Sunday 27 August 2017

मॉन्सून आणि भारत - २

इरान, मिस्त्र, रोमा सब मिट गये जहाँसे
बाकी हैं अब तक नामोनिशां हमारा

इराण, ईजिप्त आणि रोमन ही केवळ साम्राज्यंच नाही तर त्या संस्कृती लयाला गेल्या असं इक्बाल ह्यांना म्हणायचं आहे. भारताप्रमाणेच चीनमध्येही प्राचीन काळापासून सांस्कृतिक सातत्य आहे. मात्र चीनमध्ये भारतासारखी बहुप्रवाही वा सर्वसमावेशक संस्कृती निर्माण झाली नाही. 

चीनच्या भूगोलामध्ये त्याची कारणं असावीत. युवाल हरारी या इतिहासाच्या अभ्यासकाने एका मुलाखतीत असं म्हटलं आहे की चीनमधील यलो रिव्हर (पिवळी नदी)च्या किनार्‍यावर विविध छोट्या टोळ्या शेती करत होत्या. प्रत्येक टोळी नदीचा एका छोटा तुकडा सांभाळत होती. त्यामुळे पूर आणि दुष्काळ यावर मात करणं त्यांना जमत नव्हतं. इतिहासाच्या एका टप्प्यावर या सर्व टोळ्या एकत्र आल्या आणि त्यांनी नदीवर एकात्मिक नियंत्रण प्रस्थापित केलं. ह्या प्रक्रियेत चीन नावाच्या राष्ट्राची बीजं रोवली गेली.  ह्याच राष्ट्राचं पुढे राष्ट्र-राज्यात रुपांतर झालं. 

चीनच्या नकाशाकडे नीट पाहा. तिबेटचं पठार, उघ्युरचा निमवाळवंटी प्रदेश आणि गोबीचं वाळवंट यांनी चीन वेढला आहे. हे प्रदेश ओलांडून चीनवर आक्रमण करणं जवळपास अशक्य बाब होती आणि आहे. चीन पादाक्रांत करण्याचा एकच मार्ग आहे तो मांचुरियातून जातो. याच मार्गाने कोणे एके काळी चेंगीजखानने चीनवर आक्रमण केलं होतं. जपानही ह्याच मार्गाने चीनवर चालून गेला होता. हा एकमेव मार्ग वगळता चीन अजिंक्य राहील अशी भौगोलिक रचना आहे. 

वरील नकाशामधला मंगोल या नावाने दर्शवलेला भाग म्हणजे मंगोलिया आहे. तिथे गोबीचं वाळवंट आहे. तिबेट आणि गोबीचं वाळवंट वा मंगोलिया ह्यांच्या मधील प्रदेश उघ्युर. याच प्रांतातून जाणार्‍या मार्गाने चीनला मध्य आशिया आणि त्यानंतर युरोपशी जोडलं होतं. ह्या व्यापारी मार्गालाच रेशीम मार्ग म्हणत. उघ्युर आणि तिबेट हे चीनच्या अधिपत्याखालील स्वायत्त प्रदेश आहेत. तिबेटी वंश आणि संस्कृतीचे लोक वेगळे. उघ्युर प्रांतातील लोकांचं नातं तुर्कांशी आहे. हे दोन्ही प्रदेश आपल्या अधिपत्याखाली ठेवण्यासाठी चीनला प्रचंड गुंतवणूक करावी लागते. पायाभूत सुविधांमध्ये आणि लष्करावर. हान चायनीज या नावाने दर्शवलेला प्रदेश म्हणजे चीनची मुख्य भूमी. मेनलँण्ड चायना. तेथील हान वंशीयांचं वर्चस्व हा चीनच्या राजकारणाचा गाभा राह्यला आहे. अगदी प्राचीन काळापासून आजतागायत. तिबेट, उघ्युर ह्या प्रांतामध्ये पायाभूत सुविधा, लष्कर, उद्योग इत्यादीमध्ये हान वंशींयांना सामावून घेण्यात आलं आहे. त्यांची लोकसंख्या या प्रांतांमध्ये वाढेल अशी धोरणं चीनने आखली. चीन राष्ट्र-राज्याची अर्थात हान वंशीयांची या प्रदेशावरील पकड भक्कम व्हावी यासाठीच अशी धोरणं आखण्यात आली आहेत. आजही चीनची सर्वाधिक लोकसंख्या मेनलँण्ड चायना वा चीनच्या मुख्य भूमीतच आहे. तिबेट आणि उघ्युर प्रांतात शेतीखाली फारशी जमीन नाही. कारण शेती करता येईल असं हवामान आणि भौगोलिक स्थिती या प्रांतांमध्ये नाही.  प्राचीन चिनी सम्राटांच्या परंपरेचं जतन आणि संगोपन करतच कम्युनिस्ट चीनचा साम्राज्यवाद आकाराला आला आहे.

चीन आणि भारत हे दोन्ही प्रदेश भूगोलामुळे जगापासून अलग पडलेले होते त्यामुळे या दोन्ही संस्कृतींमध्ये प्राचीन काळापासून सातत्य दिसतं.  भारतीय उपखंडात प्रवेश करणं दुष्कर नव्हतं परंतु एकदा का भारताच्या मुख्य भूमीत बस्तान बसवलं की परत फिरणं म्हणजे अनावश्यक त्रास, कटकटी आणि संघर्षाला सामोरं जाणं होतं. चीनच्या मुख्य भूमीत प्रवेश करणंच दुष्कर होतं. त्यामुळे तिथे एका वंशाच्या (वंश हे एक मानीव आहे. चीनच्या मुख्य भूमीवरील करोडो लोक आपल्याला एका वंशाचे मानतात हे वास्तव आहे) वर्चस्वाची संस्कृती आकाराला आली.



इक्बाल म्हणतो ती "कुछ बात" म्हणजे भारताचं हवामान आणि भूगोल, अर्थातच मॉन्सून असावा.

 परबत वो सबसे ऊँचा, हमसाया आसमाँ का।
वो संतरी हमारा, वो पासबाँ हमारा।। सारे...
(आकाश वा नभांगण आमच्या हिमालयाचा शेजारी आहे. हिमालय आमचा द्वारपाल आणि पहारेदार आहे.) 

गोदी में खेलती हैं, उसकी हज़ारों नदियाँ।
गुलशन है जिनके दम से, रश्क-ए-जिनाँ हमारा।। सारे....
(त्याच्या कुशीमध्ये हजारो नद्या खेळतात, या नद्यांनी भिजवलेल्या खोर्‍‍यांचा हेवा स्वर्गालाही वाटतो.) 

ऐ आब-ए-रूद-ए-गंगा! वो दिन है याद तुझको।
उतरा तेरे किनारे, जब कारवाँ हमारा।। सारे...
(हे गंगा नदीच्या पाण्या, आठवतो का तो दिवस तुला जेव्हा आमचा तांडा तुझ्या किनारी विसावला. चीनमधील एकाही नदीच्या संबंधात अशी ओळ नसावी. ) 


असं सांगून इक्बाल निष्कर्ष काढतो--- 

कुछ बात है कि हस्ती, मिटती नहीं हमारी।
सदियों रहा है दुश्मन, दौर-ए-ज़माँ हमारा।। सारे...
(कोणती तरी अशी बाब आहे की आमचं अस्तित्व नष्ट होत नाही, शेकडो वर्षं काळ आमचा शत्रू असला तरीही)

इक्बालला अभिप्रेत असलेली "कुछ बात" म्हणजे या भारतीय उपखंडाचा भूगोल आणि हवामान, अर्थातच मॉन्सून असणार. आपला दुःखांचा ठेवा (रहस्य) आपल्याला कुणाला वाटताही येत नाही आणि दुसर्‍या कुणालाही हे दुःख समजणारही नाही, असंही इक्बालने म्हटलं आहे. मॉन्सून हे काही रहस्य नाही. पण नेमेचि येणारा ह्या पावसाळ्यामुळे ओल्या, सुक्या दुष्काळाच्या छायेत भारतीय उपखंडातील कोणता ना कोणता प्रदेश सापडतोच.  वर्षातून दोन वा चार महिने पाऊस पडेल पण शेती बारा महिने करायची असते ही बाब या उपखंडाच्या हाडीमांशी खिळली आहे. आपल्या देशातील वैशिष्ट्यपूर्ण संस्कृतीचा केंद्रबिंदू मॉन्सून आहे.   


3 comments:

  1. खुपच उपयुक्त माहिती.
    विस्तार हवाय ..तपशीलवार
    चीन ने कृषी व औद्योगिक विकास कसा साधला ?

    ReplyDelete