Monday 8 June 2015

मुंबई, ६ जून २०१५: आठवणींचा वानवळा

जपानी बाग


चर्नीरोड ते मरीनलाईन्स ह्या रस्त्यावर कोणे एकेकाळी गोरे साहेब आणि त्यांच्या मड्डमा संध्याकाळी फिरायला यायच्या. समुद्र तिथपर्यंत होता.सोनापूरात हिंदू स्मशानभूमी होती. पुढे तिचं नाव झालं चंदनवाडी. संध्याकाळी फिरायला जायचं आणि पेटलेल्या चिता वा अंत्यसंस्कार बघायचे ह्याची किळस आली गोर्‍यांना. त्यांनी बूट काढला की ही स्मशानभूमीच हलवावी इथून. त्यावेळी नाना शंकरशेटांनी दगडी भिंत बांधून दिली स्वतःच्या खर्चाने आणि तो प्रश्न निकालात काढला.
हिंदू दहनभूमीला लागून पुढे मुसलमानांचं कबरस्थान होतं. त्याच्यापुढे सीरियन्/आर्मेनिअन्/जॉर्जिअन अशा कुठल्यातरी लोकांसाठी राखून ठेवलेली दफन भूमी होती. दुसर्‍या महायुद्धाच्या काळात काही सैनिकांचे/लोकांचे दफन इथे झाले होते म्हणतात. या लोकांचे मुंबईत अस्तित्व न उरल्यामुळे या दफनभूमीचा उपयोग उरला नाही. ही विनावापर पडून असलेली जागा मुंबई महापालिकेकडून मिळवून तिथे बाग करायचा बूट निघाला. तो गिरगावकरांनी उचलून धरला. त्यातल्या कायदेशीर अडचणी वगैरे म्हणे स. का. पाटलांनी मार्गी लावल्या. आणि तिथे जपानी बाग उभी राह्यली.
त्या बागेमध्ये केवळ झोपाळे, सीसॉ नव्हते तर खेळण्यासाठी इतरही अनेक गंमती होत्या. लंडनच्या टेम्स नदीवरील पुलाची प्रतिकृती, त्यातल्या लोखंडी दांड्याना लटकत वा त्यावरून चालत जाणं, मनोर्‍यावर चढत जाऊन गुळगुळीत पाइपावरून घसरत खाली येणं. अवघ्या मुंबईत अशी बाग नव्हती साठच्या दशकात.
तिथे एक तळंही होतं. त्यात मासे होते. ते गप्पी मासे पकडायला आम्ही तिथे प्लॅस्टिकच्या पिशव्या धागा लावून टाकायचो. वेगवेगळ्या पातळीवरच्या मोकळ्या जागा. दगडांच्या छोट्यामोठ्या भिंती, हिरवळ, बगीचे. एक अॅम्फी थिएटरही होतं. तिथे सिनेमे दाखवले जायचे. हिरवळीवर बसून, दाणे खात सिनेमा पाह्यचा. तिथे बाबा आमटेंचं भाषण झाल्याचंही मला आठवतं.
त्या थिएटरच्या खाली बायकांनी चालवलेलं रेस्टॉरंट होतं. मला वाटतं ही कल्पना प्रमोद नवलकरांची. ते जपानी बागेच्या बाजूलाच राह्यचे. जपानी बागेत गोट्या वा बैदूल वा कंचे खेळण्याची सोय नव्हती. मी दुसरीत वगैरे असेन, नवलकरांची ओळख झाली तेव्हा मी त्यांच्याकडे ही तक्रार केली. तेव्हा ते म्हणाले गोट्या खेळायला आमच्या वाडीत ये. त्यांनी घरी नेऊन वीस-पंचवीस गोट्या दिल्याचंही आठवतं.
हे उद्यान गिरगावकरांचं लाडकं उद्यान होतं. समोरच मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाची शाखा होती. तिथे अभ्यासिका सुरू करण्यात आली होती. पण प्रवेश मर्यादीत विद्यार्थ्यांनाच मिळायचा. मग गिरगावातली मुलं जपानी बागेत अभ्यास करत बसायची. जपानी बागेतला काही भाग अभ्यासिकाच बनून गेला होता. मुली बालभवनाच्या उद्यानात अभ्यास करायच्या. चर्नीरोड स्टेशनच्या अलीकडे आणि पलीकडे दोन अभ्यासिका होत्या ज्यामध्ये सर्वांना मुक्त प्रवेश होता.
बर्‍याच दिवसांनी आज जपानी बागेच्या बाजूने बसने गेलो. तिथे आता बाग नाही. पण स. का. पाटील ह्यांचा पुतळा आहे म्हणून स. का. पाटील उद्यानाची पाटी आहे. बागेत जलशुद्धीकरण का सांडपाण्याचा प्रोजेक्ट आहे. एकेकाळच्या वैभवशाली बागेचे काही अवशेष दिसतात.
उद्या कदाचित जपानी बागेवर आणखी कोणतंतरी बांधकाम उभं राहील.
हजार वर्षांनी तिथे उत्खनन केलं तर जलशुद्धीकरण वा सांडपाण्याचा प्रकल्प, त्याखाली बाग, त्याखाली कबरस्थान, त्याच्याही खाली कोळ्यांचं खळं असे सिव्हीलायझेशनचे थर सापडतील.
एकंदरीत इथले लोक खूप प्रगत नागरी जीवन जगत होते असा निष्कर्ष निघेल.

जिमखाने 


चर्नीरोड स्टेशन ते मरिन लाईन्स या रेल्वेलाईनच्या एका बाजूला गिरगाव तर दुसर्‍या बाजूला मरिन ड्राईव्ह.
गिरगाव हे गावच होतं. शंभर-दोनशे वर्षांपूर्वी.
रेल्वेलाईन टाकताना समुद्र हटवला.
मुंबई हायकोर्ट नुक्तच स्थापन झालं होतं. त्या कोर्टात पहिली जनहित याचिका दाखल केली परेड ग्राउंडवर (आझाद मैदान) क्रिकेट खेळणार्‍या तरुणांनी. मुंंबईत त्यावेळी ते एकच मैदान होतं. बॉम्बे जिमखाना हा गोर्‍या अंमलदारांचा. तो त्यावेळीही कुंपणात होता. उरलेल्या मैदानात ही पोरं क्रिकेट खेळायची. पण गोरे सोजीर घोड्यावरून पोलो खेळायला आले की त्यांना हाकलून लावायचे.
नेटिवांना खेळण्याचा हक्क आहे, ह्या मुद्द्यावर या तरुणांनी पब्लिक इंटरेस्ट लिटीगेशन दाखल केलं. कोर्टात सुनावणी सुरू झाली, तारखा पडत होत्या. त्यावेळचा मुंबईचा गोरा अंमलदार क्रिकेटप्रेमी होता. मरिन लाइन्स आणि चर्नीरोडच्या दरम्यानचा समुद्र हटवून तिथे नेटिवांसाठी क्रिकेटची मैदानं केली. पारसी, इस्लाम, हिंदू, कॅथलिक असे जिमखाने झाले. एक विल्सन कॉलेजला दिला, दुसरा मेडिकल कॉलेजला.
ह्या मैदानावर गिरगावातली हजारो मुलं वर्षानुवर्षे मुक्तपणे खेळत होती. मला वाटतं नव्वदच्या दशकात पोलीस जिमखाना उभा राह्यला. आयपीएस अधिकार्‍यांसाठी. म्हणजे त्यांच्या पार्ट्या, गेटटुगेदर आणि चैनींसाठी. त्यांनी मैदानाचा असा बंदोबस्त केला की केवळ पैसेवालेच तिथे खेळू शकतील. तीच गत इतर मैदानांचीही झाली. आता ही मैदानं क्रिकेटपेक्षा लग्न समारंभासाठीच वापरली जातात. अपवाद विल्सन कॉलेजच्या जिमखान्याचा.
खासदार, आमदार, नगरसेवक, पत्रकार, संस्था चालक, वाड्या-गल्लीतले पुढारी, गणेशोत्सव मंडळं, मतदार कुणालाही नेटिवांच्या खेळण्याच्या हक्कांची काहीही पडलेली नाही.

अजय आणि विजय


गिरगाव चौपाटीचे दोन भाग होते. छोटी चौपाटी आणि मोठी चौपाटी.
मफतलाल बाथ म्हणजे स्विमिंग पूलच्या अलीकडे छोटी चौपाटी आणि पलीकडे मोठी चौपाटी.
पोहायला शिकणारे छोट्या चौपाटीवर जायचे. तिथे हवा भरलेल्या ट्यूब भाड्याने मिळायच्या. एका तासाचे चाळीस पैसे असा दर होता.
बंडूमामा आम्हा तीन भाच्यांना (मी, संजीव आणि मंदार) तिथे पोहायला शिकवायचा.
एक ट्यूब भाड्याने घ्यायची. म्हणजे एक जण पाण्यात तरंगत असायचा. दुसरा डुंबत असायचा तेव्हा तिसर्‍याचं प्रशिक्षण सुरू असायचं.
आकाशाकडे तोंड करून पाण्यावर उताणा पाडायचा.
पाठीखाली हात धरायचा.
अंग हलकं सोड, श्वास पोटाने घे, हातपाय एकदम हलके कर
अशा सूचना.
कमरेखाली मामाचा हात नाही तर केवळ एक बोट आहे हे आम्हाला कळायचं.
अंग हलकं सोड, मुठी वळू नकोस, हात आणि पाय फाकव.
आम्ही आटोकाट प्रयत्न करायचो त्या सूचना पाळण्याचा.
मग कमरेखालचं बोटही दूर व्हायचं.
डोळ्यावर पाणी यायचं. केवळ नाक पाण्याच्या वर राह्यचं.
कानही पाण्याखाली जायचे. मामाचं बोलणं ऐकू यायचं नाही.
खार्‍या पाण्याने डोळे चुरचुरायचे. तरिही डोळे उघडे ठेवून आम्ही आकाशाकडे पाह्यचो.
मामाचा चेहेरा बारका दिसायचा. मध्येच मोठा व्हायचा.
हळू हळू सदेह पाण्याखाली जायचो. नाकातोंडात खारं पाणी.
जीव घाबरा व्हायचा. आपण बुडणार ह्याची खात्री व्हायची.
मरो ते आडवं पडून राहणं. मामाच्या गळ्याला मिठी मारायची धडपड करायचो.
अशी धडपड केली की तो उचलून फेकून द्यायचा आणखी खोल पाण्यात.
मादरचोद, बुडवतोय साला, अशी शिवी दिली की पुन्हा एकदा फेकून द्यायचा.
समुद्रतळाला जायचो. निळं आकाश, निळं पाणी. आणि पांढरे बुडबडे. घाबरा झालेला जीव. त्या दोन भावांचा हेवा वाटायचा. एक मस्त तरंगतोय तर दुसरा डुंबतोय. माझ्याच वाट्याला बुडणं आलंय. हरामखोर लेकाचा.
ट्यूब आहे, होडी आहे, पोहायला येण्याची गरजच काय असं वाटायचं.
तोपर्यंत पुरती दमछाक झालेली असायची. फ्लोटिंगची अशी दोन-तीन सेशन्स पार पडली की मग सुटका व्हायची.
आता दुसरा भाऊ मामाच्या तावडीत यायचा. मला हसत होतास काय....भोग तुझ्या कर्माची फळं असं म्हणून उरलेले दोघे खूष व्हायचे.
काही दिवसांतच आम्ही तिघेही नीट तरंगू लागलो. मग हात-पाय मारत पुढे-मागे जाण्याचं ट्रेनिंग. कॉलेजमध्ये जाऊ लागेपर्यंत गिरगाव चौपाटीवर खूप आतमध्ये पोहत जाऊ लागलो. मी आणि अजय ठाकूरदेसाई, मफतलाल बाथमध्ये कपडे उतरवून, खुल्या समुद्रात पोहायला जायचो. गिरगाव चौपाटीपासून राजभवन पर्यंत. येता-जाताना दम खायला थांबायचो एका प्लॅटफॉर्मवर. अमर-अकबर-अँथनी या पिच्चरमधल्या एका गाण्यात आहे तो प्लॅटफॉर्म. राजभवनाच्या बीचजवळ पोचलो की तिथला वॉचमन बंदूक दाखवायचा. गांड फाटायची. हरामखोर साला, दम घ्यायलाही फुरसत देत नाही. शिव्या घालायचो त्याला आणि मागे वळायचो.
काल समुद्राजवळून गेलो. विजयचीही आठवण झाली. पावसाळा सुरु झाला की समुद्र खवळायचा. उंच लाटा धडकायच्या भिंतीवर. मरिन ड्राईव्हचा रस्ता ओला व्हायचा पाऊस नसताना. केव्हाही ढग भरून यायचे, पाऊस आणि लाटांचं तांडव सुरू व्हायचं. अशा वेळी संध्याकाळी मी आणि विजय वाडेकर त्या धक्क्यावरून धावायची रेस लावायचो. इयत्ता ८ वा ९ वी मध्ये होतो तेव्हा. अतिशय डेंजरस गेम होता तो. विजय नेहमी जिंकायचा.
अजयचं काही वर्षांपूर्वी निधन झालं. त्याही आधी विजयचं. काल मरिन ड्राईव्हवरून जाताना दोघांची आठवण आली.

रात्रपाळीच्या गंमती


" माल आ चुका हैं, पुलिस का बंदोबस्त हैं
पीटर का फोन आयेगा, उसको कोडवर्ड बता देना-- आसमान में तारे हैं, आप हमारे हैं."
रात्री दोन वाजता कुणालाही फोन करून हे सांगायचं. ऐकणार्‍याची फाटायची.
पाच मिनिटांनी पुन्हा फोन करायचा त्याच नंबरवर--पीटर बोल रहा हूँ
तो माणूस ताबडतोब कोडवर्ड सांगायचा-- आसमान में तारे हैं, आप हमारे हैं
smile emoticon smile emoticon smile emoticon
त्यावेळी कॉलर आयडी वगैरे भानगडी नव्हत्या. कुठून फोन आलाय कळायचा नाही. टॉक टाईम वगैरे भानगडी नव्हत्या.
डिकेक्टरी चाळायची आणि कोणत्याही शहाला रात्री दोन वाजता फोन करायचा.
आप नॉनव्हेज खाते हैं क्या....
पुढंचं वाक्य-- सायन हॉस्पीटलमें एक अॅक्सीडेंट का केस हैं. ब्लड की जरूरत हैं आपका फोन नंबर मिला.
ऐकणार्‍याची फाटायची.
मेरा ब्लड ग्रुप मालूम नही. मगर कभी कभी नॉनव्हेज खाता हूँ. घरवालोंको मत बताना.....
smile emoticon smile emoticon smile emoticon
रात्री दोन वाजता फोन करायचा.
आपके खिडकीसें दर्या दिखता हैं....सायन हॉस्पीटलमें एक अॅक्सीडेंट केस है...
ऐकणार्‍याची फाटायची.
एक मिनिट, देखके बताता हूँ...असं म्हणायचा
नही दर्या नही दिखता हैं....
तो सो जाओ हमारा टाइम खराब मत करो.
smile emoticon smile emoticon smile emoticon smile emoticon
अजित जोशी, जतीन देसाई, मृत्युंजय बोस बर्‍याच महिन्यांंनी प्रेस क्लबमध्ये भेटले. जुन्या आठवणींना उजाळा दिला अजितने.
मझा आला...

६ जून २०१५ रोजी मुंबईला एक दिवस मुंबईत होतो. शास्त्रीहॉल-प्रेस क्लब-शास्त्रीहॉल असा हिंडलो. बालपणीच्या, तरुणपणीच्या, माझ्या जन्मापूर्वीच्या अनेक आठवणी जाग्या झाल्या. त्याचा हा वानवळा

Wednesday 3 June 2015

दोन कविता--आलापल्ली आणि इमामवाडा

आलापल्ली


जंगलात
तुम्ही
असता एकटे
असेनात काकितीही सखेसोबतीअरण्यात ऐकू येतेशांतताती होत नाही सहनम्हणून बडबडतात लोक(जसे खाकरतात सिनेमाहॉलमध्ये अंधार झाल्यावर)हळू हळू होतात मौनवृक्ष-वनस्पतींसारखेस्विच ऑफ करा तुमचे स्मार्ट फोन्स
तहानलाडू-भूकलाडू सोडून द्या कारमध्ये
डांबरी रस्त्यावरून जंगलात वळा
जंगलाला सरावल्यावर
कान आणि घ्राणेंद्रियं होतात तीक्ष्ण
आणि नजर सावध
गरज असेल तेव्हाच
फुटतो नरड्यातून आवाज
पशुपक्ष्यांप्रमाणे
मग तुम्हाला
दिसेल पाणी
ओळखता येईल
भक्ष्य आणि अभक्ष्य
दिसू लागेल गोष्ट पान, कळी, फूल आणि फळांमध्ये
नदी, झर्‍यामध्ये, चंद्र-सूर्यामध्ये किंवा आकाशातल्या चांदण्यामध्ये
मग तुम्ही गाणं म्हणाल
आजवर कधीही न ऐकलेल्या
सुरांमध्ये
वेगळ्या लयीत आणि तालात


इमामवाडा


कुठून आलो?
कुठे आहोत?
कुठे वळणार?
इमामवाड्यात
हे प्रश्नच फिजूल
असतात
कितीही हिंडलात
तरी तुम्ही तिथेच
असता
ओसाड, दगडी वाड्याने
घेरलेल्या भिंतीत चिणलेले
भिंतीत आणि कानात
घुमत असतं गाणं
तुमची प्रतिमा
बघत असते
बाहेरचा नजारा
शोधत असते
अनारकलीला

हायवे संस्कृती

किती तरी वर्षं झाली. मुंबई ते पाटणा असा प्रवास मी केला होता. खामगाव ते पाटणा ट्रकने. 
खिशात पैसे नव्हते. त्यामुळे वाटेत पडेल ती कामं करायची, ट्रकवाल्यांची स्केचेस करायची, कधी क्लीनरचं काम करायचं. असं करत काही महिन्यांनी मी पाटण्याला पोचलो.
एका ट्रकवाल्याने माकडाचं एक अनाथ पिल्लू दत्तक घेतलं होतं. छोटसं होतं. त्याच्यासाठी तो ट्रकवाला हाच आई होता. त्यामुळे ट्रक चालवतानाही ते त्याच्या डोक्यावर बसून राह्यचं.
उन्हाने जीव नकोसा व्हायचा मे-जून महिन्यात. अशावेळी भर दुपारी ट्रक थांबायचा एखाद्या तलावाच्या काठी. तिथे जलक्रिडा करून फ्रेश व्हायचो. ड्रायव्हरच्या बंडीमध्ये कॅश असायची. त्यामुळे तो तलावाच्या दुसर्‍या टोकाला पाण्यात उतरायचा. त्यावेळी क्रेडीट-डेबीट कार्ड नव्हती.
कोहमारा नावाचं गाव आहे महाराष्ट्र-छत्तीसगड (त्यावेळी मध्य प्रदेश) सीमेवर. तिथे एक नदी होती. दुसर्‍या राज्यात प्रवेश करायचा परवाना यायचा होता त्यामुळे आमचा तिथला मुक्काम लांबला. चारपायीवर नाश्ता-जेवण-जलपान-जेवण, नदीमध्ये आंघोळ, मासे पकडायचे, स्केचेस काढायची. हिंदी-पंजाबी-मराठी अशा भाषांमध्ये शिवीगाळ, बाचाबाची.
अनेक ट्रकवाल्यांना बद्धकोष्ठाचा आजार होता. कारण डोडा पिऊन ट्रक चालवायचे. डोडा म्हणजे अफूच्या बोंडाचं चूर्ण. डोडा चहातून किंवा पाण्यातून प्यायचा. त्यामुळे झोप येत नाही म्हणतात. अजूनही छत्तीसगडच्या हायवेवर यहाँ डोडा मिलता हैं. अशा पाट्या दिसतात. गांजा की दुकान अशा घोषणा मातीने लिंपलेल्या घरावर रंगवलेल्या असायच्या.
पंजाबी ट्रकवाल्यांना दुधाची कडक-मिठी चाय पसंत असायची. तूरडाळ गरीबीचं लक्षण समजली जायची. उडद-चना हीच डाळ त्या रस्त्यावर मिळायची. पार टाटानगरपर्यंत. डाळीमध्ये अंड फोडून नंतर तडका द्यायचा. कोणत्याही भाजीवर मलई हवीच. मैद्याची रोटी कोणत्याही धाब्यावर नव्हती. जवळपास प्रत्येक ढाब्यावर कोंबड्या पाळलेल्या असायच्या. कारण त्यावेळी पोल्ट्री व्यवसाय फोफावलेला नव्हता. देसी मुर्गी, देसी घी मध्ये पकवण्याची ऑर्डर दिली जायची. दोन ड्रायव्हर असतील तर दिवसपाळीचा ड्रायव्हर रात्री एक ग्लास दूध पिऊन ताणून द्यायचा.
भयंकर पुरुषी वातावरण असायचं हायवेवर. उर्मट, बेदरकार भाषा. वेश्या आणि ढाब्यावर काम करणार्‍या वा भिकारी बाया सोडल्या तर ढाब्यावर जेवणारी एकही स्त्री मी पाह्यली नव्हती.
बिहारमध्ये लुटारूंच्या टोळ्या असायच्या. म्हणून दहा-पंधरा ट्रक लष्करी शिस्तीने एकमेकांमध्ये सुरक्षित अंतर ठेवून जायचे. लुटारूंनीही लष्करी शिस्त आत्मसात केली. चार टोळ्या एकत्र झाल्या आणि १२ ट्रक लुटले.
शॉर्ट ट्रीपा मारणारे ड्रायव्हर चार-सहा दिवस झोपत नाहीत. कारण जेवढ्या फेर्‍या तेवढे पैसे मिळतात. मालाचं लोडिंग आणि अनलोडिंग करताना बसल्या जागी डुलक्या घ्यायच्या. हीच झोप. काही महिन्यांपूर्वी मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर एका टेंपोने १७ माणसांचे बळी घेतले. त्या टेंपोचा ड्रायव्हर सहा का दहा दिवस झोपला नव्हता.
आपल्याकडच्या व्यवस्था कमालीची दडपणूक करणार्‍य़ा आहेत. त्यामुळे हायवेवर पुरुषी, रासवट संस्कृती आकार घेते. अर्थात अलीकडे बदलली असेल कदाचित. ढाब्यांची आता गार्डन रेस्टॉरंट झाली आहेत. ट्रकांपेक्षा तिथे चारचाकी, दुचाकींची संख्या अधिक असते.

Tuesday 2 June 2015

दोन कविता

मी

शोधतो आहे माझी भाषा
पिशाच्चांच्या प्रदेशात
त्यांच्या भूतचेष्टांमध्ये
हरवून जाईन मी त्यांच्यात
उलट्या पायांनी चालू लागेन
बैल, घोडा वा चिमणी
कुणाचंही रुप धारण
करून क्षणार्धात अंतर्धान पावण्याची
किमया मलाही साध्य होईल
इच्छामात्र उरलो की भाषेची
गरजही संपून जाईल
तेव्हा तू रिट्रीव्ह कर
तुला पाठवलेल्या कविता
त्यामध्ये मी असेन


समुद्र 

व्हिटी, फाऊंटन, युनिव्हर्सिटी वा मंत्रालय वा नरिमन पॉइंटच्या
एखाद्या इमारतीत असताना जाणवत नाही
अर्ध्या किलोमीटरवर आहे समुद्र
मुंबईत दिसतोच तो
पण नसतो आपल्या जवळ
आपल्याला दिसतात फेसाळलेल्या लाटा
किनार्‍यावर धडकणार्‍या
समुद्र असतो रोमँटिक
बीच कँडीच्या दगडाआड
प्रेयसीसोबत गुजगोष्टी करणारा
दूर कुठेतरी सूर्याला पोटात घेणारा
कोळ्यांना म्हणजे तांडेलाला विचारा
तो सांगेल त्याचा समुद्र
तिथे किनारा असतो क्षितिजावर
आणि पाण्यामध्ये नसतात कोणत्याही खाणाखुणा
जीपीएस सिस्टीम नसताना केवळ आकाशात बघून
पाण्यावर चालायचं असतं माशांच्या शोधात
तांडेल फोकस्ड असतो समुद्रावर
त्याला दिसतात त्याच्या लाटांमधले सूक्ष्म बदल
तापमानातले, वार्‍यातले, भरती-ओहोटीचे
त्यावरून तो ताडतो समुद्राच्या पोटात असणारे
माशांचे थवे
बांगडे, सुरमई, पापलेट आणि काय काय...
तो सांगेल तिथे जाळं टाकल्यावर
मिळते चांदीची मासोळी
एकदा उतरा त्या खुल्या समुद्रात
लाईफ बोट किंवा अन्य कोणत्याही
आधाराशिवाय
मग समजतं भरती आणि ओहोटी काय असते ते
ओहोटी खेचत असते आत आत
घसा कोरडा पडतो तिच्याशी झगडताना
हात-पाय थकून जातात
समुद्राच्या पाण्यातला देह
घामाने भिजून जातो
जिवंत जलसमाधी घेणार आपण
ह्याची खात्री होते आपली
तरिही आपण तरंगत राहतो
चमत्कार वाटावा अशा सहजतेने
भरती फेकून देते देहाला
किनार्‍यावर
तिचे मनोमन आभार मानत
लडखडत, रांगत आपण कसेबसे पोचतो
वाळूच्या किनार्‍यावर
नशिबवान असतो आपण
जेली फीशच्या वा पतंगाच्या दंशापासून
वा शार्कच्या जबड्यातून सुटलेले
भर उन्हात आपण गाढ झोपी जातो
तापलेल्या वाळूवर
स्वप्नामध्ये दिसतो
निळा, हिरवा, जांभळा समुद्र
आणि फेसाळलेल्या लाटा
अंगोपांगात मुरलेला असतो खार्‍या पाण्याचा गंध