Thursday 26 August 2010

हिंदूः नेमाडे, साने आणि बाकीचे मुद्दे ...

श्यामची आई हे पुस्तक कादंबरी आहे. किंबहुना श्यामची आई, धडपडणारा श्याम ही कादंबर्‍यांची मालिका आहे. साने गुरुजींचं साहित्यिक मूल्य नेमाडे यांच्या आधी कोणीही जोखलेलं नव्हतं. श्याम या पात्राबाबत साने गुरुजींनी जे लिखाण केलं आहे त्यामध्ये कल्पिताचा भाग फारच कमी आहे. जवळपास नाहीच. श्याम म्हणजे स्वतः साने गुरुजी, त्यांची आई, वडील, आजी, भाऊ, मित्र सर्व आपल्या नावानिशी, स्थळ-काळानिशी या कलाकृतीत अवतरतात. साने गुरुजींचं हे लिखाण आत्मचरित्र वा आत्मकथन नाही. श्यामची आई असो वा धडपडणारा श्याम, धडपणारी मुले यापैकी कोणत्याही लिखाणाला कथावस्तू वा प्लॉट नाही. मात्र या लिखाणातील सर्व घटना, प्रसंग, पात्र मानवता या सूत्राला घट्ट बिलगून असतात. साने गुरुजींचं जगणंच मानवतेने व्यापलेलं असल्याने ते सरळ, साध्या, सोप्या, ओघवत्या शब्दांत मांडल्यानेच त्यांची ही पुस्तकं थोर साहित्यिक कृती ठरल्या.

जीवन मांडणं हीच कला, असा संदेश नेमाडेंनी यातून घेतला की काय, असा प्रश्न पडतो. कोसला वगळता नेमाडेंच्या सर्व कादंबर्‍य़ांमध्ये प्लॉट नाही. मेघनाद कुलकर्णी फोनवर गप्पा मारताना म्हणाला, नेमाडे हे देशीवादी नाहीत की वास्तववादी नाहीत ते डायरीवादी आहेत. नेमाडेंच्या कादंबर्‍यांमध्ये (कोसला वगळता) प्लॉट नाही, पात्रं नाही याकडेच मेघनादचा रोख असावा. नेमाडेंच्या या कादंबर्‍या (हिंदू सहित) वैचारिक भूमिका, मांडण्यासाठी लिहिल्या आहेत. या कादंबर्‍यांमधील वैचारिक चर्चा हाच आकर्षणाचा बिंदू असतो. ग्रामीण भागातून शहरात स्थलांतरित झालेला बहुजन समाजातील तरूण हा नेमाडेंचा वाचक असतो. याच वाचकाला उद्देशून नेमाडे कादंबरी लिहितात. ग्रामीण भागातील या तरूणाची नाळ शहराशी जुळत नाही. शहर त्याला परकं वाटतं पण गावाकडे परत फिरणं त्याला जमत नसतं. या सामाजिक वास्तवातून तो एका चमत्कारीक नैतिक संघर्षात अडकतो. त्याला शहरी मूल्य पटत नसतात आणि त्याची जडण-घडण करणारी गावातली मूल्यंही गावातच ढासळू लागली असतात. या वाचकवर्गाला नेमाडे अभिमान देऊ पाहतात, अस्मिता देऊ पाहतात, म्हणूनच नेमाडपंथ तयार होतो. त्यांचे अनुयायी तयार होतात. म्हणजेच नेमाडे विश्वाला वा त्यांच्या भाषेतला चपखल शब्द निवडायचा तर आदी वाचकाला संबोधित करणारे आदी लेखक ठरत नाहीत. वैश्विकतेला ते धर्म, जात, प्रदेश यामध्ये विखंडीत करतात. जीवन मांडणं हीच श्रेष्ठ कला ही भूमिका कोणाला पटेल वा कोणाला पटणार नाही. त्या मुद्दयावर कुणाशी पंगा घेण्याचं काही कारणच नाही. मुद्दा अस्मितावादाचा आहे.

हिंदू ही कादंबरी आहे की खंडेरावाचं चरित्र ? कादंबरी असो वा चरित्र, एकही पात्रं भक्कमपणे उभं रहात नाही. अगदी खंडेरावही आभासी आहे. कथावस्तू वा प्लॉट नाही, पात्रं नाहीत. मात्र अनेक माणसांच्या गोष्टी त्यात आहेत. सूक्ष्म निरिक्षणं, भाषेची अतिसूक्ष्म जाण, अतिशय प्रभावी वर्णनं, अनेक विषयांवर चर्चा यांनी ही कादंबरी खच्चून भरली आहे. ही चर्चा करताना नेमाडे यांनी काही वादांना खंबीरपणे निमंत्रण दिलं आहे. मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्याची मागणी मराठवाड्यात स्थायिक झालेल्या विदर्भातील दलित नेत्यांनी केली आणि तिला मराठवाड्याबाहेरच्या उच्चवर्गीय समाजवाद्यांनी पाठिंबा दिला, असं नेमाडे यांनी या कादंबरीत म्हटलं आहे. नामांतराचा विषय अनेक साहि्त्य संमेलनात आला. नामांतर होईपर्यंत अनेक संमेलनांनी या संदर्भात ठराव केले. मात्र दलित साहित्य असो वा अन्य मराठी लेखकांच्या कलाकृती असोत, नामांतराचा विषय मराठी कथा-कादंबरीमध्ये अपवादानेच आला. देशातली पाणी टंचाई अर्थात अपुरा पावसाळा हे अस्पृश्यतेचं मूळ होतं, याकडे नेमाडे यांनी लक्ष वेधलं आहे. बौद्ध धर्म हा शहरीच होता, गौतम बुद्धाने ज्यांच्याकडून अनेक विषयांची माहिती वा ज्ञान करून घेतलं त्यांच्याबद्दल इतिहासात फारच कमी माहिती मिळते, याकडेही नेमाडे यांनी लक्ष वेधलं आहे. ब्राह्मण आणि पूर्वाश्रमीचे महार हिंदू या व्यापक अस्मितेशी फटकूनच राहतील याकडे नेमाडे यांनी हिंदू मध्ये निर्देश केला आहे. मराठे पेंढारी होते. शिंदे-होळकरांनी या पेंढार्‍यांना हाताशी धरून लुटमारीचं सत्र सुरु केलं, मराठेशाहीच्या या अवनत काळाची दखल मराठी साहित्याने घेतलेली नाही.

कादंबरीत कुणबी वा कष्टकरी जीवनाचं उदात्तीकरण आहे. जीवनातले अनेक विरोधाभास अधोरेखित करण्यात आले आहेत, उदा. कष्ट करणार्‍याला कधीही संपत्ती वा प्रतिष्ठा मिळत नाही, त्यामुळे शोषणाच्या प्रश्नाची सोडवणूक होऊच शकत नाही मात्र त्याबद्दल एक अपराधी भावना सतत तेवती राहते. पुरुषस्थानी व्यवस्था आणि स्त्रियांचं शोषण हा न सुटणारा विरोधाभास आहे. स्त्रियांची उंची पुरुषांपेक्षा कमी असते, या मुद्द्याकडेही लक्ष वेधण्यात आलंय.

वाचनीयता आहेच. पण अनेक पानं वगळली तरी कादंबरीच्या आकलनात फरक पडणार नाही. आत्ताच आलेल्या एका एसएमएसने हिंदूवरील पोस्टच्या मालिकेची अखेर चपखलपणे होते.....
मोरगावच्या खंडू मोराने
फुलवलेला आठवणींचा पिसारा,
धरून ठेवणार्‍य़ा घटकाच्या अभावी
ठरला फक्त पसारा...

Tuesday 17 August 2010

हिंदू आणि रेणू

समाजात बोलल्या जाणार्‍या भाषेचा अवकाश प्रचंड असतो. त्यापैकी फारच थोडा ऐवज म्हणजे शब्द, शब्दप्रयोग, त्यांचे विविध अर्थ, वाक्यरचना, इत्यादी साहित्यात येतो. साहित्यिक भाषेच्या कक्षा रुंदावणं, ती अधिक समावेशक करणं हे काम लेखकाने करायचं असतं. फणिश्वरनाथ रेणू यांची मैला आँचल ही कादंबरी प्रकाशित होईपर्यंत आधुनिक हिंदी साहित्याने लोकभाषेची, लोकसाहित्याची केवळ तोंडदेखली दखल घेतली होती. मैला आँचल या कादंबरीत पहिल्यांदा बिहारमधील पूर्णिया जिल्ह्यातल्या मैथिली भाषेला मान्यता देण्यात आली. महात्मा गांधी या कादंबरीत गन्ही महत्मा होतात. आंड ठेचलेला बकरा, खस्सी म्हणून अवतरतो. हिंदी साहित्यातील मैलाचा दगड म्हणून ही कादंबरी आज ओळखली जाते. परंतु पन्नासच्या दशकात ही कादंबरी प्रसिद्ध झाली तेव्हा ही हिंदी भाषेतली कादंबरी नाही अशी टीका तिच्यावर करण्यात आली होती. मराठी साहित्यात भाषिक अवकाश विस्तारण्याचं काम लिटल मॅगेझिनच्या चळवळीने सजगपणे केलं. नेमाडे या चळवळीतले बिनीचे शिलेदार होते. कोसलाच्या यशात भाषेचाच मोठा वाटा आहे. गल्लीच्या नाक्यावरच्या मवाल्यांची भाषा मराठी साहित्याला ठाऊकच नव्हती, भाऊचा धक्का म्हणतात तो तोच, असं अशोक शहाणे यांनी एका लेखात म्हटलं आहे. हिंदू मध्ये अहिराणी, खानदेशी, मराठवाडी, अशा अनेक मराठीचे नमुने आहेत. महानुभावी गद्य ते अरुण कोलटकर यांच्यापर्यंतच्या कवितांची उद्धरणं आहेत. हिंदी, उर्दू, खडी बोली, गुजराती असे अनेक भाषांचे तुकडे आहेत. मराठी साहित्याची भाषा संपन्न करण्याचा वसा नेमाडे यांनी निष्ठेने सांभाळला आहे.
मैला आँचल (मळलेला पदर) ही कादंबरी आँचलिक (प्रादेशिक) असल्याचं रेणू यांनी स्वतःच म्हटलंय. प्रादेशिक भाषेत लिहिलेली, प्रदेशाचं वर्णन करणारी वा प्रादेशिक आशयसूत्र असणारी कादंबरी म्हणजे प्रादेशिक कादंबरी नाही. लोकसंस्कृतीमूलक कादंबरी म्हणजे आँचलिक कादंबरी. अर्थातच या कादंबरीत व्यक्तिवाद, व्यक्तीस्वातंत्र्य या पाश्चात्य मूल्यांना कळीचं स्थान नसतं. नेमाडे यांच्या अन्य कादंबर्‍यांच्या तुलनेत हिंदू सर्वाधिक लोकसंस्कृतीमूलक आहे. व्यक्तिवाद, व्यक्तिस्वातंत्र्य या मूल्यांबाबत नेमाडे यांना असणारा तिटकारा या कादंबरीत अधोरेखित करण्यात आलाय.
फणीश्वरनाथ रेणू १९४२ च्या चलेजाव आंदोलनात सशस्त्र क्रांतिकारक होते, नेपाळमधील राणाशाहीच्या विरोधातील आंदोलनातही त्यांनी सहभाग घेतला. समाजवादी आंदोलनात ते सक्रीय होते. जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखालील संपूर्ण क्रांती आंदोलनातही ते सामील झाले. रेणू यांचे नायक त्यामुळेच राजकीय वा सामाजिक कृती करणारे असतात. नेमाडे यांची भाषिक कृतीवर नितांत श्रद्धा आहे. मुलाखतींमध्ये त्यांनी तसं स्पष्ट म्हटलं आहे. नेमाडेंचे नायकही प्रामुख्याने भाषिक कृती करणारेच आहेत. पांडुरंग सांगवीकर, चांगदेव पाटील किंवा हिंदूमधला खंडेराव प्रामुख्याने भाषिक कृतीच करतात. ज्ञानाची बाजू कोणीतरी सांभाळायला हवी की नाही, असं खंडेराव स्पष्टच सांगतो. भाषिक कृतीवर निष्ठा असणार्‍या लेखकाचं समाजाचं आकलन आणि सामाजिक-राजकीय कृतीकडे झुकणार्‍या लेखकाचं आकलन यात फरक असतो. खंडेरावाला मोरगाव हे रामराज्य वाटतं. विविध धर्म, पंथ, जाती या गावात गुण्यागोविंदाने नांदत असतात. गरीबी असते, मागासलेपणा असतो. पण त्यात काहीच वाईट नसतं. शोषण वाईट असतं, असं खंडेरावच सांगतो. हिंदू मध्ये जातिव्यवस्थेच्या शोषणाची केवळ दखल घेण्यात आलीय. या शोषणाच्या सामाजिक, राजकीय अंगांचं चित्रण करण्यात आलेलं नाही. मोरगावातले लोक राजकीय दृष्ट्याही एकोप्यानेच राहतात, अशी समजूत होते. त्या गावातले आर्थिक, सामाजिक, राजकीय अंतर्विरोध समजत नाहीत. मैला आँचल ही कादंबरी मेरीगंज या गावाभोवतीच फिरते. या एका गावात रेणूने संपूर्ण भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातल्या ताण्याबाण्यांचं दर्शन घडवलं आहे. मैला आँचल वाचल्यावर काँग्रेसचा जनाधार मोठा असला तरीही ब्राह्मण, मुस्लीम आणि दलित हा त्या पक्षाचा आधार आहे हे कळतं. यादवांच्या नेतृत्वाखाली अन्य मागासवर्गीय जाती समाजवादी पक्षांच्या झेंड्याखाली संघटीत होत आहेत हे समजतं. आदिवासी या राजकीय प्रक्रियेपासून कोसो दूर आहेत याचंही ज्ञान होतं. राजपूत, बनिया यांचा पाठिंबा जनसंघाला आहे हे समजतं. मैला आँचल वाचल्यावर बिहारच्या राजकारणाबद्दल वाचकाला कमालीची स्पष्टता येते. अरविंद दासचं रिपब्लिक ऑफ बिहार हे पुस्तक १९९२ साली प्रकाशित झालं. हे पुस्तक वाचल्यावर बिहारच्या राजकारणाच्या नाडीवर आपला हात आहे असं वाचकाला वाटू लागतं. पन्नासच्या दशकात या राजकारणाची नाडी परिक्षा रेणूने केल्याचं मैला आँचल वाचून समजतं. मोरगावचा इतिहास, भूगोल, निसर्ग, परिसर, समाज या सर्वांचा परिचय हिंदू मध्ये वाचकाला होतो पण देशाच्या वा महाराष्ट्राच्या सोडा, खानदेशाच्या राजकारणाबाबतही वाचक पूर्णपणे अनभिज्ञ राहतो.
जातिव्यवस्थेची दोन रुपं आहेत. एक उभं, डॉ. आंबेडकरांनी म्हटल्याप्रमाणे उतरंडीचं. तर दुसरं आडवं, म्हणजे सर्व जाती समान आहेत पण प्रत्येक जातीने स्वतःची पोटसंस्कृती जतन केली आहे. उभी जातिव्यवस्था आडवी केली पाहिजे म्हणजे विषमतेला नकार देऊन व्यामिश्र संस्कृतीचं जतन केलं पाहिजे अशी नेमाडे यांची भूमिका ढोबळपणे मांडता येईल. रेणूंनीही त्यांच्या कथा-कादंबरींतून याकडेच निर्देश केला आहे. मात्र रेणू यांची मांडणी नेमाडे यांच्याप्रमाणे अस्मितावादी नाही. हिंदू या अस्मितेची स्वतंत्र मांडणी करण्यासाठी हिंदू हे कादंबरी चतुष्टय लिहिण्याचा संकल्प आपण सोडला, असं नेमाडे यांनी प्रकाशनपूर्व मुलाखतींमध्ये म्हटलंय. ज्ञानेश्वर ते तुकाराम ही संत परंपरा महाराष्ट्राच्या अस्मितेचा बिंदू होऊ शकत नाही. अस्मितेसाठी सत्ताकेंद्र लागतं. म्हणून शिवाजी महाराज (नेमाडे यांच्या मताप्रमाणे मलिक अंबर ते शिवाजी ही परंपरा) हाच मराठी अस्मितेचा केंद्रबिंदू होतो. कोणतीही अस्मिता संकुचितच असते. त्यामुळे कोणताही लेखक वा कलावंत अस्मितेची पुर्नमांडणी करण्यासाठी लेखन करत नाही. लोकसंस्कृतीची, लोकभाषेची कास धरताना रेणू असा अस्मितावादी झाला नाही. असो.

Wednesday 4 August 2010

हिंदूः अनेकवचनी भूतकाळी

रात्री आकाशकडे पहात असताना ब्रम्हांड डोळ्यापुढून सावकाश सरकत जातं. हिंदूचं पहिलं प्रकरण वाचताना मला नेमकं तसं वाटलं. मोहेंजो-दडो या अतिप्राचीन नगरीच्या उत्खननाच्या जागतिक प्रकल्पावर, काम करणारा खंडेराव हा होतकरू पुरातत्वज्ञ अवघ्या जगाला आव्हान देणारं आपलं संशोधन जागतिक परिषदेत मांडतो आणि मोहेंजो-दडो ते तापी खोर्‍यातलं मोरगाव यांचा जैविक संबंध प्रस्थापित करू पहातो. पहिल्याच प्रकरणात येणारं मोरगावही विश्वरुप दर्शनासारखं भासतं.

निरीक्षण शक्ती, किस्से, गोष्टी, भाषासांस्कृतिक जाण वा भान, ह्या साहित्योपयोगी सामग्रीचा विचार करता नेमाडे हा गडगंज कुबेर आहे, अशी प्रतिक्रीया एका मित्राने एसएमएसद्वारे दिली. मला या शब्दकळेचा परिचय नाही पण त्यातली लयकारी पद्याच्या जवळ जाणारी म्हणून विलक्षण प्रभावी वाटली. कालानुक्रमाने गोष्ट सांगण्याची मळलेली वाट नेमाडे यांनी सोडून दिल्याने, काळाचं आकुंचन-प्रसरण करण्याचं वेगळं तंत्र त्यांना शोधावं लागलं. हे तंत्रं कितपत यशस्वी ठरलंय याचा निवाडा पहिल्या प्रकरणात करणं अवघड आहे. मात्र अनेकवचनी भूतकाळी हा परवलीचा शब्द उच्चारण्यापूर्वीच हिंदू वाचकावर गारुड करते, हे खरं.

खंडेराव जे पाहतोय, वागतोय, जगतोय तेच पाहतोही आहे. या साक्षी भावाच्या सूत्राने कादंबरीची सुरुवात होते. विश्राम बेडेकरांनी आपल्या आत्मचरित्रासाठी निवेदनाचं हेच सूत्र पकडलं आहे. साक्षी भावाचं हे सूत्र आत्मचरित्राला फारसं उपयोगी नाही हे एक झाड दोन पक्षी वाचल्यावर ध्यानी येतं. खंडेरावाच्या चरित्राला ते कितपत उठाव देतं हे कादंबरीची पानं जशी वाचत जाऊ तसं कळेलच.

श्रमाला केंद्रस्थानी ठेवून नैसर्गिक पिकांनी पृथ्वीची शान वाढवणारी आत्ममग्न कृषिसंस्कृती हळूहळू परावलंबी होत गेली. याउलट, भाषेला केंद्रस्थानी ठेवून शोषण करणार्‍या नागरी ऐतखाऊ औद्योगिक, व्यापारी, कोळसा-पेट्रोलादी खनिजांवर धावणार्‍य़ा शोषण संस्कृतीचा विजय झाला. हेच महानगरी संस्कृतीच्या र्‍‍हासाचं प्रमुख कारण आहे. आजची मुंबई, न्यूयॉर्क, लंडन इत्यादी शहरही मोहेंजो-दडो प्रमाणेच निर्ममनुष्य होतील, अशी शक्यताही खंडेराव वर्तवतो.

धर्माची तत्व कोणती का असेनात कृषीसंस्कृती वा सरंजामशाही कालखंड कधीही मूलतत्ववादी नव्हता. त्यामुळेच तर डॉ. जलील बोलताना, इस्लाममधले हीनयान आणि शिया पंथ घ्या की हिंदूचे बौद्ध आणि सुन्नी पंथ घ्या, कॅथलिक आणि शैव—सॉरी वैष्णव आणि प्रोटेस्टंट—सॉरी.... अशी अर्थपूर्ण गफलत करतात. धर्म आणि त्याची तत्वं यापेक्षा लोकजीवन हेच महत्वाचं असतं. ते जीवन जर श्रमाला अर्थातच शेतीला केंद्रीभूत मानून असेल तर धर्मभेद, जातिभेद, भाषाभेद यांचा बडेजाव चालत नाही. किंबहुना विविध धर्म, पंथ, जाती, भाषा यांनी सामावून घेणारी एक समृद्ध संस्कृती तयार होते. जगातील कोणात्याही समूहाच्या वाट्याला येणार नाही असा समृद्ध भूतकाळाचा अवकाश हिंदूंना ज्यामध्ये आताच्या पाकिस्तानातील वा अफगाणिस्तानातील मुसलमानही येतात, यांना प्राप्त झाला आहे, असं खंडेराव म्हणतो.

प्रो. सांखळीया म्हणजे पाश्चात्य दृष्टीपासून न ढळणारे पण प्रामाणिक, निष्ठावान पुरातत्वज्ञ आहेत. प्रो. मंडी इंग्लडची असली तरी मूळात स्कॉटलंडची आहे. तिला खंडेरावाच्या दृष्टीकोनाबद्दल आस्था आहे. युरोपियन श्रेष्ठत्वाच्या गंडाची छाप अनेक समाजशास्त्रीय सिद्धांतांवर आहे. त्यातून सुटका करून घेतल्याशिवाय विविध मानवसमूह, त्यांच्या जाणिवा, संस्कृती आणि म्हणून त्यांचं वर्तमान यांचा उलगडा करता येणार नाही या खंडेरावाच्या दृष्टीकोनाशी ती सहमत आहे. पाश्चात्य विरुद्ध देशी यासोबतच ब्राह्मणविरोधाचंही भक्कम सूत्रं या कादंबरीला आहे. नेमाडेंचा ब्राह्मणविरोध त्यांच्या श्रमसंस्कृतीच्या बांधिलकीतून आलेला आहे. जगण्यापेक्षा भाषेला केंद्रस्थानी आणण्याचा उपद्व्याप इंग्रजीच्या आधी संस्कृतने केलेला होता.

नेमाडेंच्या आधीच्या कादंबर्‍यांतील स्त्रियांचं चित्रण पुरेसं सखोल नव्हतं. दिलीप पुरुषोत्तम चित्रे या नेमाडेंच्या सख्ख्या मित्राने अशी टीका केली होती. सलामीच्या प्रकरणातच तिरोनी आत्याचं तपशीलवार चित्रण करून पुढच्या प्रकरणांमध्ये अनेक बायकांच्या गोष्टी वाचायला मिळतील याची सूचना नेमाडे यांनी दिली आहे. पहिल्या प्रकरणातच वाचक मोरगावला पोचतो. हरखू (अफगाणिस्तानातील शरयू नदी), भावडू, खंडेरावाचे पूर्वज, आई-वडील, आत्या अशा अनेक पात्रांशी त्याचा परिचय होतो. त्यांच्या गोष्टी पुढच्या प्रकरणात वाचायला मिळणार हे सहजपणे ताडता येतं.

अनेकवचनी भूतकाळात रमायला होतंच. कारण तिथे आधुनिक तंत्रज्ञान पोचलेलं नसतं त्यामुळे समाजातील अंतर्विरोधाची तीव्रताही कमी असते. आधुनिक काळातच समाजातील अंतर्विरोध तीव्र आणि गुंतागुंतीचे होतात.

पहिलं प्रकरण वाचताना मी पंजाबात होतो. ते संपेपर्यंत चंडिगडहून विमान मुंबईच्या विमानतळावर झेपावलं. दोन दिवस अनेक कामांमध्ये अडकून पडलो. मग पुण्याला जाणं झालं. मागच्या गुरुवारी रात्रभर प्रवास करून भल्या पहाटे भोपाळला जावं लागलं. दुसरं प्रकरण वाचायची सवड मध्य प्रदेशात मिळाली. विंध्याचलात. तिथे मी फणिश्वरनाथ रेणूंच्या दोन कादंबर्‍या विकत घेतल्या. मैला आँचल आणि परती परिकथा. मैला आँचल ही मेरीगंज या गावाची कहाणी आहे तर परती परिकथा, परानपुर या गावाची गाथा आहे. दोन्ही गावातली लोकसंस्कती, राजकारण, जातीचे आणि वर्गाचे अंतर्विरोध, भाषा, धर्म याचं मर्मग्राही चित्रण रेणूंनी केलं आहे. मैला आँचल ही कादंबरी १९५० च्या दशकात प्रसिद्ध झाली. ती कादंबरी हिंदी नाहीच असाच आक्षेप घेण्यात आला होता. कारण ती बिहार मधील पूर्णिया जिल्ह्याच्या भाषेतच लिहिण्यात आलीय. हिंदी, बिहारी, पूर्णिया जिल्ह्यातली लोकभाषा, नेपाळी, बंगाली, इंग्रजी अशा अनेक भाषा रेणूच्या साहित्यात डोकावतात. हिंदूची पुढची प्रकरणं मी रेणूच्या कादंबर्‍यांसोबत वाचायचं ठरवलं.