Monday 21 August 2017

मॉन्सून आणि भारत --१

राष्ट्र लोकांच्या हृदयात असतं.
त्या राष्ट्राचे आपण नागरीक आहोत अशी लोकांची धारणा असते. 
कल्पनेतल्या राष्ट्राला भूमी मिळाली, त्या भूमीवर त्या राष्ट्राच्या नागरीकांचं शासन स्थापन झालं की ते राष्ट्र-राज्य बनतं. 

कल्पनेतल्या राष्ट्राला भूमी असेल किंवा नसेलही. उदाहरणार्थ ज्यू लोकांच्या मनात इस्त्राईल नावाचं राष्ट्र होतं. त्या राष्ट्राला भूमी मिळाली दुसर्‍य़ा महायुद्धानंतर. त्यानंतर इस्त्राइल हे राष्ट्र-राज्य बनलं. 

कल्पनेतल्या राष्ट्राला भूमी असेलही पण त्या भूमीचं रक्षण करणारी सेना त्याच्याकडे नसेल. उदाहरणार्थ भूतान. 
ते राष्ट्र-राज्य आहे परंतु या राष्ट्राचे परदेश संबंध आणि सीमा यांची काळजी भारत घेतो. 

राष्ट्र हृदयात असतं, त्याचे आपण नागरीक आहोत अशी धारणाही लोकांमध्ये असते, त्या राष्ट्राला निश्चित भूगोलही असतो पण त्यावर त्या राष्ट्राच्या नागरीकांचं शासन नसतं. ते राष्ट्र परक्या राष्ट्राच्या ताब्यात असतं. उदाहरणार्थ तिबेट. तिबेट या राष्ट्राचं सरकार तिबेटच्या बाहेर आहे. तिबेटवर चीनचा ताबा आहे. 

ज्यू लोकांचं राष्ट्र म्हणजे इस्त्राईल ही ज्यू राष्ट्राची कल्पना होती व आहे. 

भूतानी लोकांचं-- वंश, भाषा, धर्म व संस्कृती एक असणार्‍या लोकांचं राष्ट्र म्हणजे भूतान, अशी कल्पना आहे आणि तसं राष्ट्र-राज्यही आहे. 

तिबेटी बुद्धधर्म, तिबेटी भाषा आणि तिबेट या प्रदेशात राहणार्‍या लोकांचं कल्पनेतलं राष्ट्र तिबेट आहे. 

भारतीयांची भारताबद्दलची कल्पना काय आहे? किंवा इंग्रजीमध्ये म्हणतात त्याप्रमाणे, व्हॉट इज आयडिया ऑफ इंडिया?
१. अनेक वंश, अनेक धर्म, अनेक पंथ, अनेक रंग, अनेक भाषा, अनेक संस्कृती, अनेक जाती आणि अनेक प्रदेशातील लोकांचं राष्ट्र. 
२. हिंदुंचं एकमेव राष्ट्र ज्यामध्ये जगातले अन्य धर्मही आहेत आणि अनेक पंथही आहेत. परंतु त्यांनी हिंदुंच्या छत्रछायेखाली आपण आहोत याची पक्की खूणगाठ बांधायला हवी.  
३. आर्य आणि द्रविड यांचं राष्ट्र. 
४. मूलनिवासींचं राष्ट्र ज्यामध्ये ब्राह्मणांचा समावेश नाही. 
५. भारतीय राज्यघटनेच्या प्रास्ताविकात मांडण्यात आलेली भारतीय राष्ट्राची कल्पना. 

अशी अनेक उत्तरं आजच्या घडीला दिली जातात. 

मॉन्सूनने निश्चित केलेला प्रदेश म्हणजे भारत वा इंडिया वा भारतीय उपखंड वा जंबुद्वीप वा हिंदुस्थान वा इंडिया, अशी माझी भारताची कल्पना आहे.  त्यामध्ये पाकिस्तान, भारत, नेपाळ, भूतान, बांग्ला देश, श्रीलंका आणि मालदीव ह्यांचाही समावेश होतो. कारण हे सर्व देश मॉन्सूनमुळे एकमेकांशी जोडले गेले आहेत. प्राचीन काळापासून या देशांचे एकमेकांशी आर्थिक, सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक संबंध आहेत. आपआपल्या नैसर्गिक साधनस्त्रोतांची, कौशल्यांची, भांडवलाची देवाण-घेवाण या देशांमध्ये प्राचीन काळापासून सुरू आहे. हिंदू, मुसलमान, शीख, ईसाई, पारसी असे अनेक धर्म आणि भारतीय उपखंडातील विविध भाषा या सर्व देशांमध्ये आहेत.

भारतीय उपखंडाचा हा नकाशा पाहा. त्यामध्ये राष्ट्रांच्या सीमा नाहीत. 
पश्चिमेकडे सुलेमान, साफीद आणि हिंदुकुश पर्वतांच्या रांगा आहेत. या पर्वतरांगा दक्षिण-उत्तर आहेत. उत्तर दिशेला त्यांची उंची वाढत जाते. अखेरीस त्या काराकोरमला मिळतात. 
तिथे भारतीय हिमालय सुरु होतो. हिमालयाची पर्वतरांग पश्चिमकडून पूर्वेकडे जाते. पूर्वेला ती दक्षिण दिशेकडे वळते. त्याला म्हणतात आराकान. तिथून ती बंगालच्या उपसागरात घुसते. अंदमान-निकोबार बेटे म्हणजे हिमालयाच्या पर्वतरांगांनी समुद्रातून वर काढलेली डोकी आहेत. 

तीन दिशांना पर्वतरांगा आणि उरलेल्या तीन दिशा समुद्राने वेढलेल्या असा भारतीय उपखंड एखाद्या किल्ल्यासारखा आहे. त्यामुळे या भूमीत प्रवेश करायचा तर पर्वतरांगा ओलांडून येणं भाग होतो. पर्वतरांगांच्या पलीकडून या भूमीवर राज्य करणं अशक्य होतं. कारण पर्वतरांगांमध्ये सैन्याची रसद तोडणं सहजशक्य होतं. १९६२ साली चीनने अरुणाचल प्रदेशातून तेजपूरपर्यंत धडक मारली परंतु अल्पावधीत माघार घेतली त्याचं कारणंही हेच आहे. आजही डोकलाम भागात भारत-चीन यांच्यात तणाव निर्माण झाला आहे परंतु चीन आक्रमण करण्याची शक्यता कमी आहे त्यामागचं महत्वाचं कारण उत्तुंग पर्वतरांगा हे आहे. 

या अशा भौगोलिक रचनेमुळे झालं असं की जे कोणी पर्वतांपलीकडून भारतीय उपखंडात आले ते तिथेच स्थायिक झाले. समुद्रमार्गाने आलेले धर्म-- ख्रिश्चन, इस्लाम, पारसी, ज्यू, हे देखील स्थानिक बनले. अपवाद ब्रिटीशांचा. त्याचा विचार यथावकाश करू. 

तूर्तास पडणारा प्रश्न असा की पर्वतरांगा ओलांडून आलेले आक्रमक वा समुद्रमार्गाने आलेले व्यापारी वा अन्य समूह या देशात स्थायिक का झाले? त्याचं कारण मॉन्सूनमध्ये असावं. उत्तरेला लँण्डलॉक्ड वा जमिनीने रोखलेला जगातला एकमेव महासागर म्हणजे हिंदी महासागर. अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर ह्या हिंदी महासागराच्या शाखा आहेत. युरेशियाचं पठार आणि हिंदी महासागर ह्यांच्यामध्ये भारतीय उपखंड आहे. 
त्यामुळे मॉन्सूनचं चक्र निर्माण झालं. अतिप्राचीन काळापासून मॉन्सून चक्र अव्याहतपणे सुरू आहे. त्यामुळे भारतात दोन ते चार महिने पावसाळा असतो. 

आणखी एक कारण आहे. ते म्हणजे तिबेट. 
तिबेट जे जगातील सर्वाधिक उंचीवरील --१६००० फूट, पठार आहे. तिबेटमधील शेकडो पर्वत शिखरं ७००० फूट उंचीची आहेत. तर १३ पर्वत शिखरं ८००० फूटांहून अधिक उंचीवर आहेत. उदाहरणार्थ माऊंट एव्हरेस्ट वा सगरमाथा. सर्वाधिक हिमनद्या-- सुमारे ३५,००० तिबेटमध्ये आहेत. म्हणूनच तिबेटला आशियाचा वॉटर टॉवर म्हणतात. तिबेटमध्ये उगम पावणार्‍या महत्वाच्या नद्या-- सिंधु, गंगा, ब्रह्मपुत्रा. त्याशिवाय यांगत्से, यलो रिव्हर या चीनमधील नद्यांचा उगमही तिबेटमध्येच आहे. या सर्व नद्या बारमाही वाहणार्‍या आहेत. 
सिंधु आणि गंगा नदीच्या सुपीक खोर्‍यांमुळे भारतीय उपखंडातील मोठ्या प्रदेशात-- नॉर्दर्न प्लेन्स वा उत्तरी मैदानं, मोठ्या प्रमाणावर अन्नधान्याचं उत्पादन होत असे. युरोपात औद्योगिक क्रांती होईपर्यंत जगाची निम्म्याहून अधिक लोकसंख्या भारतीय उपखंडात आणि चीनमध्ये होती. या दोन देशांमधून जगाला पक्क्या मालाचा-- सुती व रेशमी कापड, चिनी मातीची भांडी आणि अन्नधान्याचा वा शेती उत्पादनांचा-- चहा, धान्य, मसाल्याचे पदार्थ, नीळ, इत्यादीचा पुरवठा होत असे. औद्योगिक क्रांतीपूर्व जग युरोप क्रेंद्रीत नव्हतं. उत्तरी मैदानं अर्थात सिंधु आणि गंगा खोर्‍य़ातील नद्यांचा प्रदेश वेद, रामायण, महाभारत यांची भूमी समजला जातो. बौद्ध आणि जैन धर्मांचा उदयही याच प्रदेशात झाला. 

आलं, लसूण, हळद, जिरे, धने, दालचिनी, जायफळ, वेलची इत्यादी मसाल्याच्या पदार्थांपैकी दालचिनी, जायफळ, वेलची, मिरे इत्यादी मसाल्याचे पदार्थ दक्षिणेकडील राज्यांत, म्हणजे पश्चिम आणि पूर्व घाटांच्या प्रदेशात विपुल प्रमाणात होते. ह्या मसाल्यांशिवाय उत्तरी मैदानातील खाद्य संस्कृती बेचव होईल. आणि दक्षिणेकडील सर्व राजांच्या सैन्यातील घोडे युरेशियातून सिंधू खोर्‍यामार्गे आणि नंतर अरबी समुद्रातून आले.

भारतीय उपखंडात प्रवेश केल्यानंतर एकही मोठा नैसर्गिक अडथळा -- नदी, उत्तुंग पर्वतरांगा, वाळवंट, इत्यादी नसल्याने विविध राज्यांच्या सीमा आकुंचन प्रसरण पावत. विविध वंश, रंग, समूह, भाषा ह्यांची सरमिसळ झाल्याने केंद्रीय सत्तेला त्यांच्याशी जुळवून घेऊनच राज्यकारभार करावा लागे. मुघलांपासून ब्रिटीशांपर्यंत सर्व शासकांना प्रदेशांच्या स्वायत्ततेला या ना त्या मार्गाने मान्यता द्यावी लागली. भारतीय राष्ट्र-राज्य हे संघराज्य आहे. परंतु अनेकदा तो विविध राज्यांचा संघ आहे असं वाटतं. उदाहरणार्थ जल्लीकट्टू या बैलाच्या खेळावरील बंदी केंद्र आणि राज्य सरकारला उठवावी लागली.

खालील नकाशे पाह्यले तर ही बाब अधिक स्पष्ट होईल. 






  



राष्ट्र-राज्याच्या सीमारेषा निश्चित असतात. पण राष्ट्र-राज्याच्या मर्यादांमध्ये राष्ट्राची कल्पना बसवण्याची गरज नाही. एका राष्ट्रात अनेक राष्ट्र-राज्यं असू शकतात अशी नवी मांडणी आपण रुजवायला हवी. तसं घडलं तर पाकिस्तान, भारत, श्रीलंका या तीन देशातील फुटीरतावादी धारणांना-- धर्म, भाषा, वंश, स्थानिक वा प्रादेशिक संस्कृती यावर आधारीत राष्ट्रवादाला शह देणं शक्य होईल.  




9 comments:

  1. उत्तम पुस्तकाच्या दिशेने....

    ReplyDelete
  2. This comment has been removed by a blog administrator.

    ReplyDelete
  3. राष्ट्राची कल्पना काय आहे आणि काय असावी, याची आपण छान मांडणी केली आहे. त्यातून भारतीय उपखंडाची सलगता का आणि कशी आहे, हे लक्षात येते. अर्थात नैसर्गिक संसाधने आणि वाढती लोकसंख्या यामुळे संपत्तीचे वितरण तसेच जीविकाचे प्रश्न गंभीर होत असून त्याविषयी आपल्याला आता मांडणी करावी लागेल, असे मला वाटते. शेवट मध्येच झाला, असे वाटले. आणखी लिहा.

    ReplyDelete
    Replies
    1. सविस्तर प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
      या पोस्टमध्ये एकच मुद्दा मांडायचा होता.
      सविस्तर मांडणी टप्प्याटप्प्याने करायला हवी.

      Delete
  4. वा, खूपच उदबोधक ...लेख आवडला.

    ReplyDelete
  5. Sunil sir, it is always a delight to read your work.
    You have proposed that the definition of the terms nation, state and country should be based on something more monolithic in time such as geography and climate, and not on fleeting man made ideas such as caste, community and religion. This is an excellent proposition. When in a hundred years after all the 'Indians' in your definition (today's India, Pak and Bangla) reconcile their internal differences, we would hopefully see your idea translate into reality.

    ReplyDelete
  6. सुनील: लेख आवडला. तुमचा हा लेख ब्लोग्गर वर बर्याच कालावधीनंतर वाचायला मिळालं.

    ReplyDelete