Thursday 19 November 2015

टिपू सुलतानाची विरासत

मैसूरमधील रेशीम उद्योग प्रख्यात आहे. रेशमाच्या कोशांचं उत्पादन शेतकरी करतात. त्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध योजना वा कार्यक्रमांचा त्यांना लाभ मिळतो. रेशमाच्या कोशांची विक्री करण्यासाठी राज्य सरकारने बाजारपेठ बनवली आहे. तिथे रेशमाच्या कोशांची घाऊक विक्री होते. कोशापासून रेशीम काढून त्याची वस्त्र विणण्याचा उद्योग खाजगी आणि सरकारी दोन्ही क्षेत्रात आहे. काही लोक फक्त रेशमाचा धागा काढून तो विणकरांना विकतात. संपूर्ण रेशीम उद्योगाची मालकी सरकारची नाही पण सरकारच्या प्रोत्साहनाने हा उद्योग चालतो आणि त्यावर सरकारचं नियंत्रणही आहे. 
या रेशीम उद्योगाचा पाया टिपू सुलतानने घातला. त्यासाठी मैसूरमधील विणकरांचं एक शिष्टमंडळ त्याने चीनला पाठवलं. काही कुशल चिनी कारागीरांना प्रशिक्षणसाठी मैसूरला आणलं. अशा प्रकारे मैसूर संस्थानात रेशीम उद्योगाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. 
कर्नाटकातील रेशीम उद्योगाची पायाभरणी करण्याचं श्रेय टिपू सुलतानाचं आहे. 

टिपू सुलतानाच्या काळात मैसूरमधून चंदनाची निर्यात अरब देशांना होत असे. त्याच्या काळात जंगलावर सरकारची मालकी नव्हती. मात्र चंदनाची झाडं आणि चंदनाच्या लाकडापासूनची विविध उत्पादनं आणि त्यांची विक्री हा उद्योग टिपू सुलतानाच्या काळात सरकारी होता. ब्रिटीशांची राजवट स्थिरावल्यानंतर फॉरेस्ट अॅक्ट वा वन कायदा अस्तित्वात आला आणि जंगलं सरकारच्या मालकीची झाली. चंदनाच्या लाकडावर अर्थातच सरकारची मालकी आली. सदर लाकूड कापण्याची कंत्राटं सरकार देऊ लागलं. आजही मोती साबण आणि चंदनाच्या अन्य वस्तू कर्नाटक सरकारच्या उपक्रमामध्ये बनवल्या जातात. या उद्योगाची पायाभरणीही टिपू सुलतानाने केली. 

प्रॅक्सी फर्नांडिस मैसूर जिल्ह्याचे कलेक्टर होते. त्यांनी टिपू सुलतानावर लिहीलेल्या ग्रंथात यासंबंधात सविस्तर माहिती आहे. 

टिपू सुलतान मुसलमान होता. मुसलमान धर्माचा त्याला केवळ अभिमानच नव्हता तर त्या धर्माचा प्रसार करण्यासाठीही तो कटिबद्ध होता. त्याने लाखो हिंदूंचं धर्मांतर केलं. धर्मांतराला प्रोत्साहनही दिलं. त्याची जयंती वा मयंती साजरी करण्याचा कर्नाटक सरकारचा निर्णय वेडगळपणाचा आहे. 

मध्ययुगातील कोणत्याही धर्माचा शासक वा राजा आधुनिक भारताची पायाभरणी करणारा नव्हता. असू शकत नव्हता. कारण आधुनिक अर्थाने राष्ट्र-राज्य ही संकल्पना आणि त्यानुसार देशाची उभारणी ब्रिटीशांचं राज्य भारतात स्थिरावल्यावर सुरु झाली. मध्य युगातल्या कोणत्याही राजाला वा शासकाला आधुनिक, लोकतांत्रिक, सेक्युलर, सामाजिक न्यायावर आधारलेल्या कल्याणकारी राष्ट्राची कल्पना करणं शक्य नव्हतं. त्यामुळे सरकार या संस्थेने अशा कार्यक्रमापासून दूूर राहणं श्रेयस्कर. स्वयंसेवी संस्था, स्थानिक संघटना, संस्था यांनी या प्रकारच्या कार्यक्रमांचं आयोजन करावं. 

४ मे १७९९ रोजी टिपू सुलतान लढाईमध्ये ठार झाला. 
त्याने ज्यांच्यावर अत्याचार केले तेही आता शिल्लक नाहीत. 
टिपूचं राज्य लयाला गेलं, त्याचा राजवाडा वा महाल आता पर्यटन केंद्र बनलं आहे. 
मात्र त्याने सुरु केलेला रेशीम उद्योग आणि चंदनाचा उद्योग आजही सुरू आहे. 
याला विरासत वा वारसा म्हणतात. आपण हिंदू असलो तरिही तो वारसा चालवणं गरजेचं असतं.  

No comments:

Post a Comment