Tuesday 29 December 2009

नेल्ली

शिलाँगहून काझीरंगाला मोटारीने जात होतो. गुगुल मॅपवर नेल्ली हे गाव उमटलं.
१९८३ सालच्या फेब्रुवारी महिन्यात नेल्लीचं हत्त्याकांड घडलं. या हत्त्याकांडाचा निषेध करण्यासाठी मुंबईत गिरगाव चौपाटीला अनेक राजकीय पक्ष आणि संघटना यांनी एक दिवसाचं उपोषण केलं. माधव साठे या कार्यक्रमाच्या आयोजकांमध्ये होता. त्या उपोषणात मी आणि विजय (माझा चुलतभाऊ) सहभागी झालो होतो. अनेक पक्षांनी आसाममधील परदेशी (म्हणजे बांगला देशी) स्थलांतरितांसंबंधात आपआपल्या भूमिका मांडल्या. त्यावेळी टेलिव्हिजन बातम्यांसाठी कुणी बघायचं नाही. वृत्तपत्रं, साप्ताहिकं राजकीय-आर्थिक-सामाजिक प्रश्नांवर भरपूर लिखाण प्रसिद्ध करत असत. रुपा चिनाय त्यावेळी संडे ऑब्झर्वरमध्ये आसाम आंदोलनावर वृत्तांत लिहित असे. अरुण शौरी बहुधा इंडिया टुडेमध्ये होता. आसाम आंदोलन विशेषतः नेल्ली हत्याकांडावर त्याने लिहिलेले वृत्तांत शोध पत्रकाकारिता म्हणून गणले गेले होते. वातावरण काँग्रेस म्हणजे इंदिरा गांधींच्या विरोधात तापत होतं. कुमार केतकरने ईशान्येचा भारताशी काडीमोड अशी लेखमाला दिनांक साप्ताहिकामध्ये प्रसिद्ध करायला सुरुवात केली होती. आसाम लढ्याचे पांगळे पाय या शीर्षकाचा लेख कुमारने लिहिला होता. ऑल आसाम स्टुडन्ट युनियन (आसू)च्या विरोधात कुमारने आपली लेखणी परजली होती. आसाम आंदोलनात चहामळ्यात काम करणारे कामगार सहभागी नाहीत, अशा आशयाची मांडणी त्याने या लेखात केली होती.
१९८३ च्या फेब्रुवारी महिन्यात आसामात विधानसभेच्या निवडणुका घेण्यात आल्या. आसूने या निवडणुकांना विरोध केला. बेकायदेशीररित्या आसामात स्थायिक झालेल्या बांगला देशी नागरिकांची नावं मतदारयादीतून काढल्याशिवाय निवडणुका घेऊ नयेत अशी आसू आणि आसाम आंदोलकांची मागणी होती. राष्ट्रपती राजवट वाढवायची झाल्यास घटनादुरुस्ती करावी लागेल आणि त्यामुळे निवडणुका कोणत्याही परिस्थितीत घेतल्या जातील, अशी निर्णय त्यावेळच्या पंतप्रधान, इंदिरा गांधी यांनी जाहीर केला होता. या निवडणुकांमुळे आसामात हिंसाचार उफाळून आला. निवडणुक काळात आसूचे ५०० च्या वर कार्यकर्ते ठार झाले. नागाव जिल्ह्यात १४ फेब्रुवारीला मतदान झालं. बांगला देशी नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर मतदान केलं अशी कुजबूज आणि त्यानंतर चर्चा आसामी लोकांमध्ये सुरु झाली. रातोरात वातावरण तापलं. ढोल बडवत हजारो लोक (पोलिसांच्या शब्दांत आसामी) नेल्ली गावावर चालून गेले. तिथल्या ठाणेदाराने नागाव पोलिसठाण्याला तार केली, तात्काळ मदत पाठवा. पण नागावहून पोलिसांची कुमक रवाना झाली नाही. १८ फेब्रुवारीला हजारो लोकांनी १४ गावांवर हल्ला चढवला. केवळ सहा तासात हजारो लोकांना ठार केलं. भाले, तलवारी, कोयते, काठ्या-लाठ्या या हत्यारांनी. घर पेटवली. मृतांचा आकडा नेमका किती हे अजूनही कळलेलं नाही. काहिंच्या मते २१९१ तर दिगंत शर्मा याने आपल्या पुस्तकात म्हटल्याप्रमाणे १८१९ आणि तहलकाच्या ताज्या अंकानुसार ३३००. अर्थात नेल्ली आणि परिसरातले लोक तर पाच हजार लोकांचं शिरकाण करण्यात आल्याचं सांगतात. मृतांमध्ये बहुसंख्येने लहान मुलं आणि बायकांचा समावेश होता. ही सर्व गावं मुसलमानांची आहेत. मृतांच्या नातेवाईकांना पाच हजार रुपये नुकसान भरपाई जाहीर करण्यात आली तर जखमींना दीड हजार रूपये.
या हत्याकांडाला जबाबदार कोण याचा उलगडा अजूनपर्यंत झालेला नाही. निवडणूक लादणारं केंद्रसरकार की आंदोलक, आंदोलनातील रा.स्व.संघाच्या जवळचे लोक, की आणखी कोण. असं म्हणतात की आसूच्या कार्यकर्त्यांनी तिवा जमातीच्या लोकांना मुसलमानांच्या विरोधात चिथावणी दिली. तिवा जमातीची अनेक गावं नागावमध्ये नेल्ली परिसरात आहेत. त्यांचा कारभार स्वायत्त जिल्हा मंडळांमार्फत चालवला जातो. आसाममध्ये विविध वंशांचे, धर्मांचे, प्रांतातले, जमातीचे, जातींचे, विविध भाषा बोलणारे लोक आहेत. बहुसंख्य गावांत एक जमात, एक धर्म, एक भाषा आहे. ७५ टक्के लोकसंख्या ग्रामीण आहे. नेल्ली आणि मुसलमानांच्या गावाचा विकास झालेला नाही, याला आम्ही जबाबदार नाही असं तिवा लोक सहजपणे सांगतात.
जागीनगरला चहासाठी थांबलो. नेल्ली हत्याकांडाबाबत तिथल्या पोलिसठाण्यात एकूण ६८८ गुन्हे नोंदवण्यात आले. मात्र त्यापैकी केवळ ३१० गुन्ह्यांबाबत आरोपपत्रं दाखल करण्यात आली. पुढे ते खटलेही मागे घेण्यात आले. या हत्याकांडाची चौकशी करण्यासाठी त्रिभुवनप्रसाद तिवारी आयोगाची नियुक्ती करण्यात आली. आयोगाने दिलेला अहवाल त्यावेळच्या काँग्रेस सरकारने वा त्यानंतरच्या आसाम गण परिषदेच्या सरकारने कधीही प्रसिद्ध केला नाही.
नेल्लीनंतर जवळपास एक वर्षांनी इंदिरा गांधींची हत्या झाल्यावर दिल्लीत शीखांचं हत्याकांड झालं. देशाच्या राजधानीतील शिखांची संख्या दोन हजारांनी कमी झाली. या हत्याकांडात ठार झालेल्यांच्या कुटुंबियांना सात लाख रुपये नुकसान भरपाई जाहीर करण्यात आली.
नेल्ली, दिल्ली त्यानंतर रामजन्मभूमी आंदोलनामुळे उसळलेल्या दंगली, काश्मीर, मणिपूर, गुजरात, मुंबई. दंगलखोरांवर कारवाई नसते, मृतांच्या आणि नुकसान भरपाईच्या रकमेत वाढ वा घट होते. नव्या पानांवर जुना इतिहास लिहीत आपली वाटचाल सुरु आहे.

7 comments:

  1. Yes i suddenly remember lot more things about Aasu and assam agitation when i was with Marathwada Daily we brought out special issue on Assam and we too cover Nelli. Being Journalist i think what AGP and Aasu has done that time was right. Bye the way i differ with u when you tried to Compare talwal kar and Padhye. May i remind u Mr.tambe there is still Pure Journalism beyond Mumbai Pune and Loksatta sakal And Wagle.

    ReplyDelete
  2. आपला ब्लॉग खुप छान आहे

    ReplyDelete
  3. This is one horrific tale you do not often hear about from politicians. The compensation offered was shameful to say the least.

    ReplyDelete
  4. Interesting.... very interesting !!!

    ReplyDelete
  5. The problem of Bangladesh is very complex. The country is so poor, corrupt and mismanaged that people flood to India. The Indian Army soldiers take Rs 20/-- per head to let them in India without any documentation. The extent of penetration has spoiled the demographic balance of all north eastern states. In all such situations, the government should devise very strict indetity mechnaism and mechanism for deporting people of Bangladesh back. Also, the awareness among soldiers muct increase and infiltraion must go down. The population density of NE is a fraction of that of rest of the India and it is a good asset. A wise, active, workable mechanism be devised and put in place to avoid further spoiling of the situaltion.

    ReplyDelete
  6. Keep writing on your Blog. What you write is rational, data intensive and it even has an Archives value. No journalist except perhaps P. Sainath & M. Ram and perhaps Arundhati Roy writes in this fashion anymore.
    HAPPY NEW YEAR - meghnad

    ReplyDelete
  7. 'History that is not dead and geography that is not lifeless' is how I would describe your writing. Translate it into English and send it to Guha.

    ReplyDelete