हा प्रदेश तीन राष्ट्र-राज्यांमध्ये—चीन, नेपाळ आणि भारत, विभागला गेला आहे. हिमनद्या, मॉन्सून, हवामान बदल ह्यांचा एकात्मिक अभ्यास करून उपाययोजना करण्यासाठी या तीन राष्ट्र-राज्यांमधील संबंध सुरळीत हवेत. भारताने नेपाळची रसद रोखून धरायची, चीनने डोकलाममध्ये कुरापत काढायची, नेपाळने भारतावर टीका करायची, भारतीय प्रसारमाध्यमांनी नेपाळच्या भूकंपग्रस्त भागाला केलेल्या मदतीचं चित्रण करताना भारत सरकारचे हितसंबंध सांभाळायचे, अशा अनेक बाबींमुळे या तीन देशांचे संबंध तणावपूर्ण आहेत. त्यातच अलीकडे आपल्या देशात विकृत देशभक्ती बोकाळू लागली आहे. रा. स्व. संघ-भाजप-गोरक्षक परिवार या विकृत देशभक्तीचे पुरस्कर्ते आहेत.

डायन कोसी

कोसीः पुरानी कहानी नया पाठ

भीमाभयानका भीतिहाराः कोसी


1 comment:

  1. Renu was Solokhov of India. Kosi flows in most of his writings. Your monsoon theme is really excellent. River and waters has made cultures and civilizations. I think, you should also write on Ganga

    ReplyDelete